Tuesday, March 21, 2017

धर्माचरणाचे महत्त्व | Significance of Righteousness


ज्यावेळी स्वतःला बुद्धिमान समजणारा बुद्धिवादी मनुष्य स्वतःच्या वासनांच्याबरोबर, कल्पनांच्याबरोबर, अनियंत्रित भावनांच्याबरोबर वाहत जातो, त्यावेळी त्याचे जीवन अधःपतित होते.  या अधःपतनापासून मनुष्याचे रक्षण व्हावयाचे असेल तर त्याच्या जीवनावर धर्माचा अंकुश हवा.  धर्म म्हणजे उदात्त आचार-विचार-उच्चार होय. या सर्वांनी जर जीवन नियमित झालेले असेल, तरच ते जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी, परिपूर्ण व कृतार्थ होऊ शकेल.  आपल्या जीवनामध्ये धर्माला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.

म्हणून तरी वेदांच्यामध्ये सांगतात – धर्मो रक्षति रक्षितः |
जीवनामध्ये जो धर्माचे रक्षण करतो, कोणतीही तडजोड न करता, सातत्याने कितीही संकटे आली, आघात झाले, जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली तरी सुद्धा धर्माचा मार्ग न सोडता, जो धर्माचे अनुसरण करतो, त्या मनुष्याचेच धर्म सर्व बाजूंनी रक्षण करीत असतो.

श्रुति सांगते – तपो दमः कर्मेति प्रतिष्ठा |
तपश्चर्या, इंद्रियांच्यावर निग्रह आणि स्वतःचे नियतकर्म दीर्घकाळ सातत्याने करणे, हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे.

श्रीसमर्थ रामदास स्वामी सोप्या भाषेमध्ये सांगतात –
सदाचार हा थोर सांडू नये तो | जनी तोचि तो मानवी धन्य होतो ||
जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये, प्रसंगामध्ये मनुष्याने सदाचार, नीति, नियम, धर्माचा मार्ग कधीही सोडू नये.

श्रुति सांगते - धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा |
संपूर्ण विश्व धर्मामध्येच प्रतिष्ठित होते.  म्हणूनच धर्म हाच प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा, समाजाचा, राष्ट्राचा, इतकेच नव्हे, तर संपूर्ण विश्वाचा आधारस्तंभ आहे.


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007



- हरी ॐ

No comments:

Post a Comment