Tuesday, August 17, 2021

अविद्या आणि ब्रह्मविद्या | Ignorance & Knowledge

 



अविद्येचे मूळ कारण अध्यास आहे.  म्हणजेच चैतन्यस्वरूपावर अनात्म्याचा अध्यास हाच हेतु आहे.  याउलट एषणत्रय संन्यास हा विद्येचा हेतु आहे.  विवेक, वैराग्य, शमादि षटक्संपत्ति आणि मुमुक्षुत्व हा ब्रह्मविद्येचा हेतु आहे.  याप्रमाणे ब्रह्मविद्या आणि अविद्या यांच्या हेतुमध्ये, यांच्या स्वरूपामध्ये आणि त्यांच्या फळामध्ये पूर्णतः भेद आहे.

 

१) अविद्या –       हेतु    – चैतन्यस्वरूपावर अनात्म्याचा अध्यास

स्वरूप – अज्ञानस्वरूप

फळ   – संसारप्राप्ति

श्रुति   - अविद्यायामन्तरे वर्तमानाःस्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः |

        दन्द्रम्यमाणाः परियन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः || (कठ. उप. १-२-५)

ज्याप्रमाणे एक अंध पुरुष दुसऱ्या अंध पुरुषाला मार्ग दाखवितो.  त्याप्रमाणे स्वतःला धीर व विद्वान समजणारे, अविद्येमध्येच रत झालेले पुरुष संसारचक्रामध्येच परिभ्रमण करतात.

 

२) ब्रह्मविद्या –     हेतु    - एषणत्रयसंन्यास (पुत्रेच्छा, वित्तेच्छा, लोकेच्छा यांचा त्याग)

साधनचतुष्टयसंपत्ति (विवेक, वैराग्य, शमादि षटक्संपत्ति, मुमुक्षुत्वम्

स्वरूप – ज्ञानस्वरूप, प्रकाशस्वरूप (यथार्थ, सम्यक्, संशयविपर्ययरहित ज्ञान)

फळ   – अत्यंत दुःखनिवृत्ति निरतिशय आनंदप्राप्तिः मोक्षप्राप्ति

श्रुति   - भिद्यते हृदयग्रन्थििश्छद्यन्ते सर्वसंशयाः |

        क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे परावरे || (मुण्ड. उप. २-२-८)

जीवब्रह्मैक्यज्ञानाने अविद्याकामकर्मरूपी हृदयग्रंथीचा उच्छेद होतो आणि सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतात.  तसेच सर्व कर्मांचा क्षय होऊन जीव मुक्त होतो.

 

याप्रमाणे ज्ञान आणि कर्म यांच्या हेतु, स्वरूप आणि फळ यामध्ये भेद असल्यामुळे कर्म आणि ज्ञानाचा समुच्चय अजिबात शक्य नाही.

 


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ