जसे भिंतीवर किंवा कॅनव्हासवर हुबेहुब निसर्गाचे
चित्र काढले, तर त्या चित्रामध्ये जड असणारा दगड असेल, तेथेच एखादा सचेतन, सजीव उडणारा
पक्षी असेल. ते चित्र पाहत असताना
चित्रामधील पक्षी हा सजीव दिसतो आणि दगड हा दगडासारखा निर्जीव दिसतो. पण वस्तुतः दगड जितका मिथ्या आहे, तितकाच
पक्षी सुद्धा मिथ्या आहे. सर्वच मिथ्या
आहे. नदी, पाणी मिथ्या आहे. फक्त त्याच्यामागे असणारे अधिष्ठान, भिंत किंवा
कॅनव्हासचे कापड, हे अधिष्ठान फक्त एक सत्य आहे. ही दृष्टि प्राप्त झाली तर तो ज्ञानी पुरुष
कोणाचाही तिरस्कार करीत नाही.
व्यवहारामध्ये अज्ञानी पुरुष सतत द्वेष
किंवा तिरस्कार करतो. याचे महत्वाचे कारण
अज्ञानी पुरुषामध्ये भेद किंवा द्वैत दृष्टि आहे. द्वेष किंवा तिरस्कार हा एकमेकांपासून भिन्न
असणाऱ्या दोन वस्तूंमध्ये किंवा व्यक्तींमध्येच होऊ शकतो. द्वेष करण्यासाठी माझ्यापासून भिन्न कोणीतरी
हवे. परंतु ज्ञानी पुरुष स्वतःव्यतिरिक्त
म्हणजेच आत्मस्वरूपाव्यतिरिक्त भिन्न काहीही पाहत नाही. त्यामुळे तो कोणाचा द्वेष करणार ? द्वेष करण्यासाठी त्याला दुसरा विषय किंवा
व्यक्ति उपलब्धच होत नाही. अन्यवस्त्वन्तरअभावात् |
जो खरा ज्ञानी आहे, ज्याला खऱ्या अर्थाने
ज्ञानदृष्टि प्राप्त झालेली आहे, तो कोणाचाही तिरस्कार करीत नाही. मग यामधून श्रुतीला काय बरे अभिप्रेत आहे ? तिरस्कार न करणे म्हणजेच सर्वांच्यावर प्रेम
करणे होय. ज्ञानी पुरुष सर्वांच्यावर
प्रेम करतो. तो कोणालाही तुच्छ लेखत नाही.
नम्रता, विनयशीलता हेच ज्ञानाचे प्रमुख
लक्षण आहे. जर उन्मत्तपणा, अविनय असेल तर त्याला ‘ज्ञानी’ म्हणताच येणार नाही. जो ज्ञानाने परिपक्व, प्रगल्भ झाला आहे, तो
कधीही दुसऱ्याचा तिरस्कार करीत नाही. दुसऱ्याची
निंदा, नालस्ती, अपमान करीत नाही. तो
ज्ञानाने आपोआपच नतमस्तक, नम्र नम्र होत जातो.
खरे ज्ञान साधकाला नतमस्तक व्हायला लावते. वृक्षाला फळे आल्यानंतर वृक्ष खाली वाकतात. पाणी भरलेले मेघ खाली येतात. समृद्धीने सर्वांशी नम्रतेने वागणे हा
सत्पुरुषांचा स्वभावाच आहे.
-
"ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "Ishavasya
Upanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
- हरी ॐ–

