अत्युत्तम
असणारे श्रेष्ठ अधिकारी अहंकाराचा त्याग करून परमेश्वराला दृढ श्रद्धेने, अनन्य
भक्तीने शरण जातात. त्यांच्यासाठी भगवंतांनी “मय्येव मन आधत्स्व...|” ही साधना सांगितली. ही
साधना ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी सजातीयवृत्तिप्रवाह निर्माण करून ‘अभ्यासयोग’
करावा, असे प्रतिपादन केले. ज्यांना हेही शक्य नसेल त्यांनी
सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करावी. म्हणजेच कर्मामागील भाव बदलावा. परमेश्वर
हाच कर्तुं-अकर्तुं असून मी फक्त एक निमित्तमात्र आहे. हे जाणून कर्मामधील कर्तृत्वबुद्धीचा त्याग करावा.
याठिकाणी भगवान “मद्योगमाश्रितः” हा विशेष शब्द योजतात. माझ्या – परमेश्वराच्या
योगामध्ये आश्रित होऊन कर्मे करावीत. परमेश्वराला कर्मे समर्पण करणे
हाच योग आहे. म्हणजेच केवळ कर्म करीत राहाणे याला अर्पण म्हणत नाही. तर अर्पण करणे ही वृत्ति आहे. म्हणून जर कर्म
परमेश्वरासाठी केले तरच तो
‘कर्मयोग’ आहे. अन्यथा ते केवळ कर्म, काम अथवा
कष्ट आहेत. भगवान म्हणतात – जे कर्म यज्ञासाठी – परमेश्वरासाठी केले जाते ते मनुष्याला
बंधनकारक नसून त्याव्यतिरिक्त केलेले कर्म मात्र त्याला बद्ध करते.
म्हणून बहिरंगाने कर्म कोणतेही असेल. भजन,
पूजन, कीर्तन, उपासना अशी वैदिक – धार्मिक कर्मे असतील. किंवा साधे झाडणे, पुसणे,
स्वच्छता करणे, स्वयंपाक करणे अशी व्यावहारिक कर्मेही असतील. त्याला विशेष महत्व नाही. त्या कर्मामध्ये
जर भक्तीचा, प्रेमाचा भाव, समर्पण वृत्ति असेल तर ते प्रत्येक कर्म ईश्वराभिमुख असल्यामुळे आपोआपच आपले मन अत्यंत
शांत, प्रसन्न, आनंदी होते. या निष्काम, निःस्वार्थ
बुद्धीने केलेल्या कर्मालाच ‘कर्मयोग’ किंवा ‘मद्योग’ असे म्हणतात. ते कर्म ‘योग’ या संज्ञेस पात्र
होते. तेच क्रमाने चित्तशुद्धिद्वारा मोक्षाचेही साधन होते.
याउलट जे कर्म स्वार्थाने, स्वतःची कामुकता
पूर्ण करण्यासाठी ‘मी करतो’ या अहंकाराने प्रेरित झालेले असते, त्या कर्मामधून
कधीही शांति, आनंद अनुभवाला येत नाही. ते कर्म मनुष्याला बहिर्मुख, विषयाभिमुख करून
परमेश्वरापासून दूर दूर नेते. मनामध्ये द्वन्द्व, विक्षेप, अहंकार-ममकार प्रत्यय निर्माण करते.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–