व्यवहारामध्ये एखाद्या धंद्यामध्ये जर नाश झाला, संपूर्ण तोटाच झाला तर कदाचित पुन्हा प्रयत्नाने धंद्याचा जम बसविता येईल. परंतु मनुष्यजन्मामध्ये येऊनही आत्मस्वरूपाचे ज्ञान न झाल्यामुळे होणारी हानी ही भयंकर विनाशकारी आहे. स्वस्वरूपाचे ज्ञान न झाल्यामुळेच मनुष्य अज्ञानवश होतो. अज्ञानामधून अध्यासाची निर्मिती होते आणि एकदा अध्यास झाला की, जीव जन्मानुजन्मे त्या अध्यासामध्येच जगतो. जन्माला आल्याबरोबर शरीराशी तादात्म्य पावतो व स्वतःला मर्त्य म्हणवून घेतो. त्यामधूनच पुढचा सर्व संसार प्रारंभ होतो.
जीवाच्या बुद्धीवर माया आवरण घालते. रोज नवी नवी प्रलोभने निर्माण होतात. मनुष्य त्यास बळी पडतो. कनक-कांचन-कामिनी यामध्येच अडकतो. रात्रंदिवस त्याला विषयांचाच ध्यास लागतो. पैसा, स्त्रीभोग, प्रॉपर्टी, धंदा याशिवाय
त्याला काहीही सुचत नाही. विषयभोग भोगण्यामध्ये
आयुष्य कसे निघून गेले, हेही त्याला समजत नाही. मृत्यु झाल्यानंतर पुन्हा पुढचा जन्म, पुन्हा
मृत्यु असे अव्याहत चक्र चालू राहते. त्यामध्येच मनुष्य बद्ध होतो.
बहिरंगाने मनुष्याने जीवनाचा कितीही विकास
केला, प्रगति केली किंवा ऐहिक समृद्धि, ऐश्वर्य, भरभराट केली, चार-दोन बंगले
बांधले, अनेक ठिकाणी प्रॉपर्टीज निर्माण केल्या, स्वीस बँकांमधून पैसे साठवून
ठेवले तरी त्यावर मानवी जीवनाची यशस्विता ठरत नाही. इतकेच नव्हे तर बाह्य विषयांचे कितीही ज्ञान
घेतले, अनेक पदव्या संपादन केल्या, संगीत-कला-नृत्य आदि अनेक क्षेत्रांचे ज्ञान
घेतले तरी जोपर्यंत मनुष्याला स्वस्वरूपाचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याच्या
जीवनाला परिपूर्णता येऊ शकत नाही. हे
त्रिवार सत्य आहे.
म्हणूनच श्रुति येथे सांगते की – या
मनुष्यजन्मामध्ये जिवंत असताना मनुष्याने आत्मस्वरुपाला जाणले तर त्याच्या जीवनात
काही अर्थ किंवा तथ्य आहे. म्हणजे त्याचे
जीवन सफल आहे. अन्यथा सर्व
प्राणिमात्रांच्यामध्ये अत्यंत दुर्लभ असणारे मनुष्यशरीर प्राप्त होऊनही जर
मनुष्याने आत्मस्वरूपाला जाणले नाही तर त्याचे जीवन व्यर्थ, निष्फळ आहे. त्याचा तो महान नाश आहे.
- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "Kenopanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
- हरी ॐ–