Tuesday, July 8, 2014

मागे काहीही राहिलेले नाही | There is Nothing Left Behind


एका नगरीमध्ये एक साधु पुरुष राहायला येतात.  ते अत्यंत विरक्त व एकांतप्रिय असतात.  राजा रोज नियमितपणे साधूंच्याकडे जात राहतो.  सेवा करतो आणि उपदेश ग्रहण करीत असतो.  त्याची श्रद्धा वृद्धिंगत होते.  तो त्या साधूंसाठी सर्व काही करतो.  चांगले राहायला, खायला-प्यायला देतो.  साधूंचेही जीवन व्यास्थित चाललेले असते.

हे सर्व चालू असताना हळुहळू राजाच्याच मनात विकल्प येऊ लागतो.  “मी सर्व काही या साधूंना देत आहे, पण साधु या सर्वांना नको न म्हणता सर्व उपभोगत आहेत.  वस्तुतः हे साधु असतील तर मी जरी सर्व दिले तरी त्यांनी भोगांचा त्याग केला पाहिजे.  परंतु साधु सुद्धा या भोगांमध्ये रमलेले दिसतात.”  एक दिवस असह्य होऊन तो साधूंना स्पष्टपणे विचारतो “आपण स्वतःला ज्ञानी, साधु म्हणविता परंतु आपण सुद्धा आमच्याप्रमाणे भोगासक्त झालेले दिसता.  मग तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे ?” साधूंना काय समजायचे ते समजते.  ते शांतच राहतात.

दुसऱ्या दिवशी सकाळीच येण्यास ते राजाला सांगतात.  राजा आल्यानंतर ते राजाला फिरायला घेऊन जातात.  एक तास, दोन तास गप्पा मारीत चालत राहतात.  शेवटी त्या राज्याची सीमा येते.  मग मात्र राजा असह्य होतो.  तो सांगतो – “साधु महाराज ! आपण खूप दूरवर आलेलो आहोत, आता परतायला हवे.”

साधु विचारतात “ अरे ! कशासाठी मागे परतायचे ? ” त्यावेळी राजा उत्तर देतो की, “ मला माझे राज्य आहे, माझी बायको, मुले, मंत्री, प्रधान माझी वाट बघत असतील. ”  त्यावेळी साधु त्या राजाला शांतपणे सांगात “ आता तू मागे जा.  परंतु मी साधु आहे, मी पुढे जातो.  कारण माझे असे मागे काहीही राहिलेले नाही.  मी सर्व भोग भोगत असलो, बहिरांगाने तुझ्यासारखे व्यावहारिक जीवन जगलो तरीही तू आणि मी यांत फार फरक आहे. ”


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

No comments:

Post a Comment