Tuesday, December 22, 2015

ईश्वरच दिशा देतो | God Directs our Life


ईश्वर हा विश्वनियंता असून तो प्रत्येक व्यक्तीला हळुहळू पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीने घडवत असतो.  त्यामुळेच आपली इच्छा असो वा नसो, ईश्वर विशिष्ट क्रिया करण्यास आपल्याला भाग पाडतो.  दुःखांच्या प्रसंगांतून मनुष्याला जावे लागते.  एखाद्या प्रसंगात “ तू असे का केलेस ? ” असे एखाद्याला विचारले असता तो उत्तरतो, “ माझी इच्छा नव्हती पण हा निर्णय मला घ्यावा लागला. ”

विशिष्ट परिस्थिती, प्रसंग निर्माण करणारी ही श्रेष्ठ शक्ति निश्चितच आहे.  त्यामुळे अनिष्ट घटना मनुष्याला निराश करण्यासाठी अथवा दुःख देण्यासाठी नाहीत तर मनुष्याला या घटना स्पष्ट समज देतात, की परमेश्वर नियामक असल्याने मनुष्याच्या कल्पनेप्रमाणे, इच्छेप्रमाणे अथवा योजनेप्रमाणे घडणार नाही.  कदाचित मनुष्याच्या इच्छेप्रमाणे घडले तर परमेश्वराची व त्याची इच्छा सुदैवाने एकच आहे असे म्हणता येईल.

आपल्या हितासाठी विशिष्ट ध्येयानुसार परमेश्वर विशिष्ट प्रसंगांतून आपल्याला नेत नेत घडवत असतो.  तेव्हा कुरकुर न करता समाधानाने त्याला साथ देणे, हे आपले कर्तव्य आहे.  ही जीवनाची विचाराने येणारी समज फार महत्वाची आहे.  ही समज एक महत्वपूर्ण शोध आहे.  ईश्वरी सत्तेच्या जाणीवेने मनुष्यात साहजिकच नम्रता येते.  सतत या सत्तेची जाणीव पदोपदी होत रहाते.  त्यामुळेच ईश्वराबद्दल त्याच्या मनात श्रद्धेचा भाव निर्माण होतो.  आस्तिक्य बुद्धि मनात उदयाला येते.  संकटे व दुःखांचे हेच प्रयोजन आहे.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

No comments:

Post a Comment