Tuesday, August 22, 2017

स्वादिष्ट अन्नाच्या समस्या | Problems with Tasty Food


स्वाद्वन्नं न तु याच्यताम् |

जिज्ञासु साधकाने स्वादु अन्नाची याचना करू नये किंवा स्वादु अन्नप्राप्तीचे प्रयत्नही करू नयेत.  स्वादु म्हणजे मिष्टान्न किंवा चविष्ट, स्वादिष्ट, चमचमीत अन्नपदार्थ.  अशा अन्नाने जिभेला मिष्टान्न किंवा स्वादिष्ट अन्नाची चटक लागते व त्यामुळे अशा पदार्थांची रोज साधक याचना किंवा प्रार्थना करतो.  म्हणजेच साधक जिभेच्या आहारी जातो.  

दुसरे असे की नेहमी मन अशा चविष्ट व गोड पदार्थांचे चिंतन करू लागते कारण त्या पदार्थांबद्दल मनामध्ये विशिष्ट प्रकारचे प्रेम निर्माण झालेले असते.  त्या चिंतनातून पदार्थांची कामना निर्माण होते व साहजिकच मन बहिर्मुख होऊ लागते.  त्यातूनच विशिष्ट अन्नाची प्रीति निर्माण झाल्यावर, इतर पदार्थ असूनही त्यांचा स्वीकार करण्यास मन तयार होत नाही.  त्या इतर पदार्थाबद्दल मनात तिरस्कार व अव्हेराची भावना उद्भवते.  

यातूनच पुढे अन्नाने शरीराचे पोषण, वर्धन व रक्षण बाजूला राहून त्याऐवजी प्रीति-अप्रीति किंवा राग-द्वेष सतत मनात वास करतात.  त्यामुळे मनात क्रोध, क्षोभ, द्वेष अनावर होतात व अन्न ग्रहण करताना मन आनंदी व प्रसन्न राहू शकत नाही.  हे चमचमीत पदार्थ शरीरात जडत्व निर्माण करतात आणि रजोगुण व तमोगुण वृद्धिंगत होतात.  बुद्धीची सूक्ष्मता, तीक्ष्णता, तीव्रता कमी होते.  ज्ञानग्रहणशक्ति कमी होते.  अशा व्यक्तीला विवेक, वैराग्य व षटसंपत्ति प्राप्त होणे कधीही शक्य नाही.  

आत्मप्राप्तीच्या साधनेसाठी प्रचंड मोठे इंद्रियसंयमन, मनसंयमन सर्वप्रथम आवश्यक असते.  त्यामुळे अयोग्य प्रकारच्या आहारामुळे वृत्ति तमोगुणप्रधान झाल्याने श्रवण, मनानादि साधना शक्य होत नाही.  विशिष्ट प्रकारच्या मनाच्या धारणेसाठी उपयुक्त असलेला आहार आवश्यक असल्याने आचार्य - स्वाद्वन्नं न तु याच्यताम् |  ही साधना साधकाला करावयास सांगतात.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ


No comments:

Post a Comment