Tuesday, March 7, 2017

मोह – रामायणाचे मूळ | Attraction – The Cause of Ramayana



वनवासापासून प्रारंभ झालेली आणि राज्याभिषेकापर्यंत असणारी ही श्रीरामकथा या भारतवर्षामध्ये जो जो जन्माला आलेला असेल, त्या प्रत्येकाला माहीत आहे.  या संपूर्ण रामकथेचे मूळ जर पाहिले, रामकथेचा थोडासा अभ्यास किंवा मीमांसा जर केली, तर समजेल की, संपूर्ण रामायणाला, सीतेच्या दुःखाला आणि यातनांना जर कारण असेल, तर ते म्हणजेच सीतेला झालेला मोह म्हणजेच आसक्ति !  ज्याक्षणी सीता त्या कांचनमृगाचा मोह करते, त्याक्षणी रामायणास प्रारंभ होतो.

रामायण हे प्राचीन काळामध्ये होऊन गेलेले असेल तरी तेच रामायण आजही प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये चालू असते.  जन्माला आल्यानंतर खरे तर संपूर्ण विश्व, विषय, माणसे, प्रसंग आपल्याला अपरिचित असतात.  परंतु काळाच्या ओघात जसजसे मी जीवन जगायला लागतो, तसतसे माझ्या सान्निध्यामध्ये अनेक विषय, माणसे येतात, त्या अनुषंगाने अनेक चांगले-वाईट प्रसंगही घडतात.  त्यांच्यामध्ये आपण प्रिय-अप्रिय अशा कल्पना निर्माण करतो.  प्रिय विषयांच्यामध्ये, व्यक्तींच्यामध्ये आणि प्रसंगांच्यामध्ये आसक्त होतो.

सर्वांच्यामध्ये संग निर्माण करतो.  विषयांच्याशिवाय मी जगू शकत नाही.  विषय आणि विषयांचे येथेच्छ उपभोग हेच माझे जीवन बनते.  विषय असतील तर मी सुखी व विषय नसतील तर दुःखी, निराश होतो. विषयांच्या सौंदर्याला, आकर्षणाला माझे मन बळी पडते.  पुष्कळ वेळेला बुद्धीला समजून सुद्धा केवळ विषयवश होऊन मी विषयांच्या अधीन होऊन वैषयिक जीवन जगतो.  यालाच ‘मोह’ असे म्हणतात.


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007



                                                                      - हरी ॐ –                  


No comments:

Post a Comment