आपल्याला स्वप्न पडते, काही स्वप्ने अल्प असतात,
सकाळी उठेपर्यंत आपण ते स्वप्न विसरूनही जातो. काही स्वप्ने दीर्घ असतात. त्याचा परिणाम सकाळी उठल्यावर सुद्धा काही वेळ राहतो.
काही स्वप्ने तर इतकी सत्य व दीर्घ वाटतात
की, त्याचा परिणाम काही दिवस राहतो.
तसेच हे रामा ! यामध्ये थोडासा सखोल विचार केला तर समजते की, अरे
! हे जागृत विश्व सुद्धा आपल्याला पडलेले
दीर्घस्वप्नच आहे. म्हणून जागृतावस्थेमध्येच
ही जागृतावस्था नसून हे दीर्घस्वप्न आहे, हे समजावून घेतले पाहिजे. जागृतीचे हे स्वप्न इतके दीर्घकाळ आणि इतके भयंकर
आहे की, आपल्याला ते सत्यच वाटू लागते. अज्ञानी पुरुषाच्या मनावर त्याचा भयंकर परिणाम झालेला
आहे. वर्षानुवर्षे हे स्वप्न पडत राहिल्यामुळे
आपला अन्य अनेक जीवांशी संबंध येतो. बंधुबांधव,
आप्त असे अनेक नातेसंबंध वर्धन पावतात. असा
हा संसार सर्व बाजूंनी अहंकाराने संयुक्त झालेला आहे. अहंकारादि प्रत्ययांच्यामुळेच ते दीर्घस्वप्न अधिकच
सत्य वाटू लागते.
जसे आपण एक तासाचे नाटक पाहिले तर आपण त्या नाटकामधील
प्रसंगांशी तादात्म्य पावून त्याचा परिणाम आपल्या मनावर थोडा काळ होतो. तेच नाटक तीन तास पाहिले तर तो परिणाम जास्त काळ
टिकतो आणि येथील जागृतप्रपंचाचे नाटक तर वर्षानुवर्षे चालले आहे. त्यामुळे या नाटकामध्ये पुत्र, पिता, पति, पत्नी,
बंधु बांधव या सर्व भूमिकांशी मनुष्य अहंकाराने युक्त होऊन इतका तादात्म्य पावतो की,
त्याला ते सर्व सत्यच वाटू लागते. हे नाटक
आहे हे तो विसरतो. त्याचप्रमाणे स्वप्नाची
ही स्थिति आहे. स्वप्नकाळी स्वप्नपुरुषाला
ते स्वप्न सत्यच वाटते.
त्याचप्रमाणे रामा ! ही जागृतावस्था म्हणजे जीवाला पडलेले दीर्घस्वप्न
आहे. त्याला जागृतप्रपंच कितीही सत्य भासला,
तरी तो त्या स्वप्नाप्रमाणेच मिथ्या आहे. परंतु तरीही जागृतविश्वाला कोणी सत्य मानत असेल,
तर रामा ! स्वप्न सुद्धा सत्यच मानावे लागेल.
कारण जसे जागृत पुरुषाच्या दृष्टीने जागृतविश्व
सत्य असते तसेच, स्वप्न व स्वप्नातील अनुभव स्वप्नभ्रमिष्ट पुरुषाच्या दृष्टीने सत्य
असतात.
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami
Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti
2022
- हरी ॐ–