ज्याप्रमाणे ज्या राजाजवळ प्रधानादि मंत्रिमंडळ
असते, तोच राजा विजयी होतो. ज्याच्याबरोबर
मंत्रणा म्हणजे विचारविनिमय केला जातो, त्याला 'मंत्री' असे म्हणतात. राज्यामध्ये कोणत्याही बाबतीत राजा प्रथम स्वतः विचार
करून नंतर आपल्या मंत्रिमंडळाबरोबर त्याची चर्चा करतो आणि चर्चेनंतरच सांगोपांग विचार
करून निर्णय घेतो. जेथे अविचारी, स्वार्थी
व भ्रष्ट मंत्री आहेत, त्या राष्ट्राचे अधःपतन होते. मात्र ज्या राजाजवळ श्रेष्ठ, विचारी, निःस्वार्थ
मंत्री असतात, त्याच राजाला विजयश्री प्राप्त होते.
त्याचप्रमाणे हे रामा ! साधकाजवळ शम, विचार, संतोष व सत्संग हेच जणु काही
चार मंत्री आहेत. म्हणून साधकाने कोणताही व्यवहार करताना प्रथम यांच्याशी विचारविनिमय
करावा. म्हणजेच साधकाने तृप्तीलाच काय
पाहिजे ? असे विचारले तर कामनांचा त्याग होईल.
विचारला काय पाहिजे ? असे विचारले तर विचार नित्य वस्तूचे ग्रहण करेल.
शमयुक्त मनाला विचारणा केली तर ते मनही अंतर्मुख
असल्यामुळे साधकाला शांतीशिवाय काही मागणार नाही आणि सत्संगामध्ये गेलो तर साधु पुरुष
या साधकाचे मन ईश्वरचिंतनामध्ये प्रवृत्त करतील.
म्हणून हे चार गुण म्हणजेच जणु काही साधकाचे
अत्यंत जवळचे मंत्री आहेत. जो साधक प्रत्येक
बाबतीत त्यांच्याशी विचारविनिमय करतो, त्या चार गुणांना विचारून निर्णय घेतो, त्यालाच
विजयश्री प्राप्त होते. असा श्रेष्ठ साधक आत्मसाम्राज्यावर
आरूढ होतो.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–