Tuesday, December 15, 2015

महावाक्यांचा विचार | Analysis of Great Vedanta Principles


सर्व वेदांचे सार सांगणारी जी महावाक्ये आहेत त्यात जीवब्राह्मैक्याचे ज्ञान प्रकट केले आहे.  त्यांच्या अर्थाचा सखोल व सर्वांगीण विचार करावा.  या महावाक्यांनाच अखंडबोधार्थ वाक्य म्हणतात.  महावाक्ये आत्म्याचे अद्वैत स्वरूपाचे ज्ञान देतात.  यासाठी जे वाक्य संपूर्ण द्वैताचा निरास करून अखंडबोधार्थ ज्ञान देते, अशा महावाक्यांचा विचार साधकाने करावा.

उपनिषदातील अत्यंत प्रसिद्ध अशी चार महावाक्ये पुढीलप्रमाणे आहेत – १. प्रज्ञानं ब्रह्म |  २. अयमात्मा ब्रह्म |  ३. तत्त्वमसि |  ४. अहं ब्रह्मास्मि |  या चार महावाक्यांमध्ये मुख्यतः ‘तत्त्वमसि |’ या उपदेशपर महावाक्याचा विचार पुढील प्रमाणे करावा.  १. तत्द विचार, २. त्वं पद विचार, ३. असि पद विचार.  साधकाने मुख्यतः दोन पदांचाच विचार करावा.  १. ‘मी’ म्हणजे हा जीव,  २. ‘मी’ ला निर्माण करणारा व विश्व निर्माण करणारा – विश्वाचा कर्ता – परमेश्वर.

त्वम् पदाने जीव कोण आहे ?  जीवाचे स्वरूप काय आहे ?  जीवाला कोणत्या कारणास्तव संसार प्राप्त झाला ?  त्याला सुख-दुःख, जन्म-मृत्यु या कल्पना व अनुभव कोठून व कसे निर्माण झाले ?  ‘मी’ च्या उपाधीचा विचार टाकून देऊन त्याच्याही पलीकडे असणारा शुद्ध, निर्भेळ ‘मी’ कोण आहे ?  या प्रश्नांचा साधकाने साकल्याने विचार करावा.

तसेच ‘तत्’दवाचक जगत्उत्पत्तिस्थितिलयकर्ता,  सर्वशक्तिमान, सर्वज्ञ परमेश्वराचा विचार केल्यावर, ईश्वर हा स्वस्वरूपाने कोण आहे ?  याचा विचार करावा.  ईश्वराच्या सर्व उपाधींच्या व गुणधर्मांच्या पलीकडे असणारी त्याची शुद्ध, निरुपाधिक सत्ता विचारात घ्यावी.

‘तत्’ आणि ‘त्वम्’ या दोघांचे स्वरूप एकच आहे.  या सच्चिदानंद स्वरूपाच्या किंवा स्वस्वरूपाच्या दृष्टीने ‘असि’ पदाचा विचार करून हे ऐक्य जाणावे.  ही एकत्वाची, अखंडत्वाची संशयविपर्ययरहित दृष्टि किंवा हे ज्ञान ‘असि’ पदाने, श्रुतींच्या साहाय्याने गुरुमुखातून श्रवणाने प्राप्त करावे.

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

No comments:

Post a Comment