Tuesday, January 23, 2018

मंगलाचरणाचे प्रयोजन - १ | Necessity of Invocation Prayer - 1



आपल्या जीवनामध्ये भगवंताचे अधिष्ठान असणे अत्यंत आवश्यक आहे.  व्यावहारिक जीवनामध्ये तर आहेच.  परंतु त्याहीपेक्षा साधकाच्या, शिष्याच्या, भक्ताच्या जीवनामध्ये परमेश्वराचे स्थान सर्वोच्च आहे.  ईश्वराच्या अनुग्रहानेच अंतःकरणामध्ये ज्ञानजिज्ञासा उदयाला येते.  या आध्यात्मिक ज्ञानामध्ये सुद्धा जिज्ञासु साधक परमेश्वराला प्रसन्न करवून घेण्यासाठीच, त्याचे आशीर्वाद, कृपा, अनुग्रह प्राप्त करण्यासाठीच परमेश्वराची अनन्य भावाने प्रार्थना करतो.  हीच मनाची खरी सुसंस्कृतता आहे.  ही ज्ञानसाधना अखंडपणाने, सातत्याने होण्यासाठी साधकाला भगवंताचे आशीर्वाद आवश्यक आहेत.  

साधकाच्या मनामध्ये ज्ञानजिज्ञासा उत्पन्न होणे, साधना करण्यासाठी अनुकूल असणारे मनुष्यशरीर प्राप्त होणे, सद्गुरूंची प्राप्ति होणे, शास्त्राचे श्रवण करायला मिळणे ही सर्व त्या भगवंताचीच अनंत व अपार कृपा आहे.  ही कृपा डोळ्यांना दिसत नाही तर विचाराने, बुद्धीने अंतःकरणामध्ये अनुभवायला येते.  

यासाठीच परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी साधक याठिकाणी उपनिषदाचे अध्ययन करण्यापूर्वी मंगलाचरण करतो.  विद्येचा आरंभ करणे हा जीवनामधील सर्वश्रेष्ठ संस्कार मानला जातो.  पूर्वीच्या काळी उपनयन संस्कार झाल्यानंतर गुरुकुलामध्ये विद्येचा श्रीगणेशा केला जात असे.  विद्येचा संस्कार जिव्हाग्रावर केला जातो, कारण जिव्हाग्र हे सरस्वतीचे निवासस्थान आहे.  म्हणूनच साधकाने बोलत असताना सतत याचे भान ठेवावे.  

विद्यारंभ करण्यापूर्वी गुरु आणि शिष्य दोघे मिळून मंगलाचरण करतात, भगवंताचे आवाहन करतात, कारण गुरु जरी आज शिकवीत असतील, तरी ते गुरु सुद्धा एके काळी शिष्य होते.  ते सुद्धा आपल्या गुरूंच्या, शास्त्राच्या प्रति आदर दर्शविण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी मंगलाचरण करून स्वतःच्या गुरुपरंपरेचे स्मरण करतात.  

  
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

No comments:

Post a Comment