Showing posts with label Futility. Show all posts
Showing posts with label Futility. Show all posts

Tuesday, February 8, 2022

मिथ्यात्वदृष्टि | Futility Perspective

 



सदेहमुक्ति असो किंवा विदेहमुक्ति असो, यापैकी कोणतीही मुक्ति विषयांच्यापासून प्राप्त होत नाही. त्यामुळे जर कोणी म्हणेल की, आम्हाला भोगही पाहिजेत आणि मोक्षही पाहिजे, तर ते शक्य नाही. विषयांच्या त्यागानेच मोक्ष प्राप्त होतो. परंतु अज्ञानी मनुष्य शब्दस्पर्शादि, स्त्रक्-चंदन-वनितादि विषयांच्यामध्ये रस घेऊन ते उपभोगत असतो. जसे आपण आंब्याच्या रसाचा स्वाद घेऊन रस चाखतो, तसेच वैषयिक मनुष्य विषयोपभोगांचा आस्वाद घेत असतो. याचे कारण तो विषयांना सत्यत्व आणि महत्त्व देतो. विषयांच्याशिवाय तो जगू शकत नाही. त्यामुळे विषय व उपभोग हेच त्याचे जीवन बनते.

 

परंतु ज्ञानी पुरुष मात्र विषयांना सत्यत्व देत नसल्यामुळे तो विषयांचा आस्वाद घेण्यामध्ये रममाण होत नाही. विषयांना सत्यत्वच दिले नाही तर त्यामध्ये भोगवासना निर्माण होऊ शकत नाही. जसे आपणास कोणी सांगितले की, "वाटीमध्ये बासुंदी ठेवली आहे," अशी कल्पना करा आणि तिचा आस्वाद घ्या. अशा वेळी आस्वाद तर फार दूरच! परंतु ती वाटी हातात घेण्यामध्ये सुद्धा आपली प्रवृत्ति होत नाही. कारण ती बासुंदी मिथ्या-खोटी आहे, हे आपणास नक्की माहीत असते. किंवा स्वप्नामध्ये प्राप्त झालेल्या संपत्तीने, जागृत झाल्यावर आपण हुरळून जात नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष या सर्व दृश्य विषयांच्याकडे मिथ्यात्वदृष्टीने पाहत असल्यामुळे विषय उपभोगण्यामध्ये त्याची प्रवृत्तिच होत नाही. विषय उपभोगण्यात त्याला रस वाटत नाही.

 

म्हणूनच जे दृश्य रूपाने आपण पाहतो ते विश्व मिथ्या आहे. एखाद्या कॅनव्हॉसच्या कापडावर काढलेल्या चित्राप्रमाणे विधात्याने या सृष्टीचे चित्र काढले आहे. त्यामुळे सृष्टीमधील सर्वच गोष्टी चित्राप्रमाणे मिथ्या आहेत. ज्ञानीपुरुष-बाधित अनुवृत्त्या । बाधित अनुवृत्तीने जगतो. बाधित अनुवृत्ति म्हणजेच तो जगतसत्यत्वाचा निरास करून व्यवहार करतो. त्यामुळे विश्व त्याला स्वप्नवत खोटे वाटते. गंधर्वनगरीप्रमाणे विकारयुक्त वाटते. तसेच केळीच्या खुंटाप्रमाणे निःसार वाटते. वाळवंटावरील वाळूवर चमकणाऱ्या पाण्याप्रमाणे अतिशय भासमान वाटते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Thursday, May 8, 2014

विषयांचे मिथ्यात्व | Futility of Worldly Objects

 
 
भगवान अर्जुनाला आणि प्रत्येक साधकाला उपदेश देतात – दोष बाहेर नाहीत तर तुझ्या मनातच आहेत.  ते काढ.  म्हणजे बाकी सर्व तसेच राहिले तरी तुझ्यावर परिणाम होणार नाही.  तू विचलित न होता शांत, स्थिर होशील.  स्वस्थ होशील.  यासाठी भगवान स्वतःच तर्कशुद्ध युक्तिवाद देतात.  सुखदुःखात्मक अनुभवाला येणारे प्रसंग नित्य नाहीत.  तर ते सर्वच येणारे आणि जाणारे आहेत.
 
१.  इंद्रियांचा विषयांशी झालेला संनिकर्ष आणि त्यातून आलेला अनुभव नित्य नाही, कारण संयोग कर्तृत्वाने, प्रयत्नाने निर्माण केलेला आहे.  त्यामुळे जोपर्यंत संयोग आहे, तोपर्यंतच अनुभव आहे.  तसेच संयोग असेल तर वियोग होणारच !  म्हणून प्रत्येक संयोग हा वियोगात्मकच आहे !
 
२.  ज्या विषयांचा संयोग होतो त्या विषयांचे स्वरूप काय आहे ?  कोणताही विषय नित्य नाही तर विकारयुक्त, अनित्य आहे.  म्हणून कितीही प्रयत्न केले तरी किंवा अपेक्षा केली तरी संयोग कधीही नित्य टिकणार नाही.  संयोगातून उपभोग घेताना विषयाचा क्षय होतो.
 
३.  बाह्य विषय नाशवान असल्यामुळे त्यातून येणारे अनुभव सुद्धा नित्य नाहीत.  याप्रमाणे काळाच्या ओघात अनेक प्रसंग आले आणि गेले.  त्या प्रत्येक प्रसंगाला सुरुवात आणि शेवट आहे.  म्हणून सर्व अनित्य आहे.  मग तो प्रसंग सुखकारक असो किंवा कितीही दुःखकारक, असह्य असो.
 
 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
 

 
 
                                                            - हरी ॐ