Saturday, December 26, 2015

संकटांचे प्रयोजन | Provision of Calamities


संकटं आपल्याला रडविण्यासाठी नाहीत.  पूर्णत्वाला नेण्यासाठी आपली सतत कसोटी घेतली जाते, ती या संकटातच.  जीवनमूल्यांची व दैवीगुणांची जोपासना या संकटातच होत असते.  तेथेच गुणांना प्रकट करण्याची संधी मिळते.  सुखावह, आरामशीर जीवनात सुखलोलुपता, अधार्मिक वृत्ति, अनाचार, स्वैराचार, मद्यपान हे दुर्गुण मोकाट सुटतात.  सुखावह जीवन सद्गुणांचा नाश करते.  संकट हे सद्गुणांच्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे.

श्रद्धा, निष्ठा, धैर्य, सहनशीलता, आत्मविश्वास व भक्ति हे मनाचे धर्म आहेत.  ते गुण मनाची अवस्था दर्शवितात.  हे दैवी गुण किती आत्मसात केले आहेत, हे प्रसंगांतूनच दिसून येते.  संकटे येतात ती मनुष्याला उर्ध्वगतीला नेण्यासाठीच येतात.  शास्त्राच्या अध्ययनाला दैवीगुणसंपत्तीची व शुद्ध, निर्मळ अंतःकरणाची आवश्यकता असते.  तसे मन या संकटांमधून तयार होते.

तसेच, एका पाठोपाठ एक येणाऱ्या दुःखाच्या फटक्यांनी माणसाचे डोळे उघडतात व त्याला कळून येते की सर्व विषयोपभोग रसहीन आहेत. व्यवहार व्यर्थ आहे.  पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, नातेवाईक हे सर्व दुःखवर्धन करणारे आहेत.  ते प्राप्त करणे हे जीवनाचे ध्येय नाही.  चिरंतन शांति व आनंदप्राप्तीसाठी शास्त्र अध्ययन हा एकमेव मार्ग आहे.

माणसे संसारसागरात गटांगळ्या खातात तेव्हा त्यांचा जीव संकटांनी बेजार होतो.  ही सर्व परमेश्वरी योजना असते.  संकटामागील परमेश्वराचा हेतु लक्षात घेऊन परिपक्व दृष्टिकोन ठेऊन शांत व प्रतिक्रियारहित होऊन संकटाला सामोरे जावे.



- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

No comments:

Post a Comment