Tuesday, April 2, 2024

विचारमार्गाची व्यवहारिक फळे | Benefits of Path of Thinking

 



हे राघवा !  विचाराने केवळ मोक्षच मिळतो असे नव्हे, तर राज्य - संपत्ति - दिव्य उपभोग - शाश्वत मोक्ष ही सर्वच विचाररूपी कल्पवृक्षाची फळे आहेत.  म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा काही मिळवायचे असेल तर क्षणाक्षणाला विचार जागृत पाहिजे.  कसे वागावे ?  कसे बोलावे ?  कशा प्रतिक्रिया द्याव्यात ?  नियोजन कसे करावे ?  व्यवस्थापन कसे करावे ?  या सर्वांच्यासाठी विचार आवश्यक आहे.

 

आपल्याला साधे दिवसभराचे व्यवस्थित नियोजन करायचे असेल तरी विचार पाहिजे.  दोन दिवस घराच्या बाहेर पडायचे किंवा गावाला जायचे असेल तरीही विचार पाहिजे.  समोरच्याने आपल्याला एखादी समस्या सांगितली, तर त्यावर काय उत्तर द्यावे, यासाठी सुद्धा विचार पाहिजे.  विचार न करता भावनावश होऊन या सर्व गोष्टी केल्या तरी आपल्या हातून चूक होण्याची अधिक शक्यता असते.  म्हणून क्षणाक्षणाला विचार जागृत पाहिजे.  जेथे जेथे आपण बेसावध राहतो व विचार न करता कृति करतो, तेथे प्रमाद घडतात.

 

मात्र जेथे आपण विचार करतो, तेथेच यश प्राप्त होते.  व्यवहारमधील कोणत्याही क्षेत्रामध्ये माणसे विचारानेच यशाच्या शिखरावर पोहोचली आहेत.  व्यापार, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यवस्थापनासाठी विचाराची नितांत आवश्यकता आहे.  विचारानेच मनुष्याजवळ राज्य, सत्ता येते.  संपत्ति, ऐश्वर्य, उपभोग, प्रतिष्ठा येते.

 

मात्र हे सर्व यश टिकवावे कसे ?   आणि वर्धन कसे करावे ? यासाठी सुद्धा विचारच आवश्यक आहे.   खूप पैसे, संपत्ति मिळाल्यानंतर त्या संपत्तीचे रक्षण कसे करावे ? त्याचा विनियोग कसा करावा ?  संपत्तीचा उपभोग कसा घ्यावा ?   यासाठी सुद्धा विचारच आवश्यक आहे. म्हणून व्यावहारिक प्राप्ति आणि मोक्षप्राप्ति ही दोन्हीही विचाररूपी कल्पवृक्षाची फळे आहेत.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ