Tuesday, January 2, 2018

कर्म व उपासानांचे प्रयोजन | Provision of Rituals and Worship



कर्म आणि उपासना अविद्येच्या विरोधी नसल्यामुळे अविद्येचा ध्वंस करू शकत नाही.  ज्याप्रमाणे प्रकाश अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे ज्ञान अज्ञानाच्या विरोधी असल्यामुळे ज्ञानच अज्ञानाचा नाश करते.  यावर अशी शंका येईल की, कर्म व उपासना हे मोक्षाचे साधन नसेल, तर मग त्यांचे प्रयोजन काय ?  ते सर्व निष्फळ आहे का ?  

अंतःकरणामध्ये स्वभावतः तीन प्रकारचे दोष आहेत – १) मल, २) विक्षेप आणि ३) आवरण.  मल म्हणजे अशुद्धता होय.  ती रागद्वेषात्मक असून मनामध्ये अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण करते. त्यामुळे मन सतत अस्वस्थ होते.  विक्षेप म्हणजे चंचलता.  यामध्ये मन सतत एका विषयावरून दुसऱ्या विषयावर भरकटत असते.  अशा मनावर आवर घालणे फार कठीण होते.  त्यामुळे मनाची एकाग्रता नाहीशी होते.  आवरण हे आत्मस्वरूपावर अविद्यात्मक आवरण घालते.  त्यामुळे आत्मा अस्ति किन्तु न भाति |  आत्मा असूनही त्याचे स्वरूप दिसत नाही.  अनुभवाला येत नाही.

हे तीन दोष निवारण करण्यासाठी तीन प्रकारच्या साधना शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत.  अंतःकरणामधील अशुद्धता नाहीशी करण्यासाठी “निष्काम कर्मयोग” हे साधन आहे.  चंचलता नाहीशी करण्यासाठी “उपासना” हे साधन आहे.  आणि अज्ञानरूपी आवरण नाहीसे करण्यासाठी “ज्ञान” ही साधना आहे.  

यावरून समजते की, कर्म आणि उपासना अज्ञानजन्य असेल तरी त्यांचे प्रयोजन अज्ञानध्वंस करून ज्ञानप्राप्ति करून देणे हे नाही, तर रागद्वेषांचा क्षय करून चंचलता नाहीशी करून चित्तशुद्धि आणि मनाची निश्चलता करणे हेच प्रयोजन आहे.  यामुळे अंतःकरणामध्ये विवेकवैराग्य, शामादिसाधनसंपत्तीचा उत्कर्ष होऊन दैवीगुण प्राप्त होतात.  तसेच विषयासक्ति आणि विषयभोगवासना कमी होऊन मन अंतर्मुख, एकाग्र होते.  बाह्य विषयांनी आणि प्रसंगांनी मन अस्वस्थ, व्याकूळ, क्षुब्ध न होता शांत, स्थिर राहाते. अशा प्रकारचे मन ज्ञानप्राप्तीसाठी योग्य अधिकारी होते.  अशा अंतर्मुख, शुद्ध आणि एकाग्र मनामध्येच ज्ञानाचा उदय होतो.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment