Saturday, March 25, 2017

आपल्या जीवनातील रामायण | Ramayana – Parallels in Our Life


ज्यावेळी सीता अजाणतेपणाने लक्ष्मणरेषा उल्लंघन करते, त्याचवेळी रावण सीतेचे अपहरण करतो व रामापासून तिचा वियोग होतो.  रावण हा लंकाधीश असून अन्यायी, अधार्मिक, अधर्माचे प्रतीक होता.  रावण म्हणजेच साक्षात अहंकार होय. सीता म्हणजेच मोहवश होणारा अज्ञानी जीव होय.  अहंकारच जीवाला पळवून नेतो, जीवाचे हरण करतो, जीवाला परमेश्वरापासून दूर-दूर घेऊन जातो.

रावण सीतेला पळवून असंख्य राक्षस व राक्षसिणी यांच्या पहाऱ्यात ठेवतो.  राक्षस म्हणजेच आपल्या अंतःकरणामध्ये असलेली सर्व असुरीगुणसंपत्ति होय.  हे सर्व विकार सीतारूपी जीवावर रात्रंदिवस, जीवनभर कडक पहारा देत असतात.  हे राक्षस सतत येऊन सीतेला क्षणाक्षणाला डिवचत असतात.  रावण सुद्धा रोज अशोकवनामध्ये जाऊन सीतेला अनेक प्रकारच्या अभिलाषा, प्रलोभने दाखवून सीतेला वश करण्याचा प्रयत्न करीत असे.  म्हणजेच हा अहंकार जीवाला पुन्हा, पुन्हा डिवचतो आणि त्याच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे दोष, आसुरीगुणसंपत्ति निर्माण करतो.  अहंकार जीवाला प्रत्येक प्रसंगामध्ये पावलोपावली असह्य करतो.

परंतु सीता रावणाला आणि राक्षसांनी दाखविलेल्या अनेक प्रलोभनांना सुद्धा वश होत नाही.  याचे कारण सीता ही अत्यंत पवित्र, चारित्र्यसंपन्न, शीलवती, एकनिष्ठ पतिव्रता होती.  श्रीरामाच्या विरहामध्ये श्रीरामाचे मूल्य सीतेला समजते.  आपल्या जीवनामध्ये असणारे श्रीरामाचे स्थान सीतेला समजते.  सीता त्या विरहावस्थेमध्ये अत्यंत हीन-दीन, अस्वस्थ, व्याकूळ होते.  याचप्रमाणे, प्रत्येक जीव सुद्धा संसारामध्ये बद्ध झाल्यानंतर अनंत दुःखे अनुभवत असताना अत्यंत व्याकूळ होतो, हीनदीन आणि अगतिक होतो.  भगवंताला अनन्य भावाने शरण जातो.

परमेश्वर हा दैन्यप्रिय आहे.  म्हणजेच भक्तामध्ये ज्यावेळी दीनभाव प्रकर्षाने जागृत होतो, त्याचवेळी तो अनन्य भावाने शरण जातो. भगवंताला नतमस्तक होतो.  यावेळी तो व्रतस्थ राहतो.  म्हणजेच तो जीवनामध्ये धर्माच्या आधारावर असणारे अत्यंत चारित्र्यसंपन्न जीवन जगतो.


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007




- हरी ॐ

No comments:

Post a Comment