Tuesday, November 18, 2025

सुखप्राप्ति - मनुष्याचे कर्तव्य | Bliss – The Duty of Human Life

 




आपण आपल्या जीवनाचे निरीक्षण केले तर समजते की, जन्मल्यापासून मृत्युपर्यंत आपण अनेक विषय पाहातो, त्यांचा यथेच्छ उपभोग घेतो.  त्या उपभोगामधून सुख मिळविण्याचा आपण प्रयत्न करतो.  या विषयामधून मला सुख मिळेल, अशी खुळी कल्पना करून तो विषय उपभोगतो.  एका विषयामागून दुसरा, तिसरा असे असंख्य अगणित, कोट्यवधी विषय उपभोगतो. विषयसंग्रह करतो.  धन, संपत्ति, यश, प्रतिष्ठा, सत्ता, कीर्ति, मान-सन्मान सर्वकाही प्राप्त करतो.  परंतु, खरोखरच या सर्वांच्यामधून आपण सुखी झालो आहोत का ?

 

विषयोपभोग घेत असताना निश्चितपणे सुखाचा भास होतो.  सुख मिळाल्यासारखे वाटते.  पण छे !  दुसऱ्याच क्षणी आपल्या हातून ते सुख निसटून जाऊन आपण पूर्ववत्, कदाचित् पूर्वीपेक्षा अधिकच दुःखी (miserable) होतो.  हीच जीवनाची शोकांतिका आहे.

 

विषयांच्या या बाजारामध्ये आपण जीवन जगतो, व्यवहार करतो, हसतो, खेळतो.  परंतु निरागस, निर्भेळ, शाश्वत आनंद मात्र प्राप्त होत नाही.  विषयांच्यामधून खरोखरच जर आनंद मिळत असेल तर जो या विश्वामध्ये सर्वाधिक श्रीमंत मनुष्य आहे, तो सर्वात 'सुखी' झाला असता.  परंतु दुर्दैवाने तसे होत नाही.  सुख हे विषयांच्यामध्ये नाही.  त्याप्रमाणेच अन्य घटपटादि विषयांच्याप्रमाणे 'सुख' ही बाजारपेठेत पैसे देऊन विकत मिळणारी एखादी वस्तुही नाही.  या विश्वात सर्वकाही पैशाने मिळते.  परंतु लाखो, कोटयवधी रुपये मोजूनही कोठेही 'सुख' मात्र मिळत नाही.

 

मग प्रश्न निर्माण होईल की, अंतरिक, शाश्वत सुख कोठे आहे ?  समर्थ रामदास म्हणतात -  

जगी सर्वसूखी असा कोण आहे ।  विचारी मना तूचि शोधूनि पाहे ।।           (मनोबोध )

आपल्याला हवे असणारे अंतरिक सुख हे बाहेर विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये नसून आपल्या आतच अंतरंगामध्ये आहे.  आज ज्याठिकाणी मला नैराश्य, वैफल्य, दुःख, द्वन्द्व, संघर्ष अनुभवाला येतात त्याच अंतःकरणामध्ये आपण सुखाचा शोध घेतला पाहिजे.  तो आनंद, शाश्वत, चिरंतन सुख प्राप्त करणे, हेच प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, November 11, 2025

अनंतकोटीब्रह्माण्डनायक | Master Of Infinite Universes

 




हे रामा !  ज्याप्रमाणे प्रचंड मोठ्या मेरू पर्वतावरील एखाद्या फुलामध्ये एखादी भ्रमरी राहते, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या एका रोमाच्या एका टोकामध्ये ही जगद्रूपी लक्ष्मी निवास करते.  असे कोट्यवधि रोम असल्यामुळे अशा कोट्यवधि सृष्टि, ब्रह्माण्ड ज्ञानी पुरुषामध्ये स्थित असतात.  त्याच्या दृष्टीने एक जग नसून अशी कोटी ब्रह्मांडे त्याच्या हृदयाकाशामध्ये स्थित असतात.  हे रामा !  एकेका परमाणूमध्ये हजारो सृष्टि निर्माण होऊन अस्तित्वात असतात.  ज्ञानी पुरुष अशा अनंत सृष्टींना स्वतःच उत्पन्न करतो, स्वतःमध्ये धारण करतो व स्वतःमध्येच या सृष्टींचा लय करतो.  म्हणजे तोच या अनंत कोटी सृष्टींचा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता होऊन अनंतकोटीब्रह्माण्डनायक होतो.  त्या अनंत कोटी ब्रह्मांडांच्या दृष्टीने ज्ञानी पुरुषासाठी हे दृश्य जग अतिशय छोटे, निकृष्ट, नगण्य व असत्  स्वरूपाचे असते.  तो स्वतःच स्वतःमध्ये या अनंतकोटी ब्रह्मांडांना पाहतो.  त्या सर्वांचा साक्षी होतो.  ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने हे जग अंशमात्र सुद्धा नाही.

 

मी तुला इतकेच सांगू शकतो की, रामा !  ज्ञानी पुरुष अनंतकोटी ब्रह्मांडांचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता तर आहेच !  परंतु रामा !  असे लक्षावधि व अब्जावधि हरिहर एका ज्ञानी पुरुषामध्ये सामावलेले असतात.  एक वेळ एका हरीचे वा एका हराचे दर्शन सोपे आहे.  परंतु ज्याच्यामध्ये लाखो शिव आणि विष्णु सामावलेले असतात, जो कोट्यवधि सृष्टींना धारण करतो आणि कोट्यवधि सृष्टींचा निरास करतो, तो एकमेवा द्वितीय असणारा ज्ञानी पुरुष आहे.

 

हे रामा !  तू माझ्या या विधानाला अतिशयोक्ति समजू नकोस.  जीवनमुक्त ज्ञानी पुरुष कोट्यवधि जीवांच्या अंतःकरणामधील कोट्यवधि संसारांचा या निर्वाण ज्ञानाच्या साहाय्याने निरास करतात.  रामा !  तू कल्पना कर एका शिवाचे दर्शन सुद्धा किती सत्य, शिव व सुंदर असते.  असे लाखो शिव एकत्र आले, विश्वाला धारण करणारे जगदाधार लाखो विष्णु एकत्र आले, ज्ञानाच्या तेजाने तळपणारे लाखो सूर्य एकत्र आले तर त्यांच्या दर्शनाप्रमाणेच या जीवनमुक्त पुरुषाचे दर्शन आहे.  या ज्ञानी पुरुषाला लाखो हरिहरांच्याबरोबर त्यांच्या लक्षावधि शक्ति सुद्धा मिळाल्यामुळे ज्ञानी पुरुष अत्यंत सामर्थ्यशाली व श्रेष्ठ होतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ








Sunday, November 2, 2025

विश्वनिर्मिती हा अपघात नाही | Creation is Not An Accident

 



विश्व सर्व प्राणिमात्रांना त्यांच्या त्यांच्या कर्मांची फळे भोगण्याचे स्थान आहे.  जो जसे कर्म करतो, तसेच त्याला फळ मिळते.  त्यामुळे कोणाला, कोणत्या कर्माचे, कोणते फळ द्यावयाचे, हे सर्वकाही जाणणारा कोणीतरी सर्वज्ञ असलाच पाहिजे, कारण अल्पज्ञ जीवाला कोणत्या कर्माचे कोणते फळ मिळते, हे समजण्याचे सामर्थ्य नाही.  त्यामुळे ईश्वर हाच सर्वज्ञ असल्यामुळे तोच कर्माध्यक्ष व कर्मफळदाता असून त्यानेच ही सृष्टि निर्माण केलेली आहे, हे सिद्ध होते.  ही सृष्टि ईश्वराने अत्यंत विचारपूर्वक, प्रयत्नपूर्वक व नियोजनबद्ध रीतीने केलेली आहे.  विश्वाच्या नियमात, कर्म-कर्मफळाच्या नियमामध्ये कोठेही गोंधळ दिसत नाही.  एकाने कर्म केले व दुसऱ्यालाच फळ मिळाले, असे कधीही होत नाही.

 

व्यवहारामध्ये आपल्या सर्व यंत्रणा कोलमडून पडतात.  आधुनिक तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असेल तरी आपली यंत्रे बिघडतात.  आपल्या संगणकामध्ये व्हायरस जातात.  काही वेळेस मेमरी कमी पडते, काही वेळेस हार्डवेअर तर काही वेळेस सॉफ्टवेअर खराब होते.  परंतु ईश्वराची यंत्रणा इतकी अद्भुत आहे की, त्यामध्ये अनादि काळापासून असंख्य जीवांची माहिती असते.  कोणी, केव्हा, कोणते कर्म केले, कोठे, कसे, कशासाठी केले ?  त्याला फळ केव्हा, कोठे, कसे, किती मिळणार, या सर्वांच्यावर ईश्वराचे नियमन आहे.  म्हणूनच तो कर्माध्यक्ष व कर्मफलदाता आहे.  भगवान रमणमहर्षि म्हणतात – कर्तुराज्ञया प्राप्यते फलम् |                               (उपदेश सारम्)

 

विश्वकर्त्या ईश्वराच्या आज्ञेने जीवाला कर्माची फळे प्राप्त होतात.  ईश्वराशिवाय अन्य कोणत्याही परिच्छिन्न बुद्धीला हे सर्व करणे शक्य नाही.  म्हणून विश्वाची निर्मिती ही विनाकारण झालेली नाही.  विश्व हे अचानक झालेला अपघात, किंवा केवळ अणुरेणूंचा स्फोट नाही.  विश्व हे accidental नाही.  तर विश्वाची निर्मिती ही बुद्धिपुरस्सर, हेतुपूर्वक झालेली आहे.  कारण विश्वामध्ये सुसूत्रता, सुसंगति व नियमितता दैसते.  जेथे जेथे आपणास ही सुसूत्रता अनुभवायला येते, तेथे तेथे त्याच्या मागे कोणीतरी सूत्रधार हा असतोच.

 

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ




Tuesday, October 28, 2025

महामारी प्रतिकार मंत्र | Mantra For Pandemic Defence

 



"महामारी जरी भयंकर असेल तरी शास्त्रविहित व धर्मपरायण, सज्जन लोकांचे यामधून रक्षण व्हावे, त्यांना या महामारीची चिकित्सा करता यावी, महामारीसारख्या भयंकर रोगाचा प्रतिकार करता यावा, म्हणून हा एक मंत्र माझ्याजवळ आहे. त्या मंत्राचा मी आता उच्चार करतो." असे म्हणून पितामह ब्रह्मदेवांनी हा मंत्र व त्याचे रहस्य सांगण्यास प्रारंभ केला. "हिमालय पर्वताच्या उत्तर दिशेला 'कर्कटी' नावाची एक राक्षसी राहत आहे. तिच्या निवारणाचा मंत्र पुढील प्रमाणे आहे -

ॐ ह्रींह्रांरींरां विष्णुशक्तये नमः | ॐ नमो भगवति विष्णुशक्तिमेनां ॐ हरहर नयनय पचपच मथमथ उत्सादय दूरेकुरु स्वाहा हिमवन्तं गच्छ जीव सः सः सः चन्द्रमन्डलगतोSसि स्वाहा |

 

असा हा मंत्र भूर्जपत्रावर लिहून रुग्णाच्या डाव्या तळहातावर ठेवावा व नंतर रुग्णावर पाणी शिंपडावे. मंत्र म्हणत असताना मंत्र म्हणणाऱ्याने आपल्या मनामध्ये दृढ भावना करावी की, या मंत्ररूपी मुद्गराच्या जोरदार शास्त्राने कर्कटी राक्षसीचे मर्दन झाले असून ती अत्यंत कर्कश आवाजात हिमालय पर्वताच्या दिशेने धावत सुटली आहे. जो रुग्ण आहे त्याने चिंतन करावे की, तो अमृताने युक्त असणाऱ्या चंद्रमंडलात पोहोचला असून त्याच्या हृदयात चंद्रसायन आहे. तो सर्व रोगांच्या भ्रमापासून मुक्त झाला आहे. साधकाने स्नान करून शुचिर्भूत व्हावे व अत्यंत शांत व स्थिर चित्ताने आचरण करून क्रमाने सांगितल्याप्रमाणे या सर्व क्रिया कराव्यात. असे केल्यामुळे निश्चितच तो मंत्र या विषुचिकेचा, या महामारीचा नाश करतो.

 

हा मंत्र म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार करणे नव्हे ! हे सिद्ध मंत्र त्यांच्या शक्तींनी युक्त असतात. त्यामुळे दिलेल्या नियमाप्रमाणेच मंत्रोच्चार करणे आवश्यक असते आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मंत्रोच्चार करणारा साधक आणि रुग्ण या दोघांच्याही अंतःकरणात त्या मंत्राबद्दल पूर्ण विश्वास आणि नितांत श्रद्धा आवश्यक आहे.

 

मनुष्याला, राष्ट्राला किंबहुना संपूर्ण विश्वाला महामारीसारख्या सुद्धा दुर्धर संकटामधून मुक्त व्हावयाचे असेल तर मंत्र, औषधोपचार वगैरेदि अनेक उपाय आहेत. मात्र त्या सर्वांचा योग्य परिणाम व्हावयाचा असेल तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सद्गुण, सदाचार, सात्त्विक वृत्ति, धर्मबुध्दि आवश्यक आहे. मनुष्य पौर्वात्य असो व पाश्चिमात्य, श्रीमंत असो अथवा गरीब, सुशिक्षित असो अथवा अशिक्षित, परंतु प्रत्त्येक मनुष्यामध्ये चांगली वृत्ति आवश्यक आहे. त्याच्यामध्ये माणुसकी, मनुष्यत्व व त्यासाठी आवश्यक असणारे प्रेम, त्याग, निःस्वार्थता, समर्पण असे सद्गुण आवश्यक आहेत. त्यासाठी मनुष्यामध्ये या भौतिकतेमुळे शिरलेले पशुत्व नष्ट होणे गरजेचे आहे. मी व माझे ही संकुचित वृत्ति नष्ट होऊन त्याचे मन थोडेसे विशाल झाले पाहिजे.


 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, October 21, 2025

द्रष्ट्याचे स्वरूप | Nature of The “Seer”

 



दृश्याला पाहाणारा, दृश्याचे ज्ञान घेणारा द्रष्टा, ज्ञाता, त्याचे स्वरूप काय आहे ?

१. द्रष्ट्याचे पहिले लक्षण म्हणजेच द्रष्टा हा चेतनस्वरूप आहे.  I am Self conscious awareful being.

२. द्रष्टा 'मी', I know that I exist.  I am aware of myself.  तसेच मला माझ्याव्यतिरिक्त असणाऱ्या या विश्वाचीही जाणीव आहे.  द्रष्टा हा चेतनस्वरूप असल्यामुळे तो झाला Subject आणि त्याला ज्या ज्या वस्तूंची जाणीव होते ते झाले Object !

३. द्रष्टा ज्यावेळी दृश्य पाहातो त्यावेळी ते दृश्य विषय सतत बदलत असतात.  मग त्या दृश्याच्या अनुषंगाने असणारा द्रष्टा सुद्धा बदलतो का ?  घटाचा, टेबलाचा, वृक्षाचा द्रष्टा भिन्न-भिन्न असतो का ?  अशी शंका येईल.  परंतु दृश्य बदलते तरीही द्रष्टा बदलत नाही.  जो घटाचा द्रष्टा आहे तोच टेबलाचा, वृक्षाचा, इतकेच नव्हे तर सर्वांचा द्रष्टा आहे.  द्रष्टा हा दृश्य बदलले तरी कधीही ना बदलता त्याच्याच स्वरूपामध्ये राहातो.  त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही.  द्रष्टा हा नित्य अविकारी स्वरूपाचा असतो.

४. दृश्य निर्माण होण्यापूर्वी द्रष्टा असतो.  उदा. घटाची निर्मिती होऊन घट इंद्रियगोचर झाल्यानंतर "घट निर्माण झाला" असे आपण म्हणतो.  म्हणजेच घटाच्या निर्मितीची जाणीव घटाला झाली नाही तर याची जाणीव फक्त द्रष्ट्यालाच झाली.  परंतु ज्यावेळी घट अस्तित्वात नव्हता, घटाचा अभाव होता त्यावेळी त्या घटाच्या अभावात्मक अवस्थेची म्हणजेच "घट नाही" याची जाणीवही द्रष्ट्यालाच होती.  म्हणूनच घटाच्या उत्पत्तिपूर्वी, घट अस्तित्वात असताना तसेच घटाचा नाश झाला तरीही द्रष्टा हा आहेच.

५. यावरून, घट हा उत्पत्तिस्थितिलययुक्त असून घटद्रष्टा मात्र उत्पत्तिस्थितिलयरहित आहे, कारण द्रष्टा हा Subject आहे.  It is not one of the objects of the creation, but it is only the Subject.

६. द्रष्टा हा देशकालवस्तुपरिच्छेदशून्य आहे, कारण देश, काल आणि वस्तु निर्मित आहेत.  त्यामुळे त्यांची जाणीव द्रष्ट्याला, 'मी' लाच होते.  यामुळे देश, काल, वस्तु द्रष्ट्याला मर्यादा घालू शकत नाहीत.  म्हणून द्रष्टा हा उत्पत्तिस्थितिलयरहित, नित्य, अविकारी, नानात्वअनेकत्वरहित, नामरूपरहित, चेतनशील, प्रत्यगस्वरूपाचा आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, October 14, 2025

मिथ्या विश्वात दुःख कोठे ? | Is There Grief In Futile World ?

 




या विश्वामध्ये कोठेच सत्याची प्रचीति येत नाही.  सत्य वस्तु कोठेही दिसत नाही.  म्हणून विश्व म्हणजे चित्ताला झालेला भ्रम आहे.  जसे एखादे वेळी आपल्या मनाला कोठे भुताचा भ्रम झाला तर आपल्याला सर्वच ठिकाणी भूते दिसायला लागतात.  माणूस समोर आला तरी त्यामध्ये भूत दिसते.  परंतु भुताचे अस्तित्व कोठेही नसते.  त्या कल्पित भुताप्रमाणेच या जगताचे अस्तित्वही कल्पित आहे.  कारण जगताचे मूळ बीजच अस्तित्वामध्ये नाही.

 

विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे सुद्धा पाहिले तरी - कारणं विना कार्यं न सिध्यति |  कारणाशिवाय कार्याची निर्मिती होऊ शकत नाही.  त्यामुळे विश्वाचे कारणच अस्तित्वामध्ये नसल्यामुळे विश्वाची वास्तविक निर्मिती होणे शक्य नाही.  जसे आपणास दोरीवर सर्पाचा भास झाला, तरी सर्पाची प्रत्यक्ष निर्मिती झाली असे म्हणता येत नाही.  कारण दोरीवर भासणारा सर्प कोणत्याही अंड्यामधून निर्माण झाला नाही.  म्हणूनच ती भासात्मक निर्मिती आहे.  त्या सर्पाचे कारण जसे मिथ्या तसेच विश्वाचे कारणही मिथ्या असून विश्व सुद्धा मिथ्या आहे.  कारण विश्व हे निर्बीज आहे.

 

तसेच हे रामा !  तुला मी खरे सांगतो की, या स्वप्न व चित्राप्रमाणे असणाऱ्या मिथ्या संसाराने कोणीही दुःखी होत नाही.  या जगात वास्तविक स्वरूपाने दुःख अस्तित्वातच नाही.  म्हणून तरी संसाराचे हे मिथ्यास्वरूप जाणून ज्ञानी पुरुष कधीही दुःखी होत नाही.  अज्ञानी मनुष्य दुःखी दिसत असेल तरी त्याचे दुःख स्वप्नातील दुःखाप्रमाणे मिथ्या आहे.  किंवा चित्रामध्ये दिसणाऱ्या दुःखी माणसाचे दुःख जसे मिथ्या असते, तसेच संसारी मनुष्याचे दुःखही मिथ्याच असते.  हे विवेकाने जाणावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ