Showing posts with label Virtue. Show all posts
Showing posts with label Virtue. Show all posts

Tuesday, October 25, 2022

पुण्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ | Knowledge is Superior to Virtue

 



ज्ञानाने सर्व कर्मांचा नाश होत असेल तरी सुद्धा शास्त्रामध्ये पापांचा क्षय करण्यासाठी अनेक प्रकारची कर्मे सांगितलेली आहेत.  राजसूय यज्ञ, तसेच अग्निहोत्रादि अनेक यज्ञयागादि आणि शारीरिक, वाचिक व मानसिक तप याप्रकारची अनेक कर्मे आहेत.  त्याचप्रमाणे निषिद्ध कर्मांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रायश्चित्त कर्मे दिलेली आहेत.  या सर्व कर्मांचा उद्देश पापकर्माचा क्षय होऊन ऐहिक आणि पारलौकिक सुख आणि आनंद मिळावा, हाच आहे.

 

याउलट भगवान याठिकाणी सर्व विषयांचा, सर्व कर्मांचा त्याग करून शमदमादि साधनांच्या साहाय्याने आत्मज्ञान प्राप्त करावे असे सांगतात.  आनंद आणि सुख प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असेल तर, ते जर यज्ञयागादि सोप्या कर्मांच्या अनुष्ठानाने मिळत असेल तर इंद्रियसंयमन, विषयांचा त्याग, कर्माचा त्याग, मनःसंयमन आणि सतत विचार करून आत्मज्ञान प्राप्त करणे याप्रकारच्या अत्यंत कठीण आणि अवघड मार्गाने का जावे ?  हा मार्ग सामान्य मनुष्याला शक्य आहे का ?  यापेक्षा यज्ञयागादि कर्मांचा सरळ, सोपा मार्ग अनुसरण करून पापक्षालन करावे आणि सुख मिळवावे हे अधिक युक्तिसंगत नाही का ?

 

यावर भगवान म्हणतात की, जरी यज्ञयागादि कर्माने पापांचे क्षालन होते, तरी सर्व पापांचा निरास होत नाही.  तसेच आपण गृहीत धरले की पापांचा क्षय होतो, तरी सुद्धा पुण्यकर्म शिल्लक राहातेच.  पुण्याचा कधीही नाश होत नाही.  पुण्यकर्म सुद्धा पापकर्माप्रमाणे बंधनकारकच आहे.  ते सुद्धा जन्माला कारण आहे.  थोडक्यात, जीव संपूर्ण कर्म बंधनापासून मुक्त होऊ शकत नाही, कारण कर्म, कर्तुत्व-भोक्तृत्व भावनेचा आणि अज्ञानाचा ध्वंस करू शकत नाही.  अज्ञानाचा नाश फक्त ज्ञानानेच होतो.  म्हणून ज्ञान हेच सर्व प्रकारच्या कर्मामध्ये अधिक श्रेष्ठ असून जीवाला संपूर्ण पावन करणारे आहे.  यासाठी प्रत्येक मुमुक्षूने प्रयत्नपूर्वक ज्ञान संपादन करण्यासाठी प्रयत्न करावा.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, August 4, 2020

सत्वगुणवर्धनाचे १० घटक | 10 Components for Enhancing Virtues





सत्वगुणाच्या वर्धनासाठी शास्त्रकार दहा घटकांचे अनुसरण करावयास सांगतात.  
आगमोSपः प्रजा देशः कालः कर्म च जन्म च |
ध्यानं मन्त्रोSथ संस्कारः दशैते गुणहेतवः ||             (श्रीमद्भागवत ११-१३-४)    
आगम (शास्त्र), आप (पाणी), प्रजा, देश, काळ, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार हे दहा घटक तिन्हीही गुणांचा उत्कर्ष करण्यासाठी कारण होतात.  

जीवनामध्ये आपला अनेक गोष्टींशी संपर्क होत असतो.  त्यामधून मनावर सुप्त संस्कार होत असतात.  प्रामुख्याने उपरोक्त सांगितलेल्या दहा घटकांच्यामुळे तीन गुण वर्धन पावतात.  म्हणून राजोतमोगुणात्मक घटकांचा त्याग करून सात्विक आगमादि दहा घटकांचेच अनुसरण करावे.  त्यामुळे सत्वगुणाचा उत्कर्ष होऊन काया-वाचा-मनसा अंतर्बाह्य शुद्धि होईल.  

१.  सात्विक शास्त्र म्हणजेच निवृत्तिपर असणारे अध्यात्मशास्त्र होय.  
२.  सात्विक पाणी म्हणजेच परमेश्वराचे अथवा गुरुचरणांचे तीर्थ होय.  
३.  सात्विक प्रजा म्हणजे सज्जनांचा संग किंवा सत्संगति.  
४.  सात्विक देश म्हणजे पवित्र, एकांत स्थान.  
५.  सात्विक काळ म्हणजे पहाटे ३:३० नंतर सूर्योदयापर्यंतचा ब्राह्ममुहुर्त.  
६.  सात्विक कर्म म्हणजेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान.  
७.  सात्विक जन्म म्हणजेच गुरुपदेश अथवा उपनयन संस्कार.  
८.  सात्विक ध्यान म्हणजेच परमेश्वराचे ध्यान.  
९.  सात्विक मंत्र म्हणजेच गायत्री मंत्र किंवा प्रणवोपासना.  
१०. सात्विक संस्कार म्हणजेच आत्मबोधाचा संस्कार.  

याप्रकारे सात्विक घटकांचेच अनुसरण करावे.  यामुळे भक्तिरूप धर्माचा उदय होऊन आत्मज्ञानाची प्राप्ति होते आणि जन्ममृत्युयुक्त संसाराचा ध्वंस होतो.  यालाच सत्वगुणाची उपासना असे म्हणतात.  याप्रमाणे सत्वगुणाचा उत्कर्ष करणे ही सुद्धा गुणउपासना आहे.        


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011

- हरी ॐ

Saturday, March 25, 2017

आपल्या जीवनातील रामायण | Ramayana – Parallels in Our Life


ज्यावेळी सीता अजाणतेपणाने लक्ष्मणरेषा उल्लंघन करते, त्याचवेळी रावण सीतेचे अपहरण करतो व रामापासून तिचा वियोग होतो.  रावण हा लंकाधीश असून अन्यायी, अधार्मिक, अधर्माचे प्रतीक होता.  रावण म्हणजेच साक्षात अहंकार होय. सीता म्हणजेच मोहवश होणारा अज्ञानी जीव होय.  अहंकारच जीवाला पळवून नेतो, जीवाचे हरण करतो, जीवाला परमेश्वरापासून दूर-दूर घेऊन जातो.

रावण सीतेला पळवून असंख्य राक्षस व राक्षसिणी यांच्या पहाऱ्यात ठेवतो.  राक्षस म्हणजेच आपल्या अंतःकरणामध्ये असलेली सर्व असुरीगुणसंपत्ति होय.  हे सर्व विकार सीतारूपी जीवावर रात्रंदिवस, जीवनभर कडक पहारा देत असतात.  हे राक्षस सतत येऊन सीतेला क्षणाक्षणाला डिवचत असतात.  रावण सुद्धा रोज अशोकवनामध्ये जाऊन सीतेला अनेक प्रकारच्या अभिलाषा, प्रलोभने दाखवून सीतेला वश करण्याचा प्रयत्न करीत असे.  म्हणजेच हा अहंकार जीवाला पुन्हा, पुन्हा डिवचतो आणि त्याच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे दोष, आसुरीगुणसंपत्ति निर्माण करतो.  अहंकार जीवाला प्रत्येक प्रसंगामध्ये पावलोपावली असह्य करतो.

परंतु सीता रावणाला आणि राक्षसांनी दाखविलेल्या अनेक प्रलोभनांना सुद्धा वश होत नाही.  याचे कारण सीता ही अत्यंत पवित्र, चारित्र्यसंपन्न, शीलवती, एकनिष्ठ पतिव्रता होती.  श्रीरामाच्या विरहामध्ये श्रीरामाचे मूल्य सीतेला समजते.  आपल्या जीवनामध्ये असणारे श्रीरामाचे स्थान सीतेला समजते.  सीता त्या विरहावस्थेमध्ये अत्यंत हीन-दीन, अस्वस्थ, व्याकूळ होते.  याचप्रमाणे, प्रत्येक जीव सुद्धा संसारामध्ये बद्ध झाल्यानंतर अनंत दुःखे अनुभवत असताना अत्यंत व्याकूळ होतो, हीनदीन आणि अगतिक होतो.  भगवंताला अनन्य भावाने शरण जातो.

परमेश्वर हा दैन्यप्रिय आहे.  म्हणजेच भक्तामध्ये ज्यावेळी दीनभाव प्रकर्षाने जागृत होतो, त्याचवेळी तो अनन्य भावाने शरण जातो. भगवंताला नतमस्तक होतो.  यावेळी तो व्रतस्थ राहतो.  म्हणजेच तो जीवनामध्ये धर्माच्या आधारावर असणारे अत्यंत चारित्र्यसंपन्न जीवन जगतो.


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007




- हरी ॐ