मनुष्य जीवनामध्ये, आपल्या ६०-७०-८० वर्षांच्या आयुष्यामध्ये बाकी सर्व गोष्टी करतो. शालेय शिक्षण घेतो. जीवनामधील सर्व कर्तव्ये यथासांग पार पाडण्याचा झटून कसोशीने प्रयत्न करतो. पैसा मिळवितो. नोकरी करतो. धंदा करतो. अनंत इच्छा, कामाना निर्माण करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आपले शारीरिक जीवन सुखी करण्यासाठी नाना प्रकारच्या औषधींचे सेवन करतो. पथ्ये पाळतो. व्यायाम करतो. प्राणायाम करतो. योगाभ्यास करतो. इंटरनेटवरून सर्व जगाची माहिती गोळा करतो. मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो. अनेक उपाययोजना करतो. म्हणजे मन अनेक ठिकाणी गुंतविण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी वेळात वेळ काढून थोडा वेळ आपल्यामधील कलागुणांना वाव देतो. संगीत वगैरेदि कला शिकतो.
मनुष्य इतका विचित्र प्राणी आहे की, त्याला
एकाच जन्मामध्ये या सर्व गोष्टी करायच्या असतात. मनुष्य आपल्या बुद्धीची भूक शमविण्यासाठी अनेक
प्रकारचे तंत्रज्ञान, यंत्रज्ञान घेतो. शोध
करतो. परंतु हे सर्व
करूनही त्याचे मन शांत, तृप्त होत नाही. त्याच्या
बुद्धीमधील ज्ञानाची जिज्ञासा पूर्णतः निवृत्त होत नाही, कारण या सर्व बहिरंगाच्या प्रगतीने जीवनामधील त्याचा मूळ प्रश्न सुटलेलाच
नसतो. म्हणूनच अनादि
काळापासून मानव अंतरिक सुख, शांति, तृप्ति, परिपूर्णता शोधतोय. ही परिपूर्णता प्राप्त करावयाची असेल तर
मनुष्याने योग्य विचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच
श्रुति येथे प्रत्येक मनुष्याला ईशारा देत आहे – इह
चेत् अवेदित् |
या मनुष्यजन्मामध्ये येऊन आत्मस्वरूपाला
जाणले तर जीवन जगण्यात काही अर्थ आहे. अन्यथा
केवळ भोगासक्त होऊन जनावरांच्याप्रमाणे जीवन जगत राहिले, तर तो जीवनाचा महान नाश
आहे. संत कबीर म्हणतात
–
तूने रात गवाई सोयके | दिवस गावाया खायके |
हिरा जनम अमोल था | कवडी बदले जाय रे || (संत कबीर)
म्हणून जन्ममृत्युरूपी, शोकमोहरूपी संसारचक्रामधून
मुक्त व्हावयाचे असेल तर आत्मस्वरूपाचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. हेच श्रुति येथे स्पष्ट करीत आहे.
- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "Kenopanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
- हरी ॐ–