Thursday, May 8, 2014

विषयांचे मिथ्यात्व | Futility of Worldly Objects

 
 
भगवान अर्जुनाला आणि प्रत्येक साधकाला उपदेश देतात – दोष बाहेर नाहीत तर तुझ्या मनातच आहेत.  ते काढ.  म्हणजे बाकी सर्व तसेच राहिले तरी तुझ्यावर परिणाम होणार नाही.  तू विचलित न होता शांत, स्थिर होशील.  स्वस्थ होशील.  यासाठी भगवान स्वतःच तर्कशुद्ध युक्तिवाद देतात.  सुखदुःखात्मक अनुभवाला येणारे प्रसंग नित्य नाहीत.  तर ते सर्वच येणारे आणि जाणारे आहेत.
 
१.  इंद्रियांचा विषयांशी झालेला संनिकर्ष आणि त्यातून आलेला अनुभव नित्य नाही, कारण संयोग कर्तृत्वाने, प्रयत्नाने निर्माण केलेला आहे.  त्यामुळे जोपर्यंत संयोग आहे, तोपर्यंतच अनुभव आहे.  तसेच संयोग असेल तर वियोग होणारच !  म्हणून प्रत्येक संयोग हा वियोगात्मकच आहे !
 
२.  ज्या विषयांचा संयोग होतो त्या विषयांचे स्वरूप काय आहे ?  कोणताही विषय नित्य नाही तर विकारयुक्त, अनित्य आहे.  म्हणून कितीही प्रयत्न केले तरी किंवा अपेक्षा केली तरी संयोग कधीही नित्य टिकणार नाही.  संयोगातून उपभोग घेताना विषयाचा क्षय होतो.
 
३.  बाह्य विषय नाशवान असल्यामुळे त्यातून येणारे अनुभव सुद्धा नित्य नाहीत.  याप्रमाणे काळाच्या ओघात अनेक प्रसंग आले आणि गेले.  त्या प्रत्येक प्रसंगाला सुरुवात आणि शेवट आहे.  म्हणून सर्व अनित्य आहे.  मग तो प्रसंग सुखकारक असो किंवा कितीही दुःखकारक, असह्य असो.
 
 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
 

 
 
                                                            - हरी ॐ

No comments:

Post a Comment