Tuesday, August 12, 2014

ईश्वर आणि जीव | God and Mortal Being



आज स्थूल दृष्टीला जे अनेक भेद दिसतात, ते सर्व मायिक भेद आहेत.  मायेमुळेच अनेक प्रकारच्या उपाधि, जीव निर्माण होतात. जीव – जगत् – ईश्वर हे ही उपाधिजन्य भेद आहेत.  मायाउपाधिमध्ये जीव आणि ईश्वर हे आत्मचैतन्याची पडलेली प्रतिबिंबे आहेत.  
 
शुद्धसत्त्वप्रधानमायाउपाधिउपहितचैतन्य म्हणजेच ‘ईश्वर’ होय आणि अशुद्धसत्त्वप्रधानमायाउपाधिउपहितचैतन्य म्हणजेच ‘जीव’ होय

त्रिगुणात्मक मायाच जीव – जगत् – ईश्वर हे भेद निर्माण करून जीवाच्या बुद्धीवर आवरण घालून जन्मानुजन्मे या संसारचक्रामध्येच बद्ध करते.  मायाच जन्मानुजन्मे जीवाला खेळविते.  आपल्या अवतीभोवती दुसरे जीव निर्माण करते.  शब्द-स्पर्शादि विषय निर्माण करते.  जीवाला आसक्त करून बद्ध करते.  याप्रमाणे एकच चैतन्य अनेक झाल्यासारखे भासते.  

जसे, एकच बिंब आपण जितक्या बादल्यांमध्ये पाणी ठेवू तितकी प्रतिबिंबे पडल्यामुळे अनेक झाल्यासारखे भासते.  परंतु वस्तुतः बादली, पाणी, प्रतिबिंब सर्वच मिथ्या असून बिंबस्थानीय सूर्यच फक्त सत्य आहे.  तसेच, एकच चैतन्य सर्व उपाधींच्यामध्ये अनुस्यूत आहे.  मायिक उपाधीमुळेच ईश्वर-जीव, नियामक-नियम्य हा भेद निर्माण होतो.  त्यामुळेच ईश्वर सर्वांना व्याप्त करतो, ही व्यापनक्रियाही अध्यस्त आहे, उपाधीच्या दृष्टीने आहे.

भगवान गीतेत म्हणतात – “ मी माझ्या अव्यक्त स्वरूपाने सर्वांना व्याप्त केलेले आहे.  सर्व भूतमात्रे माझ्यामध्ये आहेत, परंतु मी मात्र त्या कशामाध्येही नाही.  अर्जुना !  माझ्यामध्येच सर्व भूतमात्रे आहेत आणि हे सर्व माझे ऐश्वर्य तू पाहा. ”



- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

No comments:

Post a Comment