Tuesday, July 16, 2024

गुरुकृपा आणि परमेश्वर कृपा | Grace Of Guru And God

 




साधुमहात्मे हेच अनंताच्या यात्रेमध्ये आश्रय आहेत.  एकवेळ ईश्वराची कृपा नसली तरी चालेल परंतु महात्म्यांची कृपा अत्यंत आवश्यक आहे.  गुरुनानक म्हणतात -  

गुरु गोविंद दोनु खड़े किसके लागू पाय |

बलिहारी गुरुदेव की गोविन्द दिये बताय ||

गुरु आणि परमेश्वर यांच्यामध्ये सद्गुरू हेच श्रेष्ठ आहेत, कारण परमेश्वर स्वतः आपले स्वरूप प्रकट करू शकत नाही.  तर ईश्वरनिष्ठ पुरुषच परमेश्वराचे स्वरूप उलगडून सांगतात.  आपल्या आतच परमेश्वराची प्रचीति करून देतात. आपलेच स्वतःचे स्वरूप हे परमेश्वरस्वरूप आहे हे प्रचीतीला आणून देतात.  याचाच अर्थ महात्मा हा परमेश्वरापासून भिन्न नसून साक्षात भूतलावर चालते बोलते परमेश्वर स्वरूप आहेत.  म्हणून त्यांची कृपा ही परमेश्वराची कृपा आहे.

 

अशा ईश्वरनिष्ठ लोकांची जर कृपा झाली, त्यांचा अनुग्रह मिळाला तर त्याच्यासारखा भाग्यवान कोणीही नाही.  त्यांची जवळीक आपल्या मनात श्रद्धा निर्माण करून भक्तीचा भाव निर्माण करील.  ज्याप्रमाणे निर्धन मनुष्याला पैशाची गरज असेल तर त्याने श्रीमंत धनिकाकडे जावे.  तोच त्याची गरज पूर्ण करू शकेल.  हे जसे आपण व्यवहारात पाहातो त्याप्रमाणे आपल्या मनात जर ईश्वरप्रेम नसेल आणि ते प्राप्त करावयाचे असेल तर ते कोणाकडून प्राप्त करावे ?  ज्यांच्याजवळ परमेश्वराबद्दल निःसीम दृढ प्रेम आहे, जे ईश्वररूपामध्ये तल्लीन, तन्मय झालेले आहेत अशा ईश्वरनिष्ठ महात्म्यांच्याकडे गेले पाहिजे.

 

महापुरुषांच्यामध्ये परमेश्वराविषयी अनन्य, उत्कट निष्ठा आणि भक्ति असल्यामुळे त्यांच्या सान्निध्याने आपल्यामध्ये श्रद्धा, भक्ति, निष्ठा निर्माण होईल.  ते प्रेम परमेश्वर सुद्धा देऊ शकत नाही, कारण परमेश्वर सुद्धा प्रेमाचा भुकेला आहे असे म्हटले आहे.  म्हणून महापुरुषांची कृपा प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे.

दुर्लभं त्रयमेवैतद्दैवानुग्रहहेतुकम् |  मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः ||       (विवेकचूडामणि)

या तीन अत्यंत दुर्लभ वस्तु परमेश्वराच्या कृपेनेच प्राप्त होतात - मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषांचा आश्रय !


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ