कदाचित आपण स्वप्रयत्नाने महापुरुषांच्या जवळ
जाऊ शकू परंतु त्यांची कृपा मिळेलच असे नाही. याचे कारण प्रत्येकाचे प्रारब्ध ! येथे साधूजवळ आपपर भाव नाही. कृपा सर्वांच्यावर आहे. परंतु ज्यावेळी भाग्य फलोन्मुख होईल किंवा होण्याची
वेळ येईल तेव्हाच ती कृपा मिळेल. मग तुमची
इच्छा असो वा नसो. ते त्यांच्या सामर्थ्याने
आपल्याला जवळ खेचतील. नाहीतर कितीही प्रयत्न
केला तरी मिळणार नाही. अशा काही घटना घडतील
किंवा प्रसंग येतील की आपली श्रद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही. साशंक वृत्ति निर्माण होईल आणि आपण शरीराने कितीही
जवळ असलो तरी मनाने साधुपुरुषाच्या जवळ जाऊ शकत नाही. ते मन त्यांच्यापासून दूर खेचेल.
सर्वजण जरी माहात्म्याजवळ गेले तरी
प्रत्येकाची अंतरिक इच्छा, तीव्रता भिन्न-भिन्न असते, काहींचा परमार्थ आवडीचा असतो,
काहींचा सवडीचा तर काहींचा नडीचा असतो. नडीने
परमार्थ करणारेच जास्त असतात. आवडीने करणारे
फारच थोडे ! म्हणून जशी ज्यांची इच्छा असते
त्याप्रमाणेच त्याला फळ मिळते. त्यामुळे साधुमध्ये भेदभाव नाही. सर्वांचा उद्धार व्हावा हीच त्यांची इच्छा असते.
परंतु आम्ही खरोखरच त्याला अधिकारी आहोत का
? हा प्रश्न आहे. सर्व शिष्यांच्यामधून स्वामी विवेकानंदानाच रामकृष्णांनी
साक्षात्कार दिला. का ? याला व्यावहारिक उत्तर नाही. फक्त एकच त्यांची तीव्र इच्छा, अंतरिक तळमळ ही पराकोटीची
होती.
याचाच अर्थ महात्म्यांचा फक्त शारीरिक संग
किंवा जवळीक असणे म्हणजे त्यांची कृपा नाही तर जेव्हा आमच्या मनात त्यांच्याविषयी अत्यंत
एकनिष्ठा, श्रद्धा, अनन्य प्रेम निर्माण होऊन तीव्र तळमळ निर्माण होईल त्यावेळी मनाने
त्यांच्याशी खरा संग निर्माण होतो आणि त्यावेळीच आमच्यावर त्यांची कृपा होईल. त्यांच्या कृपेने आम्ही संसार पार करू शकू. म्हणून त्यांच्याच कृपेने ते प्राप्त होतात.
-
"नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "Narad
Bhaktisutra" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006
- हरी ॐ –