Tuesday, January 20, 2026

चैतन्यवृत्तीची विविध रूपे भाग २ | Expressions Of Consciousness Part 2

 




हे राघवा !  मन, बुद्धि, अहंकार, चित्त, कर्म, कल्पना, संसृति, वासना, विद्या, प्रयत्न, स्मृति, इंद्रिये, प्रकृति, माया, क्रिया हे सर्व शब्द किंवा यांसारखे अन्यही अनेक शब्द म्हणजे केवळ संसारभ्रम आहे.  अज्ञानी जीव आपले खरे आत्मचैतन्यस्वरूप विसरतो व वर सांगितलेल्या मन वगैरेदि कल्पित उपाधीशी व दृश्याशी तादात्म्य पावून बद्ध होतो.

 

·       स्मृति: “मी ही वस्तु पूर्वी पाहिली की नाही” असा विचार करता करता “मी ही वस्तु पूर्वी निश्चितपणे पाहिली आहे” अशा निर्णयात्मक वृत्तीला ‘स्मृति’ असे म्हणतात.

·       वासना: ज्या पदार्थांचा व त्यांच्या शक्तींचा उपभोग घेतलेला असतो, त्या पदार्थांची पुन्हा तीव्र भावना उत्पन्न होऊन त्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही इच्छा उत्पन्न न होणे.

·       विद्या: “आत्मतत्त्व हे अत्यंत विमल, शुद्ध, मायारहित असून त्याव्यतिरिक्त असणारी द्वैतात्मक दृष्टि ही अस्तित्वातच नाही” याची जी जाणीव होते.

·       विस्मृति: जिला परमपदाचे विस्मरण होते, आत्मविनाशासाठीच जी स्फुरण पावते.

·       इंद्रिय: जी संवित् ऐकणे, स्पर्श करणे, पाहणे, उपभोगणे, गंधग्रहण करणे, विचार करणे वगैरेदि क्रिया करून आपल्या इंद्राला म्हणजे इंद्रियांचा स्वामी असणाऱ्या जीवाला आनंद देते.

·       प्रकृति: ज्या तत्त्वाचा कशानेही निर्देश करता येत नाही, अशा अलक्षित परमात्मस्वरूपामध्ये जी सर्व दृश्य पदार्थांना प्रकर्षाने उत्पन्न करते.

·       माया: जिच्यामुळे वस्तु सत् आहे की असत् आहे, याचा निश्चय बोध होत नाही, जी सहजपणे सत् ला असत् रूपाने दाखविते तर असत् ला सत् रूपाने दाखविते.

·       क्रिया: पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, रसग्रहण करणे, गंधग्रहण करणे, या कर्मांच्यामधून जी कार्यकारण रूप व्यवहाराला प्राप्त होते.

 

हे राघवा !  याप्रमाणे ही संवित् किंवा हे चैतन्यच या दृश्य संसाराचे कारण आहे.  विषयाभिमुख झाल्यामुळे तेच चैतन्य कलंकित होऊन स्फुरण पावते व अनेक गुणधर्मांनी व्यक्त होते.  वरील सांगितलेले सर्व शब्द हे त्या चैतन्यवृत्तीचेच पर्यायी शब्द आहेत.  परमात्मस्वरूपापासून च्युत झालेल्या, अविद्येने कलंकित झालेल्या, नाना संकल्पांनी युक्त असणाऱ्या या चैतन्याच्या वृत्तीलाच ज्ञानी पुरुष मन, बुद्धि वगैरेदि अनेक शब्दांनी संबोधतात.  थोडक्यात जीव काय, मन काय, बुद्धि काय वगैरेदि हे सर्व शब्द चैतन्यला केवळ अविद्येमुळे प्राप्त झाले आहेत.  त्यामुळे हे राघवा! हे सर्व शब्द कल्पित आहेत, हे तू लक्षात घे.


 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, January 13, 2026

आचार्योपासना - १ | Worship of The Teacher - 1

 




आचार्यांची - गुरूंची काया-वाचा-मनाने सेवा करावी. शरीराने सेवा-सुश्रुषा करावी, वाचेने गुरुंचाच महिमा गावा, शास्त्रच बोलवे आणि मनाने सतत गुरुंचेच स्मरण करावे.  या विश्वामध्ये 'सेवा' ही सर्वात अवघड गोष्ट आहे.  ज्याची सेवा करावयाची तेथे पूर्ण श्रद्धा असली पाहिजे.  जेथे पूर्ण श्रद्धा असते तेथेच 'मी' समर्पण होतो.  माझे स्वतःचे व्यक्तिगत रागद्वेष नाहीसे होतात.  तेथेच सेवावृत्ति निर्माण होते.

 

ज्याप्रमाणे सेवक आपले प्रत्येक कर्म आपल्या स्वामीसाठी, मालकासाठी करतो.  तो मालकासाठीच जगत असतो.  स्वतःची आवड-नावड बाजूला ठेऊन तो आपल्या मालकाला ज्यामध्ये आनंद असेल तेच कर्म करतो.  अनेक प्रकारे सेवा करून तो मालकाला सतत आनंदी, प्रसन्न ठेवतो.  त्याप्रमाणे साधकाने गुरूंची सेवा करावी.  गुरूंच्यामध्ये पूर्ण श्रद्धा ठेऊन अनन्य भक्तीने त्यांना शरण जावे.  गुरूंच्यासाठीच जीवन जगावे.  मला काय आवडते यापेक्षा गुरूंना काय आवडते, याचा विचार करावा.  गुरुवाक्य, गुरूंचा शब्द हाच जीवनामधील परम आदेश आहे.  तोच अंतिम शब्द असून प्रमाणभूत आहे.  गुरूंना कधीही 'का?' हा प्रश्न विचारू नये.  गुरूंच्या शब्दाला पर्याय देणे म्हणजे गुरूंची अवज्ञा करणे आहे.  गुरूंचा शब्द हा मंत्रापेक्षाही महान आहे.  रात्रंदिवस, प्रत्येक क्षण गुरूंच्यासाठीच जगावे.  गुरूंशी पूर्णपणे एकरूप व्हावे.

 

संत गुरुनानक म्हणतात -

गुरू की मूरत मन मे ध्यान ।  गुरू के शब्द मंत्र मन मान ।।  

गुरूंनी सांगावे आणि त्या बरहुकुम मी अनुसरण करावे.  गुरूंचा संकल्प तोच माझा संकल्प झाला पाहिजे.  या गुरुमय वृत्तीमध्ये अहंकार, ममकार, रागद्वेष, कामक्रोधादि विकार गळून पडतात.  सर्व विश्वच गुरुमय दिसू लागते.

 

आपल्या सुंदर, स्वच्छ, सुशोभित केलेल्या हृदयसिंहासनावर श्रीगुरूंना प्रेमाने आरूढ करावे.  त्यांची मानसपूजा करावी.  सद्गुण हीच साधकाची खरी संपत्ति आहे.  या सद्गुणरूपी हिरे, पाचू, माणके यांनी ते सिंहासन विभूषित करावे.  अशा प्रकारे उपासना केल्यानंतर गुरु प्रसन्न होतात आणि शिष्याला आत्मज्ञानाचा उपदेश देतात.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, January 6, 2026

विवेकी पुरुष आणि कुलीन स्त्री | Realized Being And Noble Lady

 



हे रामा !  खरोखरच ज्याने विषयांचे दोष यथार्थपणे पाहिले आहेत, तो विवेकी पुरुष चुकूनही विषयभोगांच्यामध्ये आसक्त होत नाही.  तो सत्शास्त्र आणि साधु यांना अविरोधी असणाऱ्या गोष्टींच्यामध्ये रममाण होतो.  याचा अर्थच विवेकी पुरुष दुःसंगाचा त्याग करतो.  सत्संगामध्ये जाऊन सत्शास्त्राचे सेवन करतो.  त्याच्या आयुष्याचा बहुतांश काळ तो सत्संगामध्ये आणि शास्त्रश्रवणामध्ये व्यतीत करतो.  जे जे शास्त्राला, साधनेला, ज्ञानाला पूरक आहेत, अशाच गोष्टींचे तो आचरण करतो.

 

याउलट अज्ञानी, कामुक मनुष्य मात्र एखाद्या व्यभिचारी स्त्रीप्रमाणे पुन्हा-पुन्हा विषयभोगांच्यामध्येच रममाण होतो.  विषयचिंतन, विषयभोग, शास्त्राच्या केवळ शाब्दिक व्यर्थ चर्चा, दांभिकता यामध्येच आयुष्य व्यर्थ घालवितो.  परंतु ज्ञानी पुरुषाचा व्यवहार मात्र अत्यंत नियमित असतो.

 

ज्याप्रमाणे एखादी कुलीन, चारित्र्यसंपन्न असणारी साध्वी स्त्री नेहमी आपल्या अंतःपुरामध्ये अत्यंत संयमित होऊन राहते.  कारणाशिवाय ती बाहेरही येत नाही.  पूर्वीच्या काळी स्त्रिया बाहेर आल्या तरी या आपल्या डोक्यावर पदर घेऊन येत असते.  ही मागासलेली संस्कृती नसून यामागे मानसशास्त्र आहे.  आपला बाह्य व्यवहारही इतका संयमित हवा की, ज्यामुळे आपले स्वतःचे तसेच दुसऱ्याचेही मन विचलित होणार नाही.  प्राचीन काळी एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा साध्वी, कुलीन आणि पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या.  त्या स्त्रिया अबला नव्हत्या, तर मृत्युलाही जिंकण्याचे त्यांच्यामध्ये सामर्थ्य असून त्या दीपशिखेप्रमाणे परमतेजस्वी असणाऱ्या वीरांगना होत्या.  त्यांच्या पातिव्रत्यामध्ये प्रचंड मोठे सामर्थ्य होते.

 

वसिष्ठ मुनि हा दृष्टांत देऊन येथे सांगतात की, ज्ञानी पुरुषाचा व्यवहार सुद्धा अत्यंत संयमित असून तो अंतर्मुख असतो.  सत्शास्त्र व सत्संग याशिवाय तो कोठेही रममाण होत नाही.  तो आपले ज्ञानाचे व्रत निष्ठेने पाळतो.  तो शरीराने विश्वामध्ये राहत असेल तरी मनाने मात्र आपल्या स्वस्वरूपामध्ये रममाण होतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, December 30, 2025

विश्वनिर्मिती – दर्शने | World Creation – Theories

 




विश्वाची निर्मिती कशी झाली ?  कोठून झाली ?  कोणी केली ?  विश्वाचे कारण काय आहे ?  वगैरे अशा अनेक शंका उत्पन्न होतात.  अनेक विचारवंतांनी याविषयी आपापली मते सांगितलेली आहेत.  त्या प्रमुख मतांना “दर्शन” असे म्हटले जाते.  त्यामध्ये जैन, बौद्ध, चार्वाक यांच्यासारखी काही वेदबाह्य अवैदिक म्हणजे वेदांना प्रमाण न मानणारी दर्शने आहेत.  तर मीमांसा न्याय, वैशेषिक, सांख्य, वेदांत यासारखी काही वैदिक म्हणजे वेदांना प्रमाण मानणारी दर्शने आहेत.

 

काही दर्शनांनी कर्ममार्गाचे प्राधान्य मानले.  काहींनी ज्ञानाला तर काहींनी केवळ भक्तीलाच प्राधान्य दिले.  या सर्व दर्शनांची ईश्वर, जीव, विश्व, मोक्ष यांविषयी आपापली भिन्न-भिन्न मते आहेत.  चार्वाकादि काही लोक तर ईश्वराचे अस्तित्व सुद्धा मानीत नाहीत.  ही सर्व मते त्यांच्या-त्यांच्या स्थानामध्ये काही विशिष्ट मर्यादेपर्यंत जरी योग्य वाटली तरी कोणत्याही विचारवंत पुरुषाने तत्त्वाचे यथार्थ व सम्यक् स्वरूप समजावून घेताना या सर्व दर्शनांच्या मर्यादा देखील समजावून घेतल्या पाहिजेत.

 

भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्यांनी या सर्व दर्शनांचा उहापोह करून सर्वांचा समन्वय केला.  तदनंतर या सर्वांच्यामध्ये वेदांतशास्त्रप्रतिपादित अद्वैतसिद्धांत हा सर्वतोपरी असून तेच पारमार्थिक सत्य आहे, हे तर्क, न्याय, युक्ति, श्रुति, स्मृति या सर्वांच्या आधारे आपल्या विस्तृत भाष्यांच्यामधून स्पष्ट केले.  अद्वैत सिद्धांतामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे युक्तियुक्त मिळतात, हे दाखवून दिले.  म्हणूनच आचार्यांचे वैचारिक स्तरावरील हे कार्य केवळ अद्वितीय आहे.

 

परमात्मा आपल्या स्वतःच्या मायाशक्तीच्या साहाय्याने सर्व दृश्य, पदार्थांची निर्मिती करतो.  केवळ परमात्मा विश्वनिर्मिती करू शकत नाही, कारण तो निर्विकारस्वरूप आहे आणि केवळ माया सुद्धा विश्वनिर्मिती करू शकत नाही, कारण माया ही जड, अचेतन असून ती ब्रह्माश्रित आहे.  माया ही परमात्म्याची अविभाज्य शक्ति आहे.  ती प्रत्यक्ष दाखविता येत नाही.  मात्र मायेचे कार्य दाखविता येते.  संपूर्ण चराचर सृष्टि हे मायेचेच कार्य आहे.  माया ही विश्वाचे उपादान कारण आहे.  परमात्मा मायेच्या साहाय्याने विश्वनिर्मिती करतो.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016




हरी ॐ

Tuesday, December 23, 2025

चैतन्यवृत्तीची विविध रूपे भाग १ | Expressions Of Consciousness Part 1

 




हे राघवा !  मन, बुद्धि, अहंकार, चित्त, कर्म, कल्पना, संसृति, वासना, विद्या, प्रयत्न, स्मृति, इंद्रिये, प्रकृति, माया, क्रिया हे सर्व शब्द किंवा यांसारखे अन्यही अनेक शब्द म्हणजे केवळ संसारभ्रम आहे.  अज्ञानी जीव आपले खरे आत्मचैतन्यस्वरूप विसरतो व वर सांगितलेल्या मन वगैरेदि कल्पित उपाधीशी व दृश्याशी तादात्म्य पावून बद्ध होतो.

 

·       मन: अविद्येमुळे चैतन्यस्वरूप कलंकित-विकारयुक्त झाल्यासारखे वाटते व त्यामधून अनेक कल्पना उत्पन्न होतात.  त्या कल्पनांच्यामधून पुढे अनेक उन्मेष म्हणजे “हे योग्य की ते योग्य ?” “हे करावे की ते करावे ?” याप्रकारचे असंख्य प्रश्न निर्माण होतात.  संकल्प-विकल्पयुक्त असणाऱ्या चैतन्याच्या या अविद्याकल्पित स्थितीला ‘मन’ असे म्हणतात.

·       बुद्धि: या संकल्प विकल्पांच्यामधून कोणतीतरी एक निश्चित व निर्णयात्मक वृत्ति उदयाला येते.  त्या वृत्तीमध्ये निर्णय घेण्याचे सामर्थ्य असल्यामुळे तिला इयत्ताग्रहणक्षमा असे म्हटले जाते. तिचेच ‘बुद्धि’ असे नाव आहे.

·       अहंकार: ज्यामध्ये मिथ्या अभिमान उत्पन्न होऊन स्वतःच्या स्वतंत्र सत्तेची कल्पना केली जाते, त्या बुद्धीला ‘अहंकार’ अशी संज्ञा आहे.

·       चित्त: जी वृत्ति एखाद्या लहान बालकाप्रमाणे एक विषय सोडून दुसरा, दुसरा विषय सोडून तिसरा याप्रमाणे एकामागून एक भिन्न भिन्न विषयांचे स्मरण, अनुसंधान करीत राहते.

·       कर्म: चैतन्याची जी वृत्ति जीवाकडून असत् स्वरूपाचे स्पंदन करवून घेते, तसेच जी त्या क्रियेच्या फळामागे धावते, स्पंदन हाच जिचा धर्म आहे.

·       कल्पना: काकतालीय न्यायाप्रमाणे जी आपल्या स्वस्वरूपाच्या निश्चयाचा त्याग करून म्हणजे स्वस्वरूपाला विसरून दृश्य विषयाची भावना करू लागते, ती चैतन्याची वृत्ति.

 

हे राघवा !  याप्रमाणे ही संवित् किंवा हे चैतन्यच या दृश्य संसाराचे कारण आहे.  विषयाभिमुख झाल्यामुळे तेच चैतन्य कलंकित होऊन स्फुरण पावते व अनेक गुणधर्मांनी व्यक्त होते.  वरील सांगितलेले सर्व शब्द हे त्या चैतन्यवृत्तीचेच पर्यायी शब्द आहेत.  परमात्मस्वरूपापासून च्युत झालेल्या, अविद्येने कलंकित झालेल्या, नाना संकल्पांनी युक्त असणाऱ्या या चैतन्याच्या वृत्तीलाच ज्ञानी पुरुष मन, बुद्धि वगैरेदि अनेक शब्दांनी संबोधतात.  थोडक्यात जीव काय, मन काय, बुद्धि काय वगैरेदि हे सर्व शब्द चैतन्यला केवळ अविद्येमुळे प्राप्त झाले आहेत.  त्यामुळे हे राघवा! हे सर्व शब्द कल्पित आहेत, हे तू लक्षात घे.


 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, December 16, 2025

प्रसंगांना सामोरे जाण्याची विद्या | The Skill of Facing Situations

 



जीवनात प्रत्येक प्रसंग, नव्हे, प्रत्येक क्षण हा नवीन, वैशिष्ठ्यपूर्ण आहे.  त्यामुळे निराश उद्विग्न, पूर्वग्रहदूषित मानाने प्रसंगांना सामोरे जाण्यापेक्षा स्वच्छ, शुद्ध, प्रसन्न मानाने त्याचा अनुभव घेतला पाहिजे.  या सर्व विश्वामध्ये आनंदच भरून उरला आहे.  फक्त तो अनुभवता आला पाहिजे.  इंग्रजीमध्ये खूप सुंदर म्हटले जाते - Enjoy the sorrows.  अशी आपली प्रसन्न वृत्ति ठेवावी.

 

यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच सर्व प्रसंगांचा आपण साकल्याने विचार करावा.  या सर्व प्रसंगांना कारण मी भूतकाळात केलेले कर्मच आहे.  मी पूर्वी केलेल्या चांगल्या-वाईट कर्मांची फळे म्हणजेच आजचे जीवन आहे.  माझ्या प्रारब्धानुसारच मी जीवन जगत असतो.  प्रारब्धाचा कधीही त्याग करता येत नाही.  प्रारब्ध हे उपभोगुनच संपविले पाहिजे.  प्रारब्धानुसार जे घडणार नसेल ते कितीही प्रयत्न करूनही घडणार नाही आणि जे घडणार आहे - ते घडणारच !  त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही.  यामुळे प्रसंगांना सामोरे जाणे, हाच पुरुषार्थ आहे.

 

तिसरी दृष्टि - जे जे आपल्या जीवनात घडते ते सर्व माझ्या हितासाठीच घडते.  या विश्वनियंत्याच्या योजनेप्रमाणे प्रत्येक घटना घडत असते.  एका घटनेचा संबंध दुसऱ्या घटनेशी असतो.  आपण साधक असल्यामुळे सतत लक्षात ठेवावे की, परमेश्वरच आपल्या जीवनात चांगले-वाईट प्रसंग निर्माण करतो.  आपण कर्तृत्वाने त्यामधून बाहेर येऊ शकत नाही.  त्याचवेळी आपण अत्यंत अगतिक, व्याकुळ होतो.  परमेश्वराचा धावा करतो.  आपला अहंकार परमेश्वराला शरण जातो.  अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येच श्रद्धा, निष्ठा, धैर्य, आत्मविश्वास, त्याग, प्रेम, भक्ती या दैवी गुणांचा उत्कर्ष होतो.  म्हणून साधकाने सर्व प्रसंगांना आनंदाने सामोरे जावे.

 

चौथी दृष्टि - साधकाच्या जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग ही त्याची परीक्षाच आहे.  प्रतिकूल प्रसंगांच्यामध्येच सद्गुणांची, दैवी गुणांची परीक्षा होते.  सर्व सुरळीत (smooth) चालले आहे तोपर्यंत कोणीही परमेश्वरावर श्रद्धा ठेवेल.  परंतु जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात, मोठमोठी संकटे येऊन मनावर आघात करतात, तेव्हा परमेश्वरावरील, गुरूंच्यावरील श्रद्धा, निष्ठा डळमळीत होते.  स्वतःच्या जीवनावरील विश्वास सुद्धा उडून जातो.  हीच खरी परीक्षा आहे.  ही परीक्षा हळुहळू अवघड होत जाते.  


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ