Monday, September 14, 2015

युक्त आहार | The Right Food


मनुष्य जे अन्न सेवन करतो, त्यातील स्थूल भागाने शरीराचे पोषण होते.  आणि त्याने रक्त, चरबी, अस्थि, मांस, मज्जा हे घटक तयार होतात.  अन्नातील दुसऱ्या सूक्ष्म भागाने मन तयार होते.  अन्नाच्या गुणधर्माचा मनावर परिणाम होतो असे शास्त्र सांगते.

मुख्यतः अन्नाचा उद्देश एकच – शुद्ध, सत्वगुणप्रधान मन व्हावे.  मनोवृत्ति अधिकाधिक प्रमाणात सात्विक, अंतर्मुख, चिंतनशील व्हावी यासाठी साधना आहे.  मनातील रजोगुण व तमोगुण हे अत्यंत स्वाभाविक गुण असून त्यांचे प्रचंड प्राबल्य आपल्या मनावर आढळून येते आणि त्या गुणानुसार काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपूंचे विकार उत्तेजित होतात.  मनाचा क्षोभ, संताप वाढून वृत्ति बहिर्मुख होते.  तमोगुणवृत्ति वृद्धिंगत होते.  साधकाच्या अंतःकरणशुद्धि, श्रवण, मनन, निदिध्यासना व आत्मचिंतन या सर्व साधनेत फार मोठे प्रतिबंध निर्माण करतात.

यासाठी दक्षता म्हणून नियोजनपूर्वक अन्नसेवनाने रजोगुण व तमोगुणाचे प्राबल्य कमी केले पाहिजे.  शरीर, इन्द्रिय व मनाचा दाह व क्षोभ न होता, मन नित्य शांत, तृप्त व प्रसन्न राहील, तसेच शरीर स्वस्थ राहील असा, योग्य प्रमाणात सात्विक आहार साधकाने घ्यावा.  अतिशय चमचमीत, तेलयुक्त, मसालेदार, खूप तिखट व गरमागरम अन्न सेवन करू नये.  खूप गोड पदार्थ खाल्ल्याने मन सुंद होते.  शरीराला जडत्व येते.  शरीराची चपलता व मनाची अंतरिक सावधानता संपुष्टात येऊन आकलनशक्ति काम करेनाशी होते.  मग साधक विवेक, वैराग्य, दैवीगुणसंपत्ति हे गुण कसे अंगी बाणविणार ?

मन हे अति चंचल असल्याने पुन्हा पुन्हा अभ्यासाने अत्यंत आवश्यक गुणांना म्हणजेच, साधनचतुष्टय प्राप्त करणे हे फार कष्टसाध्य आहे.  त्यामुळे प्रथम सत्त्वगुणवृद्धीसाठी शुद्ध, सात्विक आहार अत्यंत आवश्यक आहे.  शरीर व मन सदैव दक्ष, सावध राहील असा शरीराला आवश्यक, संतुलित आहार योग्य प्रमाणात घ्यावा.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

No comments:

Post a Comment