Tuesday, October 15, 2024

विचार कसा करावा ? | Ideal Thinking Process

 




विचार कसा करावा ?  याचेही वर्णन वसिष्ठ मुनि करतात - कोहं कथमयं दोषः संसाराख्य उपागतः |  न्यायेनेति परामर्शो विचार इति कथ्यते ||  हे रामा !  साधकाने स्वतःलाच हे प्रश्न विचारावेत की, मी कोण आहे ?  हा संसाररूपी दोष कोठून निर्माण झाला ?  अशा प्रश्नांचा न्यायाच्या साहाय्याने शास्त्राधारे परामर्श करणे म्हणजेच 'विचार' होय.

 

प्रत्येक मनुष्याने जन्माला आल्याबरोबर 'मी' म्हणजेच शरीर अशी कल्पना करून घेतली.  त्यामुळे शरीराच्या गुणधर्मविकारांशी तादात्म्य पावून मनुष्य जन्ममृत्युयुक्त, सुखी-दुःखी व संसारी होतो.  म्हणून मनुष्याने 'मी' आलो कोठून ?  व 'मी' कोण आहे ?  याचा विचार करणे गरजेचे आहे.  व्यवहारामध्ये आपण एकमेकांना भेटल्यावर, तू कोण ?  तुझे नाव-गाव काय ?  तू कोठून आलास ?  असे प्रश्न विचारतो.  आपल्याला दुसऱ्याविषयी भयंकर उत्सुकता असते.  परंतु वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, मनुष्याने ही जिज्ञासा दुसऱ्याविषयी निर्माण न करता स्वतःविषयी निर्माण करावी.  'मी' कोण ?  माझे खरे स्वरूप काय आहे ?  हे सभोवती दिसणारे दृश्य विश्व काय आहे ?  माझ्याभोवती असणारे सगे-सोयरे, आप्त, पति-पत्नी, पुत्र-पौत्र या सर्वांचे स्वरूप काय आहे ?  याचा मनुष्याने अत्यंत युक्तियुक्त विचार करावा.  'मी' म्हणजे देह नाही.  कारण देह हा तर दृश्य, नाशवान असून 'मी' त्या देहाचा द्रष्टा आहे.  त्यामुळे 'मी' शरीर, इंद्रियादि संघातापासून नित्य भिन्न आहे.  माझ्याव्यतिरिक्त समोर दिसणारे दृश्य विश्व सुद्धा नाशवान असून मनोकाल्पित आहे.

 

इतकेच नव्हे तर मी माझे-माझे म्हणून निर्माण केलेली सर्व नाती सुद्धा तात्कालिक व काल्पनिक आहेत.  या जन्मापुरतीच मर्यादित आहेत.  जन्मल्यापासून मृत्युपर्यंत फक्त काही काळ यांचा संबंध आहे.  ज्यांना मी माझे-माझे म्हणतो, ते कोणीही माझे नाहीत.  पैशापुरते, सत्तेपुरते, उपभोगांच्यापुरतेच संबंध आहेत.  आपलीच माणसे आपला विश्वासघात करतात.  धनवान मनुष्याला तर स्वतःच्या पुत्रापासून सुद्धा भीति असते.  या जगात आपल्याशिवाय कोणाचेही काहीही अडत नाही.  साधकाने शास्त्राधारे या सर्व अनित्य संसाराचे अवलोकन करावे आणि त्यापासून विचाराने निवृत्त व्हावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ


Tuesday, October 8, 2024

ईश्वर खरच निष्ठुर आहे का ? | Is God Really Unkind ?

 



ईश्वरकृपा असताना जीवनात संकटे, प्रतिबंध, आपत्ति, कष्ट, दुःख, यातना कशा काय येतात ?  ज्याठिकाणी ईश्वरकृपा असेल तेथे आनंदच असला पाहिजे.  पण हे प्रत्यक्षात दिसत नाही.  त्यामुळे शंका येते की खरोखरच परमेश्वर कृपाळु, दयाळु आहे, का निष्ठूर आहे ?  अशी शंका घ्यावयाचे कारण नाही.  ज्याप्रमाणे चांगल्या, सुखाच्या प्रसंगामध्ये ईश्वरकृपा आहे, तशीच संकटकाळी दुःखाचे वेळी सुद्धा परमेश्वरकृपा आहेच.  ती पाहाण्याची आमच्या मनात ताकद नाही.  मनाची पक्वता नाही.  आपल्या मनाची दारे बंद आहेत.  कल्पनांच्या भराऱ्यामध्ये, राग-द्वेषांच्या जाळ्यामध्ये आपणच आपल्याला बद्ध केलेले आहे.

 

जर एखादा मुलगा म्हणाला की, माझ्या आईचे प्रेम नाही, तर ते किती अव्यवहार्य, अयुक्त आहे.  अशी कोणती माता असेल की जिने नऊ मास आपल्या उदरात मुलास वाढवून आपल्या रक्तातून त्याला अन्न, पाणी पुरवून त्याचे पोषण, वर्धन केले.  असह्य यातना सहन करून त्याला जग दाखविले.  एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षणाला ती मुलाच्याच कल्याणाचा विचार करते.  त्याची काळजी घेते.  तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपते.  अशा मुलाने जर आईचे माझ्यावर प्रेम नाही असे म्हटले तर ते योग्य आहे का ?  सुखदुःखाच्या अनेक प्रसंगात ती त्याच्या मदतीला धावून जाते.  स्वतःच्या प्रेमाने त्याला गोंजारते.  परंतु पुत्राच्या कमनशीबामुळे ते प्रेम तो बघू शकत नाही.  तिचे वात्सल्य तिच्या अंतापर्यंत कायम असते.  परंतु कल्पनेच्या विलासात रंगणाऱ्या त्या अभागी पुत्रास ते दिसत नाही.

 

एखादा डॉक्टर रोग्यावर उपचार करतो.  त्यावेळेस त्या रोग्याच्या यातना, दुःख त्याला समजतात.  रोगाची तीव्रता किती आहे हे जाणून त्याप्रमाणे तो उपचार करतो.  एखादा रोगी गळूमुळे वेदनेने तळमळत आहे.  त्याला असह्य यातना होत आहेत.  अशावेळी आपण जर म्हटले की काय डॉक्टर आहे पहा !  आधीच बिचारा असह्य वेदनेने तळमळत आहे आणि हा डॉक्टर आणखीन कापाकापी करून त्याला अधिकच यातना देत आहे.  तो डॉक्टर दुष्ट, निर्दयी, कसाई आहे.  असे म्हणणे योग्य होईल का ?  डॉक्टरची कृति बाहेरून जरी निर्दयपणाची वाटली तरीही त्याच्या मनात रोग्याविषयी निष्ठुरता नाही.  उलट त्याच्याबद्दल जिव्हाळा, प्रेमच आहे.  म्हणूनच तो रोग्याला वेदनामुक्त करण्याचा प्रयत्न करतो.  तसेच परमेश्वरकृपा असूनही दुर्दैवाने ती आपल्याला दिसत नाही.  तो किती दयाळु-कृपाळु आहे हे बघण्यासाठी मनाचे दरवाजे उघडले पाहिजेत.


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ



Tuesday, October 1, 2024

संकल्प म्हणजेच मन | Mind Means Resolution

 



"हे रामा ! संकल्प म्हणजेच मन !  संकल्पापासून मनाला भिन्न करता येत नाही.  ज्याप्रमाणे पाण्यापासून द्रवत्वाला किंवा वाऱ्यापासून स्पंदनाला भिन्न करता येत नाही, त्याचप्रमाणे मन आणि संकल्प हे भिन्न होत नाहीत."

 

शास्त्रकार मनाची व्याख्या करतात - संकल्पात्मकं मनः |  जोपर्यंत मनामध्ये संकल्प आहे, तोपर्यंत मन आहे आणि मन आहे तोपर्यंत संसाराचा अनुभव आहे.  मग संकल्प कोठून निर्माण होतो ?  असा शोध करीत गेलो तर समजते की, स्वस्वरूपाच्या अज्ञानामधून कामना निर्माण होते.  त्यामधून संकल्प, संकल्पामधून कर्म, कर्मामधून कर्मफळ आणि त्यामधून सुखदुःखादि संसार प्राप्त होतो.  एक छोटा संकल्प सुद्धा जीवाला संसारबद्ध करतो.  जीव जीवनभर कोट्यावधी संकल्प-कामना करतो आणि जन्मानुजन्मे जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो.

 

याउलट जेथे कामना नाहीत, संकल्प नाहीत, तेथे संसारही लय पावतो.  जसे गाढ निद्रेमध्ये मन, संकल्प, कामना, कर्म, कर्तृत्व या सर्वांचाच लय झाल्यामुळे तेथे सुखदुःखादि संसारही अनुभवायला येत नाही.  परंतु निद्रेमधून मन जागृत झाले की, लगेच संकल्प प्रारंभ होतात.  जसे द्रवत्व हा पाण्याचा स्वभाव आहे.  स्पंदन-हालचाल हा वाऱ्याचा स्वभाव आहे.  तसेच, संकल्प करणे हा मनाचा स्वभाव आहे.  "म्हणून रामा !  संकल्प म्हणजेच मन आहे."

 

संकल्प चांगले असोत किंवा वाईट !  तेच जीवाला अनेक कर्मांच्यामध्ये प्रवृत्त करून बद्ध करतात.  म्हणून संकल्प म्हणजे मन आहे, असे येथे श्रीवसिष्ठमुनि सिद्ध करतात.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" Trutiya Utpatti Prakaran by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022

 



- हरी ॐ