Tuesday, September 15, 2026

ज्ञान आणि सदाचार - परस्पर वर्धन | Knowledge & Virtue Reinforcement

 



सत्पुरुषांच्या सदाचारापासून ज्ञान उत्पन्न होते.  तर ज्ञानापासून सदाचार उत्पन्न होतो.  याप्रमाणे ज्ञान आणि सदाचार हेही शमादि गुणांच्याप्रमाणेच परस्परांना वर्धन करणारे आहेत.  म्हणून बुद्धिमान विवेकी पुरुषाने शमादि गुणांचा अभ्यास करून आपली बुद्धी विकसित करावी आणि सत्पुरुषांचे असणारे सर्व सदाचार म्हणजेच आचारधर्म आत्मसात करावेत.  यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे.  साधकाने संकल्प करून सदाचारपरायण व्हावे.  कारण या गुणांच्या अभ्यासाशिवाय साधकाला ज्ञानही प्राप्त होत नाही आणि सद्गुणही प्राप्त होत नाहीत.

 

मनुष्याचे व्यावहारिक जीवन असो किंवा आध्यात्मिक जीवन असो, सदाचाराला अतिशय महत्त्व आहे.  सदाचार हा आपल्या जीवनाचा पाया आहे.  ज्याप्रमाणे कोणत्याही सुंदर इमारतीचा पाया हा भक्कम असावा लागतो, तसेच मनुष्याच्या जीवनामध्ये सदाचार, संस्कार, आचारधर्म, नीतिमूल्ये, जीवनमूल्ये असतील तर त्याचे जीवन उध्वस्त होऊ शकत नाही.  जीवनाच्या मोठमोठ्या संघर्षामध्येही केवळ सदाचार आणि आचारधर्मच मनुष्याचे रक्षण करतो.  मनुष्याचे जीवन विकसित, सर्वांगसुंदर व परिपूर्ण व्हावयाचे असेल तर प्रथम प्रत्येकाच्या जीवनामध्ये सदाचाराचे अनुष्ठान नितांत आवश्यक आहे.  एक वेळेस अवघड अवघड शब्दज्ञान समजले नाही तरी चालेल, परंतु सदाचार मात्र आवश्यक आहे, मनुष्याने मनुष्यासारखे वागणे गरजेचे आहे.

 

मनुष्याच्या अंतःकारणामध्ये सदाचार उदयाला आला तरच येथे आत्मज्ञान सुप्रतिष्ठित होऊन सुस्थिर होऊ शकते.  मात्र त्यासाठी साधकाच्या मनामध्ये प्रथम सदाचाराचा संकल्प हवा.  संकल्पाशिवाय साधना घडू शकत नाही.  साधनेला, मनुष्याच्या प्रयत्नांना संकल्पाचे सामर्थ्य मिळाले पाहिजे.  म्हणून वसिष्ठ मुनि येथे अत्यंत तळमळीने सदाचाराचे महत्त्व सांगतात.  हे रामा !  साधकाने आत्मज्ञान तर प्राप्त करावेच पण त्याचबरोबर शमादि गुणही प्राप्त करावेत.  किंवा शमादि गुण प्राप्त करता-करता आत्मज्ञान प्राप्त करावे.  या दोन्हीही गोष्टी सहज शक्य आहेत.

 


- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ