Showing posts with label Past. Show all posts
Showing posts with label Past. Show all posts

Saturday, September 14, 2013

श्रीगणेश – कालत्रयातीतः I Shree Ganesh – Beyond Time




त्वं कालत्रयातीतः |

वर्तमान, भूत आणि भविष्य हे तीन काळ आहेत.  वर्तमानक्षणाच्या पूर्वी गेलेला काळ तो भूतकाळ होय आणि पुढे येणारा भविष्यकाळ होय.  त्यामुळे भूत आणि भविष्याला प्रत्यक्ष सत्ता नाही.  तर त्या दोन्हीही मनाच्या वृत्ति आहेत.

वर्तमान क्षणाला सत्ता असल्यामुळे काळाची प्रचीति फक्त वतर्मानक्षणामध्येच येते.  वर्तमानकाळ  ही सुद्धा मनाचीच कल्पना आहे.  जोपर्यंत मन व मनाचे व्यापार आहेत तोपर्यंत काळाची जाणीव आहे, अन्यथा काळाच्या कल्पनेचाच लय होतो.

गाढ सुषुप्ति अवस्थेत काळाचे अस्तित्वही नसते.  त्याची जाणीवही नसते, कारण मनाचे संपूर्ण व्यापार निद्रावस्थेत लय पावलेले असतात.  जागृत आणि स्वप्नामध्ये काळाच्या कल्पनेमुळे मृत्यूची कल्पना निर्माण होते.  परंतु झोपेत मात्र ‘मी मर्त्य आहे’ याची अंधुकशी सुद्धा जाणीव  शिल्लक राहात नाही.  म्हणून ‘काळ’ ही वास्तवता नसून ती मनाने निर्माण केलेली कल्पना असून मनानेच मनाच्या कल्पनेला दिलेली वास्तवता आहे.

मग वर्तमान, भूत आणि भविष्य या तीन्हीही कल्पनांना स्वतःची सत्ता नसेल तर यांना सत्ता कोणी दिली?  कोणाच्या सत्तेमुळे या तीन काळांची जाणीव होते?

साक्षीचैतन्यामुळेच या तीन्हीही काळाच्या कल्पना प्रकाशमान होतात आणि त्यांची जाणीव होते.  साक्षीचैतन्य हेच काळाला सत्ता देते.  म्हणून कूटस्थसाक्षीचैतन्य हे वर्तमान – भूत – भविष्य या तीन्हीही काळाच्या अतीत असल्यामुळे काळाने परिच्छिन्न होत नाही.  त्यामुळे ते जन्ममृत्यूरहित किंवा उत्पत्तिस्थितिलयरहित आहे.  हे गणपतीचे स्वरूप आहे.  म्हणून येथे श्रीगणेशाला ‘कालत्रयातीतः’ असे म्हटले आहे.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010


- हरी ॐ