हे राघवा ! सत्संगाचा महिमा अगाध आहे. ज्याने या सत्संगरूपी शीतल गंगेमध्ये स्नान केले
आहे, त्याला दान, अन्य तीर्थे, तप, किंवा यज्ञयाग या साधनांची आवश्यकता राहत नाही.
कारण साधु हे स्वतःच तीर्थस्वरूप असतात. गंगेप्रमाणे स्वतः अत्यंत शुद्ध असून दुसऱ्यांनाही
पवित्र करतात. म्हणून म्हटले आहे –
साधूनां दर्शनं पुण्यं तीर्थभूता
हि साधवः | कालेन फलते तीर्थं सद्यः साधुसमागमः
|| (शुकसप्ततिः)
साधु हे स्वतःच तीर्थस्वरूप असून त्यांचे दर्शनही
पुण्यकारक आहे. त्यांचे दर्शन घेणे म्हणजे
शेकडो तीर्थांचे दर्शन घेण्याप्रमाणे आहे. बाहेरचे तीर्थ काही काळाने फलद्रूप होते. परंतु सत्संगरूपी तीर्थाचे फळ मात्र तात्काळ प्राप्त
होते. म्हणून सत्संग हा गंगेप्रमाणे अत्यंत
शुद्ध, पवित्र व शीतल आहे.
अशा सत्संगरूपी तीर्थामध्ये ज्यांनी स्नान
केले आहे, ज्याचे मन सत्संगामध्ये, गुरुसेवेमध्ये तल्लीन, तन्मय आणि तद्रूप झाले आहे,
त्यांना दान, तीर्थयात्रा, भ्रमण, भिन्न-भिन्न तपश्चर्या किंवा यज्ञयागादि कर्म अशा
कोणत्याही बहिरंग साधनांचे प्रयोजन राहत नाही. याचे कारण संत हे स्वतः तीर्थस्वरूप असून ते तीर्थालाही
पावन करणारे आहेत.
जेथे जेथे संत जातील, ती भूमि, तो प्रदेश, ते
स्थान, तेथिल प्राणी, माती, तेथिल जीवजंतु, सर्वच काही पवित्र होऊन जाईल. यामध्ये तिळमात्र शंका नाही. म्हणून वसिष्ठ मुनि येथे म्हणतात की, "हे रामा
! जो सत्संगामध्ये आहे, गुरूंची मनोभावे
सेवा करीत आहे, त्याला आपोआपच चित्ताची शुद्धि, दैवीगुणसंपत्ति मिळून ज्ञानाची प्राप्ति
होईल. त्याला वेगळे काही करण्याची आवश्यकता
नाही."
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–