Tuesday, September 16, 2025

योग वासिष्ठ ग्रंथपद्धती | Yog Vasishtha Methodology

 




योग वासिष्ठ ग्रंथामधून सांगितलेले शास्त्र हे काल्पनिक नाही किंवा व्यक्तिगत मत नाही.  तर या संहितेमधील प्रत्येक वाक्य व प्रत्येक शब्द हा युक्तिवाद व अर्थयुक्त आहे.  म्हणजेच युक्ति, न्याय, तर्क, अर्थ, गूढार्थ, शास्त्रप्रमाण या सर्वांनी युक्त असणारा प्रत्येक शब्द आहे.  सर्व विधानांना युक्तीचा व प्रमाणाचा आधार आहे.  तसेच हे ज्ञान व्यवस्थितपणे भिन्न-भिन्न विभाग पाडून विषयाप्रमाणे व्यवस्थित क्रमाने सांगितलेले आहे.  येथे कोठेही गोळाबेरीज नाही.

 

वसिष्ठमुनि येथे अतिशय स्पष्टपणे आपल्या ग्रंथाची पद्धती आणि भूमिका स्पष्ट करीत आहेत.  याचे कारण सगळीकडून काहीतरी गोळा करणे आणि सगळेच एकत्र करून उपमा-अलंकार वापरणे म्हणजे ज्ञान नव्हे !  वसिष्ठ मुनींनी येथे ज्ञान देताना भिन्न-भिन्न विषयांचे पृथक्करण करून त्यांची क्रमाने अत्यंत व्यवस्थित मांडणी केली आहे.

 

या ग्रंथामध्ये सहा प्रकरणे आहेत. जसे व्यावहारिक शिक्षण घ्यावयाचे असेल तरी पहिली, दुसरी याच क्रमाने जावे लागते.  प्रथम अक्षरओळख, शब्दओळख नंतर वाक्यओळख, निबंध, रसग्रहण, असाच क्रम कोणत्याही शास्त्रामध्ये असतो.  विषयानुसार विभाग पाडले जातात.  तसेच वसिष्ठ मुनींनी या ग्रंथाचे सहा प्रकरणामध्ये विभाजन केले आहे.  यामधून ज्ञान देताना अनेक दृष्टांत सारसूक्ते योजलेली आहेत.  उत्तम, मध्यम, अधम अशा सर्वच अधिकाऱ्यांना समजायला सोपे जावे म्हणून सुंदर दृष्टांत, आख्याने, स्तवने यांचा समावेश केला आहे.

 

मुळातच अध्यात्म हा विषय अवघड व गंभीर आहे.  त्यामुळे साधक केवळ ज्ञानाचे दीर्घकाळ श्रवण करू शकत नाही.  शाब्दिक ज्ञानाने बुद्धि थकते.  परंतु तेच ज्ञान कथेमधून सांगितले की कंटाळा येत नाही.  दृष्टांत देऊन सांगितले की समजायला सोपे जाते.  ज्ञान घेण्यामध्ये आनंद येतो.  श्रवणामध्ये रूचि उत्पन्न होते.  तसेच, हे सर्व ज्ञान अत्यंत युक्तियुक्त आहे.  म्हणून एखादा बुद्धिनिष्ठ मनुष्य सुद्धा यावर आक्षेप घेऊ शकत नाही आणि आक्षेप घेतला तरी त्याची समग्र उत्तरे या ग्रंथामध्ये आलेली आहेत.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ



Tuesday, September 9, 2025

साधकाचा पुरुषार्थ | Prime Effort Of A Seeker

 



मुमुक्षूने, साधकाने कोणता पुरुषार्थ करावा ?  देवर्षि नारद सांगतात माहात्म्यांचा सत्संग करावा आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी साधकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावा.  नव्हे, सर्व साधना करावी.  म्हणून शास्त्रामध्ये जी साधने सांगितलेली आहेत - पूजा, अर्चना, व्रत, वैकल्य, उपवास, उपासना, यज्ञ, याग, भजन, कीर्तन वगैरेदि सर्व निःस्वार्थपणे सातत्याने करावीत.  त्या सर्वांचा परिपाक म्हणजे महात्माप्राप्ति होय.  हेच सर्व साधनेचे फळ आहे.  महात्मा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ईश्वरपूजा, सेवा, ईश्वरउपासना, श्रद्धेने आणि निष्ठेने अखंड नियमित करावी, त्याचे फळ म्हणजे आपले मन हळूहळू शुद्ध होते.  अंतर्मुख होते आणि योग्य वेळी आपल्या आयुष्यात महात्मा येतो.  नव्हे महात्मा आहे हे आपल्याला समजते.

 

शास्त्रकार म्हणतात आपण महात्म्याला शोधावयास जाण्याची गरज नाही तर महात्मा आपोआप जीवनात येतो.  त्यासाठी ततपूर्वी आपली योग्य तयारी असली पाहिजे नाहीतर तो आला तरी समजण्याची पात्रता असणार नाही.  म्हणून जेव्हा तयारी होते तेव्हा महात्मा भेटतो.  हृदयाला हृदय भिडते.  शिष्याला गुरु आणि गुरूंना शिष्य भेटतो.  त्याच्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करा की, "हे परमेश्वरा !  मला सद्बुद्धि दे.  मला ऐश्वर्य नको, स्वर्ग नको, काहीही नको.  फक्त महात्म्यांचा सत्संग होऊ दे.  माझ्याकडून त्यांची सेवा घडू दे.  माझी श्रद्धा, निष्ठा, भक्ति त्यांच्यामध्ये राहू दे.  त्यांच्याव्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टींचा मला विसर पडू दे.  माझे लक्ष त्यांच्यातच राहू दे.  त्यांनी दिलेला उपदेश माझ्या मनावर ठासून आत्मसात होऊ दे."

 

भगवान म्हणतात -

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ||                         (गीता अ. ४-३४)

साधूंना अनन्य भावाने शरण जावे.  त्यांची सेवा करावी आणि त्यांना प्रसन्न करावे.  संतुष्ट करावे.  म्हणजेच परमेश्वरही संतुष्ट होतो.  त्यामुळे कृपा होऊन आमच्या अंतःकरणात परमेश्वराचे अनन्य प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचा उदय होईल.  त्यांच्या कृपेनेच आमच्या जीवनात अंतरिक शांति, समाधान येईल.  जीवनाला पूर्णता येईल.  म्हणून साधुसंग मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत.  साधना करावी.

 

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ




Tuesday, September 2, 2025

जीवाचे दीर्घस्वप्न | Prolonged Nightmare

 




आपल्याला स्वप्न पडते, काही स्वप्ने अल्प असतात, सकाळी उठेपर्यंत आपण ते स्वप्न विसरूनही जातो.  काही स्वप्ने दीर्घ असतात.  त्याचा परिणाम सकाळी उठल्यावर सुद्धा काही वेळ राहतो.  काही स्वप्ने तर इतकी सत्य व दीर्घ वाटतात की, त्याचा परिणाम काही दिवस राहतो.

 

तसेच हे रामा !  यामध्ये थोडासा सखोल विचार केला तर समजते की, अरे !  हे जागृत विश्व सुद्धा आपल्याला पडलेले दीर्घस्वप्नच आहे.  म्हणून जागृतावस्थेमध्येच ही जागृतावस्था नसून हे दीर्घस्वप्न आहे, हे समजावून घेतले पाहिजे.  जागृतीचे हे स्वप्न इतके दीर्घकाळ आणि इतके भयंकर आहे की, आपल्याला ते सत्यच वाटू लागते.  अज्ञानी पुरुषाच्या मनावर त्याचा भयंकर परिणाम झालेला आहे.  वर्षानुवर्षे हे स्वप्न पडत राहिल्यामुळे आपला अन्य अनेक जीवांशी संबंध येतो.  बंधुबांधव, आप्त असे अनेक नातेसंबंध वर्धन पावतात.  असा हा संसार सर्व बाजूंनी अहंकाराने संयुक्त झालेला आहे.  अहंकारादि प्रत्ययांच्यामुळेच ते दीर्घस्वप्न अधिकच सत्य वाटू लागते.

 

जसे आपण एक तासाचे नाटक पाहिले तर आपण त्या नाटकामधील प्रसंगांशी तादात्म्य पावून त्याचा परिणाम आपल्या मनावर थोडा काळ होतो.  तेच नाटक तीन तास पाहिले तर तो परिणाम जास्त काळ टिकतो आणि येथील जागृतप्रपंचाचे नाटक तर वर्षानुवर्षे चालले आहे.  त्यामुळे या नाटकामध्ये पुत्र, पिता, पति, पत्नी, बंधु बांधव या सर्व भूमिकांशी मनुष्य अहंकाराने युक्त होऊन इतका तादात्म्य पावतो की, त्याला ते सर्व सत्यच वाटू लागते.  हे नाटक आहे हे तो विसरतो.  त्याचप्रमाणे स्वप्नाची ही स्थिति आहे.  स्वप्नकाळी स्वप्नपुरुषाला ते स्वप्न सत्यच वाटते.

 

त्याचप्रमाणे रामा !  ही जागृतावस्था म्हणजे जीवाला पडलेले दीर्घस्वप्न आहे.  त्याला जागृतप्रपंच कितीही सत्य भासला, तरी तो त्या स्वप्नाप्रमाणेच मिथ्या आहे.  परंतु तरीही जागृतविश्वाला कोणी सत्य मानत असेल, तर रामा !  स्वप्न सुद्धा सत्यच मानावे लागेल.  कारण जसे जागृत पुरुषाच्या दृष्टीने जागृतविश्व सत्य असते तसेच, स्वप्न व स्वप्नातील अनुभव स्वप्नभ्रमिष्ट पुरुषाच्या दृष्टीने सत्य असतात.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, August 26, 2025

मौन-शांति-सत्य | Speechlessness-Silence-Truth

 




ब्रह्मज्ञानाची प्राप्ति झाल्यानंतर या विश्वामध्ये बोलण्यासारखे काहीच शिल्लक राहात नाही.  अन्यवस्त्वन्तराभावात् |  परब्रह्मस्वरूपाव्यतिरिक्त अन्य सर्व वस्तूंचा आत्मज्ञानाने निरास होतो.  त्यामुळे मिथ्या विश्वाविषयी काय बोलणार ?  रज्जुमधून जो सर्प कधीही निर्माण झाला नाही, अशा मिथ्या सर्पाची चर्चा निरर्थक आहे.  त्याचप्रमाणे परब्रह्मस्वरूप हे एकच सत्य आहे.  या विश्वात घडून घडून काय घडणार ?  उत्पत्ति, विनाश आणि त्यामध्ये घडामोडी !  त्याची चर्चा करून काहीच साध्य होणार नाही.  उलट साधकाचे मन मात्र बहिर्मुख, विषयाभिमुख, अस्थिर होते.  

 

म्हणूनच ब्रह्मज्ञानी पुरुष विश्वाबद्दल तर बोलत नाहीच आणि ब्रह्मस्वरूपाबद्दलही बोलत नाही.  मौन हे परब्रह्माचे स्वरूप आहे.  भगवान भाष्यकार म्हणतात - मौनव्याख्याप्रकटितपरब्रह्मतत्त्वं युवानम् |  (श्री दक्षिणामूर्तिस्तोत्रम् ).  मौनरूपी व्याख्यानामधून गुरु शिष्याला परब्रह्मस्वरूपाचे ज्ञान प्रदान करतात.  येथे आत्मा हाही मौनस्वरूप, आत्मस्वरूपाचे ज्ञान देणाऱ्या आचार्यांनीही मौन धारण केलेले आहे आणि आचार्यांचा उपदेश, व्याख्यानही 'मौन' हेच आहे.

 

ईश्वरदर्शनाच्या इच्छेने एक मनुष्य एका साधु पुरुषाकडे जातो आणि म्हणतो, "साधु महाराज !  मला ईश्वराचा साक्षात्कार हवा आहे.  तो कोठे आहे ?  कसा आहे ?  त्याचे स्वरूप काय आहे ?  याचे ज्ञान हवे आहे."  यावर साधु महाराज हसतात आणि शांत बसतात.  हा मनुष्य आतुरतेने उत्तराची प्रतीक्षा करीत असतो.  पाच मिनिटे होतात.  दहा मिनिटे होतात, पंधरा-वीस-पंचवीस-तीस-अर्धा तास जातो.  ही शांतता त्या मनुष्याला सहन होत नाही.  त्याचे शरीर, मन अस्वस्थ होते.  तो वैतागून, चिडून पुन्हा विचारतो, "परमेश्वर कोठे आहे ?  याचे उत्तर मला हवे आहे."  यावर साधु पुरुष उत्तर देतात - "बाळा, तुझ्या प्रश्नाला माझ्या मौनामधून मी तत्क्षणीच उत्तर दिलेले आहे.  तुला ते समजले नाही.  त्याला मी काय करू ?  मौन हेच परमेश्वराचे खरे स्वरूप आहे.  परमेश्वर हा स्वतःच मौनस्वरूप आहे.  मौन म्हणजेच शांती !"

 

Silence is the Truth. Truth is the Silence.  Awareful Silence is the nature of myself.  ज्यावेळी वाणीची व्यर्थ बडबड संपेल, वाणी, मन शांत होईल तेथेच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल.  तेथेच निरतिशय, नीरव शांतीचा, आनंदाचा अनुभव येईल.  म्हणूनच ज्ञानी पुरुष हा मौनी, मौनस्वरूप म्हणजेच शांतस्वरूप, आनंदस्वरूप आहे.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ



Tuesday, August 19, 2025

मंत्रिमंडळ आणि विजयश्री | Ministers And Victory

 



ज्याप्रमाणे ज्या राजाजवळ प्रधानादि मंत्रिमंडळ असते, तोच राजा विजयी होतो.  ज्याच्याबरोबर मंत्रणा म्हणजे विचारविनिमय केला जातो, त्याला 'मंत्री' असे म्हणतात.  राज्यामध्ये कोणत्याही बाबतीत राजा प्रथम स्वतः विचार करून नंतर आपल्या मंत्रिमंडळाबरोबर त्याची चर्चा करतो आणि चर्चेनंतरच सांगोपांग विचार करून निर्णय घेतो.  जेथे अविचारी, स्वार्थी व भ्रष्ट मंत्री आहेत, त्या राष्ट्राचे अधःपतन होते.  मात्र ज्या राजाजवळ श्रेष्ठ, विचारी, निःस्वार्थ मंत्री असतात, त्याच राजाला विजयश्री प्राप्त होते.

 

त्याचप्रमाणे हे रामा !  साधकाजवळ शम, विचार, संतोष व सत्संग हेच जणु काही चार मंत्री आहेत. म्हणून साधकाने कोणताही व्यवहार करताना प्रथम यांच्याशी विचारविनिमय करावा.  म्हणजेच साधकाने तृप्तीलाच काय पाहिजे ?  असे विचारले तर कामनांचा त्याग होईल.  विचारला काय पाहिजे ?  असे विचारले तर विचार नित्य वस्तूचे ग्रहण करेल.  शमयुक्त मनाला विचारणा केली तर ते मनही अंतर्मुख असल्यामुळे साधकाला शांतीशिवाय काही मागणार नाही आणि सत्संगामध्ये गेलो तर साधु पुरुष या साधकाचे मन ईश्वरचिंतनामध्ये प्रवृत्त करतील.

 

म्हणून हे चार गुण म्हणजेच जणु काही साधकाचे अत्यंत जवळचे मंत्री आहेत.  जो साधक प्रत्येक बाबतीत त्यांच्याशी विचारविनिमय करतो, त्या चार गुणांना विचारून निर्णय घेतो, त्यालाच विजयश्री प्राप्त होते.  असा श्रेष्ठ साधक आत्मसाम्राज्यावर आरूढ होतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, August 12, 2025

मनुष्य जीवनाच्या यशाचे परिमाण | Human Life Success Measure

 



मनुष्य जीवनामध्ये, आपल्या ६०-७०-८० वर्षांच्या आयुष्यामध्ये बाकी सर्व गोष्टी करतो.  शालेय शिक्षण घेतो.  जीवनामधील सर्व कर्तव्ये यथासांग पार पाडण्याचा झटून कसोशीने प्रयत्न करतो.  पैसा मिळवितो.  नोकरी करतो.  धंदा करतो.  अनंत इच्छा, कामाना निर्माण करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.  आपले शारीरिक जीवन सुखी करण्यासाठी नाना प्रकारच्या औषधींचे सेवन करतो.  पथ्ये पाळतो.  व्यायाम करतो.  प्राणायाम करतो.  योगाभ्यास करतो.  इंटरनेटवरून सर्व जगाची माहिती गोळा करतो.  मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो.  अनेक उपाययोजना करतो.  म्हणजे मन अनेक ठिकाणी गुंतविण्याचा प्रयत्न करतो.  त्यासाठी वेळात वेळ काढून थोडा वेळ आपल्यामधील कलागुणांना वाव देतो.  संगीत वगैरेदि कला शिकतो.

 

मनुष्य इतका विचित्र प्राणी आहे की, त्याला एकाच जन्मामध्ये या सर्व गोष्टी करायच्या असतात.  मनुष्य आपल्या बुद्धीची भूक शमविण्यासाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान, यंत्रज्ञान घेतो.  शोध करतो.  परंतु हे सर्व करूनही त्याचे मन शांत, तृप्त होत नाही.  त्याच्या बुद्धीमधील ज्ञानाची जिज्ञासा पूर्णतः निवृत्त होत नाही, कारण या सर्व बहिरंगाच्या प्रगतीने जीवनामधील त्याचा मूळ प्रश्न सुटलेलाच नसतो.  म्हणूनच अनादि काळापासून मानव अंतरिक सुख, शांति, तृप्ति, परिपूर्णता शोधतोय.  ही परिपूर्णता प्राप्त करावयाची असेल तर मनुष्याने योग्य विचार करणे आवश्यक आहे.  म्हणूनच श्रुति येथे प्रत्येक मनुष्याला ईशारा देत आहे – इह चेत् अवेदित् |

 

या मनुष्यजन्मामध्ये येऊन आत्मस्वरूपाला जाणले तर जीवन जगण्यात काही अर्थ आहे.  अन्यथा केवळ भोगासक्त होऊन जनावरांच्याप्रमाणे जीवन जगत राहिले, तर तो जीवनाचा महान नाश आहे.  संत कबीर म्हणतात –  

तूने रात गवाई सोयके |  दिवस गावाया खायके |

हिरा जनम अमोल था |  कवडी बदले जाय रे ||         (संत कबीर)

म्हणून जन्ममृत्युरूपी, शोकमोहरूपी संसारचक्रामधून मुक्त व्हावयाचे असेल तर आत्मस्वरूपाचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे.  हेच श्रुति येथे स्पष्ट करीत आहे.

 


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ



Tuesday, August 5, 2025

शूर पुरुषाची व्याख्या | Definition Of Brave Man

 



श्रीवसिष्ठ मुनींनी पुन्हा एकदा शूर पुरुषाची व्याख्या केली आहे.  जो राजा स्वतः शास्त्रार्थाचे व लोकाचाराचे यथार्थ पालन करतो, ज्याचे राष्ट्र धर्मावर आधारलेले आहे, अशा राष्ट्राचा जो भक्त आहे, त्याला शूर असे म्हणावे.  येथे श्रीवसिष्ठांनी जाणीवपूर्वक शूराचे लक्षण भक्ति हे सांगितले आहे.  अन्यथा जगामध्ये शूरवीर, पराक्रमी लोक कमी नाहीत.  अन्यायी, भ्रष्टाचारी, दहशतवादी, आतंकवादी हे लोक सुद्धा प्रचंड धाडसी पण आततायी आहेत.  जीवावर उदार होऊन विध्वंस करणाऱ्या या अधर्मी लोकांच्यामध्ये सुद्धा शारीरिक बल आहे, पराक्रम आहे.  परंतु त्यांना कोणी शूर किंवा पराक्रमी म्हणत नाही.

 

मात्र ज्या वीर योध्यांच्या हृदयामध्ये देशभक्ति आहे, धर्मनिष्ठा आहे, जे स्वतः धर्मपरायण आहेत, अशा राष्ट्रभक्तांनाच शूर असे म्हणणे योग्य आहे.  भूमीला केवळ भूमी म्हणून ना पाहता राष्ट्रभूमीला माता मानून त्यापुढे नतमस्तक होऊन त्या भूमीसाठी स्वतःच्या प्राणांची आहुति देणारे भूमिपुत्र हेच खरे शूर आहेत.  सामर्थ्य केवळ बाह्य शक्तीने किंवा शरीराने येऊ शकत नाही.  युद्धभूमीवर जावयाचे असेल, रणांगणावर वीरश्रीचा संचार व्हावयाचा असेल तर अंतःकरणामध्ये धर्म, देश, राष्ट्र यांच्याबद्दल नितांत भक्ति हवी.  अधर्माबद्दल, अन्यायाबद्दल प्रखर क्रोध हवा.  तोच वीरपुरुष धर्मासाठी व धर्माधीष्ठित राष्ट्रासाठी प्राणपणाने लढू शकेल.

 

म्हणून आपण धर्म व अधर्म, यापैकी कोणत्या पक्षामध्ये आहोत ?  याला महत्त्व आहे.  आपल्यापुढे संपूर्ण इतिहासाची साक्ष आहे.  राम-रावण युद्धामध्ये रावणाचा भाऊ असणाऱ्या विभीषणाने रावणाचा म्हणजे अधर्माच्या पक्षाचा त्याग करून रामाच्या-धर्माच्या पक्षाचे अनुसरण केले.  म्हणून महापराक्रमी रावणापेक्षाही विभीषणाची सत्कीर्ति अक्षय आहे.  या भारतवर्षामध्ये जन्माला आलेले भरत, रन्तिदेव आदि अनेक राजे हे महाबलाढ्य असून धर्मनिष्ठ व राष्ट्रभक्त होते.  जेथे भक्ति असते तेथेच निष्ठा असते.  म्हणून वीर योध्यांमध्ये धर्माबद्दल, आपल्या राजाबद्दल व राष्ट्राबद्दल एकनिष्ठा व भक्ति असणे, हे वीर योध्याचे प्रमुख लक्षण आहे.

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ