Tuesday, August 5, 2014

चंदन आणि पाण्याचा दृष्टांत | Illustration of Sandal and Water




आचार्य सुंदर दृष्टांत देतात – ज्याप्रमाणे चंदन व उदबत्ती यांचा पाण्याशी संबंध आला तर त्यामधून दुर्गंधी निर्माण होते.  ही दुर्गंधी औपाधिक आहे म्हणजेच पाण्याच्या उपाधीमुळे निर्माण होते.  वस्तुतः चंदन व उदबत्तीचे ‘सुगंध’ हे स्वरूप आहे, परंतु पाण्याच्या उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे त्यामध्ये ‘दुर्गंधी’ हा औपाधिक – आगंतुक गुण येतो.  परंतु नंतर घर्षणाने त्यामधील पाण्याचा अंश जर नाहीसा केला तर पाण्याची उपाधि निरास पावून पुन्हा सुगंध दरवळतो.  त्याचप्रमाणे आत्मचैतन्यामध्ये अविद्येच्या उपाधीमुळे अनेक औपाधिक, आगंतुक गुणधर्म येतात.

स्वतःच्या स्वरूपावर अनादि अविद्येच्या उपाधीमुळे अध्यास झालेला आहे.  आज मला स्वतःला “ मी कोण ? ”  याचे अत्यंत अज्ञान आहे.  क्रमशः पाहिले तर सर्वप्रथम मी माझ्या स्थूल शरीराशी तादात्म्य पावतो.  “मी जन्माला आलो” हीच पहिली कल्पन आहे.  त्यानंतर जन्माच्या अनुषंगाने जे जे निर्माण होते, ते सर्व जन्म-मृत्यु, कर्तृत्व-भोगतृत्व, सुख-दुःख, वर्णाश्रमभेद या सर्व कल्पनाही अध्यस्त आहेत.  मी स्वतःभोवती एकेक करीत अनंत कल्पनांचे जंजाळ, जाले निर्माण करतो आणि त्यामध्येच जन्मानुजन्मे बद्ध होतो.

चंदन आणि पाणी जर वेगवेगळे ठेवले तर दुर्गंध येत नाही.  चंदन आणि पाणी यांचा प्रथम संसर्ग होतो, नंतरच तादात्म्य होते आणि मगच दुर्गंध येतो.  म्हणजेच प्रथम संसर्गअध्यास व नंतर तादात्म्यअध्यास होतो.  तसेच, मी आणि विश्व, विषय, स्थूल शरीर यामध्ये प्रथम संसर्गअध्यास होऊन मी सर्वांशी तादात्म्य पावतो आणि मगच मला हा शोक-मोहात्मक संसार अनुभवाला येतो.

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009

- हरी ॐ

No comments:

Post a Comment