Tuesday, April 23, 2024

संगत्याग | Giving-Up Inferior Company

 



संग दोन प्रकारचा आहे.  विषयी पुरुषांचा संग आणि ईश्वरनिष्ठ, भगवद्भक्तांचा संग.  जे लोक प्रेमाचा उत्कर्ष होण्यामध्ये प्रतिबंध करणारे आहेत, म्हणजेच ज्यांच्या संगतीमुळे आपल्या मनात परमेश्वराचे प्रेम वाढण्याऐवजी विषयांचे विचार येतात, उपभोगाच्या कामना निर्माण होतात, मन क्षुब्ध होते, अशुद्ध होते अशा वैषयिक लोकांचा संग टाळावा.  जे प्राकृत बुद्धीचे नास्तिकवादी तसेच विषयांच्या आणि उपभोगांच्या चर्चेमध्ये रस घेतात अशा पुरुषाचा संग टाळावा.  भगवान गीतेमध्ये म्हणतात - अरतिर्जनसंसदि |

 

मग कोणाचा संग धरावा ?  जे विषयभक्त नसून भगवद्भक्त आहेत.  ज्यांचे आचार, विचार, उच्चार शुद्ध आहेत, श्रद्धावान आहेत अशा पुरुषांचा संग करावा.  ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ।  ते सर्वाही सदासज्जन सोयरे होतु ।।       (ज्ञानेश्वरी)

ईश्वरनिष्ठ पुरुषांचा संग करावा.  तो संग मनुष्याच्या उद्धाराला कारण होतो.

 

सत्संगत्वे निःसङ्गत्वम्  

निःसङ्गत्वे निर्मोहत्वम् |

निर्मोहत्वे निश्चलतत्त्वम्  

निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ||                                       (भज गोविन्दम् )

 

यावरून सिद्ध होते की, ज्याला स्वतःचा उत्कर्ष किंवा जीवनाचे सार्थक करावयाचे असेल त्याने ईश्वरनिष्ठ पुरुषांचा संग करावा.  तो संग मनुष्याला परमोच्च अवस्थेपर्यंत, ईश्वरस्वरूपापर्यंत नेऊन जीवन तृप्त, पूर्ण करील.  सर्व जीवन आनंदरसाने भरून जाईल.  सर्व दुःख, यातना, संसाराचा संपूर्ण उच्छेद होईल.  थोडक्यात जीवनाला पूर्णत्व देण्याचे सामर्थ्य ईश्वरनिष्ठ पुरुषांच्या संगतीमध्ये आहे.  म्हणून अन्य सर्व विषयासक्त पुरुषांचा संग त्याग करावा असे म्हटले आहे.  परंतु खरे पाहाता त्याग करण्याची जरूरी नाही, कारण ईश्वरनिष्ठांच्या संगतीमुळे अन्य सर्व लोक आपोआपच आपल्यापासून दूर होतील.  फक्त त्यासाठी आपली दृढ श्रद्धा आणि निष्ठा असणे आवश्यक आहे.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ