Tuesday, December 23, 2025

चैतन्यवृत्तीची विविध रूपे भाग १ | Expressions Of Consciousness Part 1

 




हे राघवा !  मन, बुद्धि, अहंकार, चित्त, कर्म, कल्पना, संसृति, वासना, विद्या, प्रयत्न, स्मृति, इंद्रिये, प्रकृति, माया, क्रिया हे सर्व शब्द किंवा यांसारखे अन्यही अनेक शब्द म्हणजे केवळ संसारभ्रम आहे.  अज्ञानी जीव आपले खरे आत्मचैतन्यस्वरूप विसरतो व वर सांगितलेल्या मन वगैरेदि कल्पित उपाधीशी व दृश्याशी तादात्म्य पावून बद्ध होतो.

 

·       मन: अविद्येमुळे चैतन्यस्वरूप कलंकित-विकारयुक्त झाल्यासारखे वाटते व त्यामधून अनेक कल्पना उत्पन्न होतात.  त्या कल्पनांच्यामधून पुढे अनेक उन्मेष म्हणजे “हे योग्य की ते योग्य ?” “हे करावे की ते करावे ?” याप्रकारचे असंख्य प्रश्न निर्माण होतात.  संकल्प-विकल्पयुक्त असणाऱ्या चैतन्याच्या या अविद्याकल्पित स्थितीला ‘मन’ असे म्हणतात.

·       बुद्धि: या संकल्प विकल्पांच्यामधून कोणतीतरी एक निश्चित व निर्णयात्मक वृत्ति उदयाला येते.  त्या वृत्तीमध्ये निर्णय घेण्याचे सामर्थ्य असल्यामुळे तिला इयत्ताग्रहणक्षमा असे म्हटले जाते. तिचेच ‘बुद्धि’ असे नाव आहे.

·       अहंकार: ज्यामध्ये मिथ्या अभिमान उत्पन्न होऊन स्वतःच्या स्वतंत्र सत्तेची कल्पना केली जाते, त्या बुद्धीला ‘अहंकार’ अशी संज्ञा आहे.

·       चित्त: जी वृत्ति एखाद्या लहान बालकाप्रमाणे एक विषय सोडून दुसरा, दुसरा विषय सोडून तिसरा याप्रमाणे एकामागून एक भिन्न भिन्न विषयांचे स्मरण, अनुसंधान करीत राहते.

·       कर्म: चैतन्याची जी वृत्ति जीवाकडून असत् स्वरूपाचे स्पंदन करवून घेते, तसेच जी त्या क्रियेच्या फळामागे धावते, स्पंदन हाच जिचा धर्म आहे.

·       कल्पना: काकतालीय न्यायाप्रमाणे जी आपल्या स्वस्वरूपाच्या निश्चयाचा त्याग करून म्हणजे स्वस्वरूपाला विसरून दृश्य विषयाची भावना करू लागते, ती चैतन्याची वृत्ति.

 

हे राघवा !  याप्रमाणे ही संवित् किंवा हे चैतन्यच या दृश्य संसाराचे कारण आहे.  विषयाभिमुख झाल्यामुळे तेच चैतन्य कलंकित होऊन स्फुरण पावते व अनेक गुणधर्मांनी व्यक्त होते.  वरील सांगितलेले सर्व शब्द हे त्या चैतन्यवृत्तीचेच पर्यायी शब्द आहेत.  परमात्मस्वरूपापासून च्युत झालेल्या, अविद्येने कलंकित झालेल्या, नाना संकल्पांनी युक्त असणाऱ्या या चैतन्याच्या वृत्तीलाच ज्ञानी पुरुष मन, बुद्धि वगैरेदि अनेक शब्दांनी संबोधतात.  थोडक्यात जीव काय, मन काय, बुद्धि काय वगैरेदि हे सर्व शब्द चैतन्यला केवळ अविद्येमुळे प्राप्त झाले आहेत.  त्यामुळे हे राघवा! हे सर्व शब्द कल्पित आहेत, हे तू लक्षात घे.


 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, December 16, 2025

प्रसंगांना सामोरे जाण्याची विद्या | The Skill of Facing Situations

 



जीवनात प्रत्येक प्रसंग, नव्हे, प्रत्येक क्षण हा नवीन, वैशिष्ठ्यपूर्ण आहे.  त्यामुळे निराश उद्विग्न, पूर्वग्रहदूषित मानाने प्रसंगांना सामोरे जाण्यापेक्षा स्वच्छ, शुद्ध, प्रसन्न मानाने त्याचा अनुभव घेतला पाहिजे.  या सर्व विश्वामध्ये आनंदच भरून उरला आहे.  फक्त तो अनुभवता आला पाहिजे.  इंग्रजीमध्ये खूप सुंदर म्हटले जाते - Enjoy the sorrows.  अशी आपली प्रसन्न वृत्ति ठेवावी.

 

यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच सर्व प्रसंगांचा आपण साकल्याने विचार करावा.  या सर्व प्रसंगांना कारण मी भूतकाळात केलेले कर्मच आहे.  मी पूर्वी केलेल्या चांगल्या-वाईट कर्मांची फळे म्हणजेच आजचे जीवन आहे.  माझ्या प्रारब्धानुसारच मी जीवन जगत असतो.  प्रारब्धाचा कधीही त्याग करता येत नाही.  प्रारब्ध हे उपभोगुनच संपविले पाहिजे.  प्रारब्धानुसार जे घडणार नसेल ते कितीही प्रयत्न करूनही घडणार नाही आणि जे घडणार आहे - ते घडणारच !  त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही.  यामुळे प्रसंगांना सामोरे जाणे, हाच पुरुषार्थ आहे.

 

तिसरी दृष्टि - जे जे आपल्या जीवनात घडते ते सर्व माझ्या हितासाठीच घडते.  या विश्वनियंत्याच्या योजनेप्रमाणे प्रत्येक घटना घडत असते.  एका घटनेचा संबंध दुसऱ्या घटनेशी असतो.  आपण साधक असल्यामुळे सतत लक्षात ठेवावे की, परमेश्वरच आपल्या जीवनात चांगले-वाईट प्रसंग निर्माण करतो.  आपण कर्तृत्वाने त्यामधून बाहेर येऊ शकत नाही.  त्याचवेळी आपण अत्यंत अगतिक, व्याकुळ होतो.  परमेश्वराचा धावा करतो.  आपला अहंकार परमेश्वराला शरण जातो.  अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येच श्रद्धा, निष्ठा, धैर्य, आत्मविश्वास, त्याग, प्रेम, भक्ती या दैवी गुणांचा उत्कर्ष होतो.  म्हणून साधकाने सर्व प्रसंगांना आनंदाने सामोरे जावे.

 

चौथी दृष्टि - साधकाच्या जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग ही त्याची परीक्षाच आहे.  प्रतिकूल प्रसंगांच्यामध्येच सद्गुणांची, दैवी गुणांची परीक्षा होते.  सर्व सुरळीत (smooth) चालले आहे तोपर्यंत कोणीही परमेश्वरावर श्रद्धा ठेवेल.  परंतु जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात, मोठमोठी संकटे येऊन मनावर आघात करतात, तेव्हा परमेश्वरावरील, गुरूंच्यावरील श्रद्धा, निष्ठा डळमळीत होते.  स्वतःच्या जीवनावरील विश्वास सुद्धा उडून जातो.  हीच खरी परीक्षा आहे.  ही परीक्षा हळुहळू अवघड होत जाते.  


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, December 9, 2025

सम्यक यथार्थ ज्ञान | Comprehensive Knowledge

 




हे रामा !  एखाद्या लहान मुलापासून सुद्धा युक्तियुक्त वचन ग्रहण करावे.  परंतु प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी युक्तिविरहित वचन केले तर शूद्र असणाऱ्या गवताप्रमाणे त्याचा त्याग करावा.  याचे कारण हे रामा !  ज्ञान म्हणजे कोणाच्या बुद्धिमधील कल्पना किंवा कोणाचे व्यक्तिगत मत होऊ शकत नाही.  शास्त्रकार सांगतात - ज्ञानं न पुरुषतन्त्रत्वात् |  ज्ञानं न वस्तुतन्त्रत्वात् इति |  ज्ञान हे ज्ञान देणाऱ्या किंवा ज्ञान घेणाऱ्या पुरुषावर अवलंबून नसते.  तर ज्ञान हे ज्ञेय वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून असते.

 

ज्ञानामध्ये स्वतःच्या कल्पना, मते, रागद्वेष किंवा आवड-नावड येऊ शकत नाही.  ज्ञानामध्ये "मला काय वाटते" याला कोणतेही महत्त्व नाही.  उदा. साखर गोड आहे हे, साखरेचे ज्ञान आहे.  एखाद्या मनुष्याला साखर तिखट वाटली, म्हणून साखर तिखट होत नाही.  साखर ही कोणत्याही स्थानामध्ये, कोणत्याही काळामध्ये गोडच राहते.  ज्ञानामध्ये आपण स्वतःचे कोणतेही मत घालू शकत नाही.  यालाच वस्तूचे यथार्थ ज्ञान म्हणतात.

 

याप्रमाणेच आत्मस्वरूपाचे ज्ञान दिले गेले पाहिजे.  स्वतःचे मत न सांगता तसेच शास्त्रामधील कोणताही भाग न वगळता जसे आहे तसे यथार्थ, सम्यक् ज्ञान जो देऊ शकतो, तोच खरा ब्रह्मविद्येचा वक्ता किंवा आचार्य होऊ शकतो.  मग तो बालक किंवा वृद्ध कोणीही असो, त्याचे शास्त्रप्रणित व युक्तियुक्त असणारे वचन साधकाने ग्रहण करावे.  परंतु ब्रह्मदेव म्हणजे येथे गृहीत धरावे की, एखादा अत्यंत विद्वान प्रसिद्ध असणारा मनुष्य शास्त्र सोडून युक्तिरहित किंवा युक्तिविरुद्ध वचन बोलत असेल तर ते वचन गवताच्या काडीप्रमाणे निकृष्ट मानून त्याचा त्याग करावा.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ



Tuesday, December 2, 2025

दुःसंगाचा त्याग का करावा ? | Why Give Up Inferior Company ?

 



दुःसंग कोणता ?  साधुसंतांच्या संगापासून दूर नेणारा, आपल्या श्रद्धा, भक्तीचे खंडन करणारा, त्याचा उपहास करणारा, मन अधिक विषयाभिमुख करून उपभोगण्याची लालसा वाढविणारा, विषयसेवनामध्ये प्रवृत्त करणारा, मन अशुद्ध, कलुषित, विकारी करून क्षुब्ध करणारा, सद्गुणांचा किंवा दैवीगुणसंपत्तीचा ऱ्हास करणारा, मनाचे संयमन किंवा संतुलन तोडणारा, सत्कर्मामधून परावृत्त करून असत्कर्मामध्ये, पापाचरणामध्ये प्रवृत्त करणारा कोणताही संग हा दुःसंग आहे.  मग तो व्यक्तीचा संग असेल किंवा विषय, प्रसंग वगैरेंचा संग असेल.  त्या सर्वांचा प्रयत्नपूर्वक विवेकाने मनाचा तोल ठेऊन त्याग करावा.  जो शास्त्रविधीचा त्याग करून स्वकामनेने प्रेरित होऊन त्यानुसार आचरण करतो त्याला आत्मसिद्धि मिळत नाही, सुखही मिळत नाही.  इतकेच नव्हे तर उत्तम गति सुद्धा मिळत नाही.

 

दुःसंगाचा त्याग का करावा ?  परमेश्वर अभिमानाचा द्वेष करणारा आहे.  तसेच त्याचे प्रेम, भक्ति कामनारहित आहे.  त्यामुळे ईश्वरभक्ति आणि अहंकार, विषयकामना परस्परविरुद्ध आहेत.  म्हणून परमेश्वर हाच माझा प्रियतम असेल तर माझे कर्तव्य काय आहे ?  जे जे परमेश्वराला प्रिय आहे तेच करणे योग्य आहे.  आपल्या हातून असे कर्म व्हावे की ते ईश्वराभिमुख असेल ज्यामुळे तो संतुष्ट होईल, प्रसन्न होईल, आपल्यावर त्याची सतत कृपा राहील.  आणि जे ईश्वराला अप्रिय असेल ते कर्म आपल्याकडून घडू नये.  याचाच अर्थ प्रत्येक कर्म त्याला अर्पण करणे, त्याच्यासाठी करणे हेच प्रेमाचे लक्षण आहे.

 

जे कर्म माझ्याकडून अपेक्षित आहे, योग्य आहे, ईश्वरस्वरूपाकडे नेणारे आहे ज्यामुळे मन शुद्ध, अंतर्मुख होईल असे कार्य करावे.  त्याव्यतिरिक्त सर्व कर्मांचा, संगाचा त्याग करावा.  याचे कारण, विषयावर प्रेम आणि ईश्वरावर प्रेम दोन्ही शक्य नाही.  एकावरच प्रेम केले पाहिजे.  प्रियतम एकच हवा तरच मनाची स्थिरता, एकाग्रता शक्य आहे.  यासाठी विषयांचा संग, प्राकृत बुद्धीच्या लोकांचा संग, अहंकारी, उन्मत्त, आसुरी गुणयुक्त लोकांचा संग, नास्तिक पाखंडी लोकांचा संग, उपभोगात रमणाऱ्या लोकांचा संग यांचा सर्वथा त्याग करावा.  त्याशिवाय आपले मन विषयांच्यापासून निवृत्त होणार नाही.  ईश्वराभिमुख होणार नाही.

 

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ




Tuesday, November 25, 2025

कर्म म्हणजेच मन आहे | Action Itself Is Mind

 



या अनंत, सर्वशक्तिमान, महान असणाऱ्या आत्मतत्त्वापासून उत्पन्न झालेल्या संकल्पशक्तीच्या रूपाला 'मन' असे म्हणतात.  म्हणून संकल्प म्हणजेच मन आहे. "हे सत् आहे की असत् आहे ?"  याप्रमाणे मनुष्यामध्ये जो अस्थिर भाव उत्पन्न होतो,  जेथे निश्चय झालेला नसतो, त्या द्वंद्वात्मक भावाला मन असे म्हणावे.  या अवस्थेमध्ये दोलायमान स्थिति असते. "हे की ते?" अशी संभ्रमावस्था असते.

 

ज्या स्थितीमध्ये जीव प्रकाशस्वरूप आत्मचैतन्याला जाणत नाही, त्यामुळे तो अज्ञानी जीव स्वतःला कर्म करणारा कर्ता म्हणवून घेतो, जीवाच्या या भ्रामक अवस्थेलाच मन असे म्हणतात.  हे राघवा !  कल्पनेशिवाय व क्रियाशक्तिशिवाय मनाचे अस्तित्व शक्य नाही.  ज्याप्रमाणे या जगात गुणहीन मनुष्य गुणी असू शकत नाही, त्याचप्रमाणे मन कल्पनेशिवाय आणि क्रियाशक्तिशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही.  म्हणून जेथे जेथे कल्पना व कर्म दिसते तेथे मन आहेच.  कारण सर्व कल्पना व कर्मे यांचे उगमस्थान मन आहे.

 

हे रामा !  ज्याप्रमाणे अग्नि आणि उष्णता या दोन्हींची सत्ता भिन्न नसते, त्याचप्रमाणे कर्म व मन एकरूप असतात.  तसेच जीव व मनही एकरूप असतात. म्हणून 'कर्म-मन' व 'जीव-मन' हेही भिन्न नाहीत.  त्यामुळे सिद्ध होते की, कर्म आणि जीव हेही एकरूपच आहेत.  आपल्या संकल्परूप शरीराने म्हणजे चित्तरूपी कर्माने व कर्मफळांच्या रूपाने या जगाचा भयंकर मोठा विस्तार केला आहे.  सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर, चित्त संकल्प करते, त्यामुळे जीव कर्म करतो.  मग त्या जीवाला कर्माचे फळ प्राप्त होते.  अनेकविध योनि प्राप्त होतात.  याप्रमाणे संसाराचा विस्तार होतो.

 

वासना व कल्पनांचा विस्तार म्हणजेच हे जग आहे.  या विश्वामध्ये ज्या ज्या जीवाने ज्या पदार्थामध्ये जशी वासना निर्माण केली असेल ती वासनाच त्याला तसतसे फळ प्राप्त करवून देते. म्हणजे वासनेनेच कर्म घडते व कर्मानुरूप जीवाला फळ प्राप्त होते.  म्हणून हे राघवा !  मनस्पंदनरूपी कर्म हेच या संसार वृक्षाचे बीज आहे.  सर्व क्रिया म्हणजे विविध शाखा असून कर्मफळे म्हणजे या संसारवृक्षाची विचित्र फळे आहेत.  थोडक्यात मनापासूनच हा सर्व संसारवृक्ष उत्पन्न होतो.  मन जसजसे कल्पना करते तसतशी इंद्रिये त्या त्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतात.  म्हणून "कर्म म्हणजे मन आहे" असे म्हटले आहे.  


 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, November 18, 2025

सुखप्राप्ति - मनुष्याचे कर्तव्य | Bliss – The Duty of Human Life

 




आपण आपल्या जीवनाचे निरीक्षण केले तर समजते की, जन्मल्यापासून मृत्युपर्यंत आपण अनेक विषय पाहातो, त्यांचा यथेच्छ उपभोग घेतो.  त्या उपभोगामधून सुख मिळविण्याचा आपण प्रयत्न करतो.  या विषयामधून मला सुख मिळेल, अशी खुळी कल्पना करून तो विषय उपभोगतो.  एका विषयामागून दुसरा, तिसरा असे असंख्य अगणित, कोट्यवधी विषय उपभोगतो. विषयसंग्रह करतो.  धन, संपत्ति, यश, प्रतिष्ठा, सत्ता, कीर्ति, मान-सन्मान सर्वकाही प्राप्त करतो.  परंतु, खरोखरच या सर्वांच्यामधून आपण सुखी झालो आहोत का ?

 

विषयोपभोग घेत असताना निश्चितपणे सुखाचा भास होतो.  सुख मिळाल्यासारखे वाटते.  पण छे !  दुसऱ्याच क्षणी आपल्या हातून ते सुख निसटून जाऊन आपण पूर्ववत्, कदाचित् पूर्वीपेक्षा अधिकच दुःखी (miserable) होतो.  हीच जीवनाची शोकांतिका आहे.

 

विषयांच्या या बाजारामध्ये आपण जीवन जगतो, व्यवहार करतो, हसतो, खेळतो.  परंतु निरागस, निर्भेळ, शाश्वत आनंद मात्र प्राप्त होत नाही.  विषयांच्यामधून खरोखरच जर आनंद मिळत असेल तर जो या विश्वामध्ये सर्वाधिक श्रीमंत मनुष्य आहे, तो सर्वात 'सुखी' झाला असता.  परंतु दुर्दैवाने तसे होत नाही.  सुख हे विषयांच्यामध्ये नाही.  त्याप्रमाणेच अन्य घटपटादि विषयांच्याप्रमाणे 'सुख' ही बाजारपेठेत पैसे देऊन विकत मिळणारी एखादी वस्तुही नाही.  या विश्वात सर्वकाही पैशाने मिळते.  परंतु लाखो, कोटयवधी रुपये मोजूनही कोठेही 'सुख' मात्र मिळत नाही.

 

मग प्रश्न निर्माण होईल की, अंतरिक, शाश्वत सुख कोठे आहे ?  समर्थ रामदास म्हणतात -  

जगी सर्वसूखी असा कोण आहे ।  विचारी मना तूचि शोधूनि पाहे ।।           (मनोबोध )

आपल्याला हवे असणारे अंतरिक सुख हे बाहेर विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये नसून आपल्या आतच अंतरंगामध्ये आहे.  आज ज्याठिकाणी मला नैराश्य, वैफल्य, दुःख, द्वन्द्व, संघर्ष अनुभवाला येतात त्याच अंतःकरणामध्ये आपण सुखाचा शोध घेतला पाहिजे.  तो आनंद, शाश्वत, चिरंतन सुख प्राप्त करणे, हेच प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ