Tuesday, January 1, 2013

ब्लॉग: स्त्रीशक्ती - परमपूज्य माताजी (The power of women)


From P.P. Swami Sthitaprandyanand Saraswati's "Dipastambha" article series in Marathi news paper. - 20 April 2008

P.P. Mataji explains the power and importance of women in Indian culture starting from Gargi, Matreyi to astronaut Kalpana Chawala and Sunita Williams.
        
       भारतीय संस्कृती अणि समाजामध्ये स्त्रीचे अत्यंत आदरणीय, विशिष्ट आणि गौरवपूर्ण स्थान आहे.   ती या देशाच्या पावन परंपरांशी बद्ध श्रेष्ठतम संस्कारांनी परिष्कृत आणि आपल्या कर्तव्यान्प्रती संवेदनाशील,  सतत जागृत आणि सहज समर्पित आहे.   यामुळेच भारतीय स्त्रीला 'गृह स्वामिनी' किंवा 'गृहलक्ष्मी' या श्रेष्ठतम पदव्या आपोआपच प्राप्त झाल्या आहेत.

        'यात्रा नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।' असा उद्घोष आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातेलाच जीवनातील प्रथम गुरुचे स्थान देण्यात आलेले आहे. आतापर्यंतच्या महापुरुषांच्या जीवनाचारीत्रांचे अवलोकन केले तर आपल्याला दिसून येते की त्यातील बहुतांश महापुरुषांनी आपल्या श्रेष्ठत्वाचे श्रेय आपल्या आईलाच दिलेले आहे. ज्याप्रमाणे मुलाला घडवण्याचे श्रेय हे आईकडे जाते, त्याचप्रमाणे एक आदर्श व सुखी कुटुंब घडवण्याचे सर्व श्रेय हे त्या घरातील गृहिणीला जात असते.

        स्त्री आणि पुरुष हे समाजाचे दोन तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. येथे स्त्री ही पुरुषापेक्षा यत्किंचित देखील कमी महात्वाची नाही किंवा पुरुष हा स्त्रीपेक्षा यत्किंचित देखील जास्त महत्त्वाचा नाही, हे विसरता कामा नये.   वस्तुत: पुरुष व स्त्री ही विश्वचाक्राची दोन चाके आहेत आणि प्रत्येक चाक हे त्याच्या जागेवर तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे दुषित झालेले वातावरण, राहणीमान आणि fashion चे पोकळ आकर्षण यामुळे समाज संभ्रमित झाला आहे.

        स्त्री ही शक्ती आहे, आदिमायेचे रूप आहे. सर्व महान कार्ये शक्तीच्या बळावर होतात. मात्र विश्वकल्याणासाठी ही शक्ती विधायक हवी. विघातक नको. एकच स्त्री माता, भगिनी, मुलगी, पत्नी अशा अनेक भूमिका समर्थपणे वठवून घरामधील उत्तम व्यवस्थापन (management) करू शकते. खरेतर प्रत्येक गृहिणी ही  MBA च्या कोर्सला न जाता उत्तम manager असते, याचे कारण स्त्री ही सहनशीलता, शालीनता, सौंदर्य, शुद्धता, पावित्र्य याचे प्रतिक आहे.

      गार्गी, मैत्रेयी, मदालसा या वेदकालीन ब्रह्मज्ञानी स्त्रिया होत्या. तर द्रौपदी, अहिल्या, तारा, सीता, मंदोदरी या पतिव्रता होत्या. अगदी आधुनिक काळात कल्पना चावला, सुनिता विलियम्स सारख्या वीर महिला आहेत.   अशा श्रेष्ठ असणाऱ्या स्त्री परंपरेमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक स्त्रीने भारतीय संस्कृती आत्मसात करून, आपल्या स्वतः मधील शक्तीचा शोध घेऊन ती अधिकाधिक उन्नत करण्याचा प्रयत्न केल्यास स्त्री शक्तीची जाणीव संपूर्ण विश्वाला होऊ शकेल.  

- हरी ॐ -





        

1 comment:

  1. धन्यवाद माताजी, अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत स्रीशक्तीची महती सांगितली.

    ReplyDelete