Tuesday, August 19, 2014

अध्यात्माबद्दल कल्पना | Myths about Spiritual Science




एखाद्या साधकाने अध्यात्माबद्दल काही कल्पना केल्या असतील - अध्यात्म शिकल्यावर, श्रवण केल्यावर किंवा साधना केल्यावर, उपनिषदांचे अध्ययन केल्यावर आपल्याला काहीतरी अलौकिक प्राप्ति होईल, कसलातरी साक्षात्कार होईल, दृष्ट वस्तूप्रमाणे ब्रह्म माझ्या हाताला लागेल किंवा मला मोक्ष नावाची वस्तु मिळेल, अशा जर अद्भूद (fantastic) कल्पना घेऊन कोणी या मार्गात प्रवेश करेल, तर अशा साधकाला आचार्य सुरुवातीलाच सावध करतात.  त्याच्या निराधार कल्पना मुळासकट उखडून टाकतात, कारण अध्यात्ममार्गामध्ये आल्यानंतर अनेक संप्रदाय आहेत, परंपरा आहेत.  प्रत्येकजण आपलेच म्हणणे खरे आहे, असे मानतो.  आचार्य अध्यात्माचे सत्य, वास्तव परखड शब्दांच्यामध्ये सांगतात.

व्यावहारिक विद्या शिकून आपल्याला पदव्या मिळतील, मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळेल, एखादी छानशी नोकरी मिळेल, भरमसाठ पगार मिळेल, त्यामुळे सर्व सुखे पायाशी लोळण घेतील.  भौतिक समृद्धीची भरभराट होईल.  एखादे कर्म केले तर त्यामधून ईप्सित फळ प्राप्त होईल.  ज्योतिष्टोम यज्ञाने स्वर्गप्राप्ति होईल, पुत्रकामेष्टि नावाच्या यज्ञाने पुत्रप्राप्ति होईल, अश्वमेध यज्ञाने साम्राज्यप्राप्ति होईल, परंतु अध्यात्मशास्त्र शिकून काय मिळणार आहे ?  ब्रह्मविद्येने साधी दुपारची बाराची भूकही भागणार नाही.

आतापर्यंत सर्व काही केले परंतु काहीच मिळाले नाही, आता थोडे अध्यात्मही करून बघू यात, त्यातून काही मिळते का बघावे ” अशी वृत्ति अध्यात्मामध्ये असता कामा नये, कारण या ज्ञानाने कर्मासारखे दृश्य फळ मिळत नाही.  शास्त्र हे आत्मस्वरूपाचे ज्ञान देण्यासाठी प्रमाणभूत आहे.  शास्त्र हे दर्पणाप्रमाणे आहे. 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

No comments:

Post a Comment