Tuesday, January 4, 2022

भगवत कथेचे महत्व | Effects of God's Laudation

 



कथा अनेक प्रकारच्या आहेत.  व्यावहारिक कथा, वैषयिक कथा, स्त्रीकथा, परमेश्वराच्या कथा.  व्यावहारिक आणि वैषयिक कथा मन वैषयिक करून कलुषित करतात, कामुकता निर्माण करतात.  मन बहिर्मुख करून विषयांचेच प्रेम वृद्धिंगत करतात आणि शेवटी मन विषयासक्त होते.  याउलट परमेश्वराच्या कथाश्रवणाने भक्तिरस निर्माण होऊन, मन शुद्ध, निर्मळ होते, सर्व कामुकता, विकारांचा ध्वंस होतो.  जर नित्य आनंद प्राप्त करावयाचा असेल तर भगवंताच्या कथा श्रवण कराव्यात.  त्यामुळे भक्तिरस निर्माण होईल आणि आनंद मिळेल.

 

स्त्रिया विटानामिव साधुवार्ता |  ज्याप्रमाणे लंपट पुरुष स्त्रियांच्या हाव-भाव-विलासाची चर्चा करून थकत नाही, त्यामध्ये नित्य रस घेतो, काया-वाचा-मनसा त्याशिवाय अन्य दुसरा विषयच नसतो.  तो तहानभूक, वेळ सर्व विसरून जातो, त्यातच तो नित्य रसास्वाद घेतो.  त्याप्रमाणे भक्त भगवंताच्या कथा श्रवणामध्ये, चर्चेमध्ये रस घेतो, तो स्वतःला विसरून जातो, तहान भूक देश-काळ विसरतो.  तासन् तास ऐकूनही थकत नाही.  कंटाळत नाही.  त्याला श्रवणामध्ये नित्य नवीन रस मिळतो.

 

कथेमध्ये भगवंताचे चरित्र, कल्याणगुण, माहात्म्य, विभूति, अनेक प्रकारच्या लीला श्रवण केल्या जातात.  कथा श्रवण करण्यामुळे मनामध्ये त्या प्रकारचा भाव निर्माण होतो.  परमेश्वर हा कर्तुम्-अकर्तुम् असून त्याच्या सत्तेची जाणीव निर्माण होते.  तो विश्वनियामक असून सर्व जीवांचा रक्षणकर्ता आहे हे समजते.  श्रवणामधूनच नकळत परमेश्वराबद्दलचे प्रेम निर्माण होते.  कथा चित्ताची पकड घेते आणि भगवंताच्या कथेमध्ये मन सहजपणे तल्लीन होते.  विषयांचा विसर पडतो.  आपला अहंकार गळून पडतो.  यामधून भक्तीचा रस निर्माण होतो.  मन शुद्ध होते, अत्यानंदाचा अनुभव येतो.  हळूहळू भक्तीचा उत्कर्ष होऊन भक्त जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक कर्मामध्ये, प्रसंगामध्ये परमेश्वराची कृपा पाहातो.  परमेश्वराच्या सत्तेची अनुभूति घेतो.  सर्व विश्वातच त्याचे स्वरूप पाहातो.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ