Showing posts with label Wisdom. Show all posts
Showing posts with label Wisdom. Show all posts

Tuesday, June 8, 2021

बुद्धीची खरी कसोटी | Real Test of Wisdom

 


श्रेयस् प्रेयस् हे दोन्हीही मार्ग अनुसरण करण्यामध्ये पुरुषाला इच्छास्वातंत्र्य आहे.  खरे तर बुद्धिमान मनुष्याने अधोगामी, अंधारमय, दुःखस्वरूप असणाऱ्या प्रेयस् मार्गाचा त्याग करून ऊर्ध्वगामी, प्रकाशमय मोक्षरूप श्रेयस् मार्गाचा स्वीकार करावयास हवा.  परंतु बहुतांशी लोक प्रेयस् मार्गालाच निवडतात.  असे का ?  मनुष्य चांगला मार्ग सोडून वाईट मार्गाच्यामागे का लागतो ?  

 

शास्त्रकार मनाची व्याख्या करतात – संकल्पविकल्पात्मकं मनः |  संकल्प-विकल्प निर्माण करणे, हेच मनाचे कार्य आहे.  परंतु काय योग्य व काय अयोग्य, हे ठरविण्याचे निर्णयस्वातंत्र्य बुद्धीला दिलेले आहे.  निश्चयात्मिका निर्णयात्मिका अंतःकरणवृत्ति: इति बुद्धिः |  जी जीवनामध्ये योग्यायोग्याचा विचार करून निर्णय घेते, त्या अंतःकरणवृत्तीला बुद्धि असे म्हणतात.  सदसद्विवेकबुद्धीच्या साहाय्याने योग्य निर्णय घेऊन मनुष्याने जीवनामध्ये अधर्माचा, अनीतीचा त्याग करून धर्मामध्ये, नीतीमध्ये प्रवृत्त झाले पाहिजे.  हेच बुद्धीचे खरे कार्य आहे.  

 

व्यवहारामध्ये आपणही बुद्धीचा उपयोग करतो.  आपल्याला खूप बुद्धि आहे असे आपणास वाटते.  बुद्धिवादाच्या मोठमोठ्या गप्पा आपण मारतो.  दोनचार शाब्दिक कोट्या केल्या, सलग दहा वाक्ये एका श्वासात बोलली की, अन्य लोकांनाही वाटते की, आपण बुद्धिमान आहोत.  परंतु आपण फक्त व्यवहारकुशलज्ञ आहोत.  संपूर्ण विश्वाचे ज्ञान घेतो.  कोणत्याही विषयावर तासन्तास उत्कृष्ट बोलतो; परंतु आचार्य येथे सांगतात की – साधनतः फलतः च मन्दबुद्धीनाम् |  साधन व फळ, म्हणजेच साध्य यांचा विचार करण्यामध्ये मात्र मनुष्य मंदबुद्धि आहे.  

 

आपल्या जीवनाचे खरे साध्य, ध्येय काय आहे ?  आणि त्या ध्येयप्राप्तीसाठी योग्य साधन काय आहे, याचा विचार करण्याविषयी आपली बुद्धि मंद आहे.  यामुळेच मनुष्यासमोर श्रेयस् प्रेयस् हे दोन मार्ग एकत्र होऊन, मिश्रित स्वरूपाने येतात.  म्हणूनच तेथेच खरी मनुष्याची परीक्षा आहे.  पुरुषार्थ आहे.  दोन भिन्न मार्ग स्पष्टपणे समोर आले तर निवडणे सोपे आहे.  तेथे विशेष बुद्धि चालविण्याची गरज नाही.  परंतु हे दोन्हीही मार्ग मिश्र स्वरूपाने आल्यानंतर विवेकाच्या साहाय्याने ते एकमेकांच्यापासून भिन्न केले पाहिजे.  


 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ




Tuesday, March 1, 2016

पंडित कोण आहेत? | Wisdom of Self-Realization


सामान्य मनुष्य देहालाच महत्व देऊन सत्यत्व देतो. त्यामुळे त्याच्यामध्ये देह हाच आत्मा ही देहात्मबुद्धि असल्यामुळे तो विश्वात पाहताना देहाला प्राधान्य देऊन पाहात असतो.  त्याची फक्त शारीरिक दृष्टि असते.  यामुळे अहंकारममकारादि प्रत्यय निर्माण होऊन शोक-मोह निर्माण होतात.  संसाराची निर्मिति होते.  ते गेलेल्याबद्दल सतत शोक करीत असतात.  ते अपंडित, अज्ञानीच आहेत.

अत्यंत मूढ, अज्ञानी लोक हे माझे पुत्र वगैरे मृत झाले म्हणून त्यांच्याबद्दल सतत शोक करीत असतात.  परंतु जिवंत असणाऱ्यामध्ये आसक्त होऊन रमतात.  धार्मिक, शास्त्रपारंगत लोक आपले पुत्र महामूर्ख, अज्ञानी, अविचारी, स्वैर, दुराचारी निघाले म्हणून शोक करतात.  आमचे पुत्र आम्हाला काळीमा फासणारे निघाले, अशा प्रकारचे उद्गार काढून सतत शोकाकुल, दुःखी असतात.

परंतु याउलट पंडित – आत्मज्ञानी पुरुष पुत्रादि गेले किंवा मूर्ख निघाले तरी शोक करीत नाहीत, कारण त्यांची दृष्टि शरीरमनबुद्धीच्या अतीत असलेल्या आत्मस्वरूपाची – पारमार्थिक असते.  त्यांच्यामध्ये देहात्मबुद्धि निरास होऊन आत्मस्वरूपाची बुद्धि उदयाला आलेली असते.  त्यामुळे सर्व विश्वाकडे आणि आपल्याभोवती असलेले सगेसोयरे यांच्याकडे बघण्याची दृष्टीच बदललेली असते.

स्वप्नात पुत्रपौत्रादि जन्माला येतात आणि मृत होतात.  काल्पनिकच अस्तित्व असल्यामुळे त्यांचा जन्म आणि मृत्यु सर्वच काल्पनिक !  म्हणून स्वप्नातून जागृत झालेला पुरुष काल्पनिक पुत्रजन्माने हर्षित होत नाही किंवा काल्पनिक मृत्यूने दुःखी, शोकाकुल होत नाही.  त्याचप्रमाणे अविद्यारूपी निद्रेचा ध्वंस करून आत्मज्ञानाने स्वस्वरूपला जागृत झालेला आत्मज्ञ पुरुष हे सर्व विश्व आणि सगेसोयरे अविद्याकल्पित असून स्वप्नाप्रमाणे भास आहे.  त्यांना खरी वास्तवता नसून परमात्मा, ब्रह्मस्वरूप हेच त्रिकालाबाधित सत्य आहे असे पाहतात.  त्यामुळे सर्व असत् नामरूपांचा त्याग करून सर्व ठिकाणी अनुस्यूत असलेले ब्रह्मस्वरूप पाहतात.  ज्यांच्यामध्ये ही आत्मस्वरूपाची बुद्धि निर्माण झालेली आहे ते पंडित होय.  जे आत्मज्ञानी आहेत तेच पंडित आहेत.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ