Showing posts with label company. Show all posts
Showing posts with label company. Show all posts

Tuesday, December 2, 2025

दुःसंगाचा त्याग का करावा ? | Why Give Up Inferior Company ?

 



दुःसंग कोणता ?  साधुसंतांच्या संगापासून दूर नेणारा, आपल्या श्रद्धा, भक्तीचे खंडन करणारा, त्याचा उपहास करणारा, मन अधिक विषयाभिमुख करून उपभोगण्याची लालसा वाढविणारा, विषयसेवनामध्ये प्रवृत्त करणारा, मन अशुद्ध, कलुषित, विकारी करून क्षुब्ध करणारा, सद्गुणांचा किंवा दैवीगुणसंपत्तीचा ऱ्हास करणारा, मनाचे संयमन किंवा संतुलन तोडणारा, सत्कर्मामधून परावृत्त करून असत्कर्मामध्ये, पापाचरणामध्ये प्रवृत्त करणारा कोणताही संग हा दुःसंग आहे.  मग तो व्यक्तीचा संग असेल किंवा विषय, प्रसंग वगैरेंचा संग असेल.  त्या सर्वांचा प्रयत्नपूर्वक विवेकाने मनाचा तोल ठेऊन त्याग करावा.  जो शास्त्रविधीचा त्याग करून स्वकामनेने प्रेरित होऊन त्यानुसार आचरण करतो त्याला आत्मसिद्धि मिळत नाही, सुखही मिळत नाही.  इतकेच नव्हे तर उत्तम गति सुद्धा मिळत नाही.

 

दुःसंगाचा त्याग का करावा ?  परमेश्वर अभिमानाचा द्वेष करणारा आहे.  तसेच त्याचे प्रेम, भक्ति कामनारहित आहे.  त्यामुळे ईश्वरभक्ति आणि अहंकार, विषयकामना परस्परविरुद्ध आहेत.  म्हणून परमेश्वर हाच माझा प्रियतम असेल तर माझे कर्तव्य काय आहे ?  जे जे परमेश्वराला प्रिय आहे तेच करणे योग्य आहे.  आपल्या हातून असे कर्म व्हावे की ते ईश्वराभिमुख असेल ज्यामुळे तो संतुष्ट होईल, प्रसन्न होईल, आपल्यावर त्याची सतत कृपा राहील.  आणि जे ईश्वराला अप्रिय असेल ते कर्म आपल्याकडून घडू नये.  याचाच अर्थ प्रत्येक कर्म त्याला अर्पण करणे, त्याच्यासाठी करणे हेच प्रेमाचे लक्षण आहे.

 

जे कर्म माझ्याकडून अपेक्षित आहे, योग्य आहे, ईश्वरस्वरूपाकडे नेणारे आहे ज्यामुळे मन शुद्ध, अंतर्मुख होईल असे कार्य करावे.  त्याव्यतिरिक्त सर्व कर्मांचा, संगाचा त्याग करावा.  याचे कारण, विषयावर प्रेम आणि ईश्वरावर प्रेम दोन्ही शक्य नाही.  एकावरच प्रेम केले पाहिजे.  प्रियतम एकच हवा तरच मनाची स्थिरता, एकाग्रता शक्य आहे.  यासाठी विषयांचा संग, प्राकृत बुद्धीच्या लोकांचा संग, अहंकारी, उन्मत्त, आसुरी गुणयुक्त लोकांचा संग, नास्तिक पाखंडी लोकांचा संग, उपभोगात रमणाऱ्या लोकांचा संग यांचा सर्वथा त्याग करावा.  त्याशिवाय आपले मन विषयांच्यापासून निवृत्त होणार नाही.  ईश्वराभिमुख होणार नाही.

 

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ