जसे वाळवंटामध्ये वाळूवर पाणी दिसले तरी ते पाणी
भासमान असते. आकाशामध्ये दिसणारे ढग व त्यामधून
निर्माण झालेले विविध आकार क्षणाक्षणाला बदलणारे असून ते काल्पनिक असतात. केळीच्या खांबामध्ये आत-आत शोधत गेले तर त्यामध्ये
काहीच सापडत नाही. जागृत झाल्यानंतर स्वाप्निक
पदार्थ प्रत्यक्ष अनुभवायला येत नाहीत. किंवा
दोरीमध्ये दिसणारा साप हा अत्यंत मिथ्या असतो.
याप्रमाणेच संसार हा अत्यंत भासमान, काल्पनिक,
निःसार आहे हे समजले की, येथिल सुखदुःखांचा मनावर परिणाम होत नाही. म्हणून सुखदुःखात्मक संसाराचा नाश करण्यासाठी ज्ञानाची
आवश्यकता आहे. जसे चित्रामधील सर्पाचे
सर्पत्व ज्ञानाने नष्ट होते, त्याचप्रमाणे संसाराला दिलेले सत्यत्व या ग्रंथाच्या ज्ञानाने
नष्ट होते.
हे रामा ! संसाराचे हे मिथ्यात्व समजावून घेणे म्हणजेच ज्ञान
प्राप्त करणे ही अतिशय सोपी गोष्ट आहे. अरे रामा ! काही फुले हातात घेऊन चिरडून टाकायची असतील तरी सुद्धा
काही प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु आत्मस्वरूपाच्या
प्राप्तीमध्ये तितकेही प्रयत्न लागत नाहीत. फुले हातात घेतल्यावर त्यावर दुसऱ्या हाताचा जोर
द्यावा लागतो. थोडा प्रयत्न करावा लागतो. परंतु मोक्षप्राप्तीसाठी स्थूल शरीराच्या लेशमात्र
प्रयत्नांची आवश्यकता नसते.
अरे रामा ! मनुष्याला जेवायला सुद्धा थोडे कष्ट पडतात. झोपायचे
असेल तरी थोडे कष्ट आहेत. परंतु परमार्थाच्या
प्राप्तीमध्ये इतके सुद्धा कष्ट लागत नाहीत रे ! इतकेच नव्हे तर एका क्षणामध्ये, क्षणाच्या अंशामध्ये
सुद्धा परमार्थाची प्राप्ति होऊ शकते. येथे
इंद्रियांची, शरीराची थोडीही हालचाल करण्याची आवश्यकता भासत नाही. थोडे सुद्धा कष्ट लागत नाहीत. मात्र येथे बुद्धीचा निरोध करणे आवश्यक असते.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–













