Showing posts with label Seva. Show all posts
Showing posts with label Seva. Show all posts

Tuesday, August 13, 2019

“ॐ नमः शिवाय” – ४ | Meaning of “Om Namah Shivay” – 4




आचार्य ‘अथवा’ या पदाने पक्षांतर करून पुन्हा एकदा सर्वसामान्य साधकांच्यासाठी ‘नमः’चा अर्थ सांगतात.  मागील श्लोकामध्ये नमः म्हणजेच ‘ध्यानम्असा अर्थ सांगितला.  ध्यानसाधना किंवा निदिध्यासना करणे सर्वच साधकांना शक्य नाही.  अधिकारिभेदात् |  साधकांच्यामध्ये मंद, मध्यम, अधम असे अनेक प्रकार असल्यामुळे जोपर्यंत अंतःकरणामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव आहे, तोपर्यंत ध्यानसाधनेमध्ये मन कधीही एकाग्र होऊ शकत नाही.  इतकेच नव्हे, तर रागद्वेषादि दोषांच्यामुळे शास्त्रप्रचीति, गुरुप्रचीति किंवा आत्मप्रचीतीही शक्य नाही.  म्हणून निदिध्यासना ही फक्त उत्तम, सत्त्वगुणप्रधान, अंतर्मुख, विषयासक्तिरहित, वैराग्यशील असणाऱ्या साधकांच्यासाठीच सांगितलेली आहे.  यासाठीच आचार्य येथे मंद, मध्यम अधिकाऱ्यांच्यासाठी सूचित करतात – अथवा दास एवाहं अहं दास इतीरणम् |  

साधक प्रार्थना करतो की, “हे भगवंता !  मी तुझा दास आहे.  मी निश्चितपणे तुझा दासच आहे.  कारण मी अद्वैत ज्ञान जाणू शकत नाही.  तू आणि मी दोघेही एकरूप झालो तर मी सेवा कोणाची करावी ?  हा मला प्रश्न आहे.  सेवेशिवाय मी जीवन जगूच शकत नाही.  म्हणून तू माझा स्वामी आणि मी सेवक आहे.”  येथे ‘दासः’ या शब्दाची आचार्य मुद्दाम द्विरुक्ति करून साधकांच्या मनामध्ये दास्यत्वाचा भाव ठसवितात.  हाच ‘नमः’ या शब्दाचा अर्थ आहे.  हाच अर्थ वेदांच्यामधून, शास्त्रामधून, श्रीमद्भगवद्गीतेमधून सांगितलेला आहे.  

“भगवंता !  मी अत्यंत अज्ञानी, मर्यादित आहे.  माझ्या अंतःकरणामध्ये अनंत वासना थैमान घालीत आहेत.  मी भवसागरामध्ये पूर्ण बुडालो आहे.  त्यामधून पार जाण्यासाठीच मी तुला अनन्य भावाने शरण आलो आहे.  माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची साधना, उपासना, निदिध्यासना करण्याची शक्ति नाही.  अद्वैत ज्ञान तर माझ्यापासून फारच दूर आहे.  जपामध्ये माझे मन एकाग्र होत नाही.  भजन करावे तर ताल, सूर याचे ज्ञान नाही. भजनामध्ये, कीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये तमोगुणाचे आवरण येऊन मी निद्राधीन होतो.  कोणतीच साधना जमत नसल्यामुळे मी निराश होतो.  म्हणूनच भगवंता !  मी तुझी फक्त सेवा करू शकतो.  मी तुझा सेवक आहे.”  



- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ


Tuesday, October 24, 2017

सेवा हा भाव आहे | Service is an Attitude


“सेवा” हा मनाचा असा एक भाव आहे की, सेवा करीत असतानाच आपल्याला आनंदाचा अनुभव येतो.  सेवा ही मनापासून म्हणजेच प्रसन्न मनाने केली जाते.  सेवा करावयाची असेल तर प्रथम, ज्याची मी सेवा करतोय त्याविषयी मनामध्ये नितांत श्रद्धा, दृढ विश्वास असला पाहिजे.  त्याशिवाय मी सेवा करूच शकत नाही.  त्या श्रद्धास्थानामध्ये मी नतमस्तक झाले पाहिजे.  तिथेच माझे व्यक्तिगत रागद्वेष, आवड-नावड, हेवे-दावे गळून पडतात.  माझ्यामधील अहंकार, अभिमानाची वृत्ति त्या स्थानामध्ये गळून पडते.  तिथेच मनुष्य नम्र, विनयशील होतो.  तिथेच पूर्णभावाने समर्पित होतो.  मग ते स्थान कोणतेही असो.  मातृसेवा, पितृसेवा, गुरुसेवा, राष्ट्रसेवा, ईश्वराची सेवा यांपैकी कोणतीही सेवा असेल.  

सेवा करताना आपणास व्यावहारिक दृष्टीने कितीही निकृष्ठ कर्म करावे लागले तरी आपल्याला त्याची लाज वाटता कामा नये.  काया-वाचा-मनाने झोकून देऊन सेवा केली पाहिजे.  माझे प्रत्येक कर्म मी सेवेसाठीच केले पाहिजे.  

आई-वडिलांच्या सेवेसाठी भक्त पुंडलिकाचे प्रसिद्ध उदाहरण आहे.  तसेच संपूर्ण जीवन गुरूंच्या चरणी समर्पित करणारे, गुरुमय जीवन जगणारे वैदिक काळापासून आजपर्यंत अनेक शिष्य आहेत.  भरतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करून तिला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्यासाठी ज्यांनी सर्वस्व झोकून दिले, प्राणांची आहुति दिली, देशसेवेसाठी, राष्ट्रासाठी जीवनाचा शवासन् श्वास वेचला, असे कितीतरी भारतमातेचे थोर वीरपुत्र आहेत.  ईश्वराच्या प्राप्तीसाठी, दर्शनासाठी जन्म-जन्म सर्वसंगपरित्याग करून साधना करणारे, ईश्वरसेवा हेच ज्यांचे जीवन आहे, असे ईश्वराचे कितीतरी अनन्य भक्त या भूमातेच्या पोटी जन्माला आलेले आहेत.  

या सर्वांच्या जीवनामध्ये पाहिले तर त्यांचे श्रद्धास्थान जरी माता-पिता-गुरु-देश-राष्ट्र असे भिन्न-भिन्न असेल तरी त्यांच्या श्रद्धास्थानाविषयी असलेली त्यांची नितांत श्रद्धा, भक्ति, निष्ठा, धैर्य, दृढ विश्वास, अतुलनीय त्याग या सर्व गोष्टी समान दिसतात.  या सर्वांचेच चरित्र या त्यागामुळे, समर्पणामुळेच भव्य, दिव्य आणि उदात्त झालेले आहे.  


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ


Tuesday, December 2, 2014

कामना आणि प्रेम | Desire and Love




व्यावहारिक प्रेम कामनायुक्त – कामुक असते.  ते अनेक विषयांच्यावर असू शकते – धन, सत्ता, पुत्र, पौत्र, पत्नी, घर वगैरे.  वैषयिक प्रेमामध्ये प्रिय विषय उपभोगण्याची इच्छा असते.  परंतु पुन्हा पुन्हा उपभोगाने कालांतराने त्या अतिप्रिय वस्तूचे किंवा व्यक्तीचे आकर्षण कमी होते, उत्कटता कमी होते.  मग तेच प्रेम आनंदवर्धक – सुखदायक न होता दुःखालाच कारण होते.  त्यामुळे ती व्यक्ति किंवा तो विषय दूर ठेवण्याची – टाळण्याची धडपड सुरु होते.

विषय उपभोगाने इंद्रियांची शक्ति क्षीण होत जाते.  शरीर व्याधिग्रस्त होते.  हे सत्य असूनही ‘काम’ मनुष्याला स्वस्थ बसू न देता, तृप्त होऊ न देता विषयांच्यामध्ये फसवून सुख देण्याचा भ्रम निर्माण करते.  परंतु शेवटी आनंदाची उर्मी कमी होऊन विषाप्रमाणे मनुष्याला दुःखाचे घोट गिळावे लागतात.

परिपूर्ण, आनंदघन भगवंताच्या प्रेमामध्ये – भक्तीमध्ये कामना नाहीत.  उलट परमप्रेमरूप भक्तीच्या सामर्थ्याने त्या दग्ध होतात, गळून पडतात.  कामुक प्रेमामध्ये मनुष्य हा नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो.  प्रेम करतो.  परंतु परमेश्वरावरील प्रेमात स्वार्थाचा, कामनेचा लेशमात्रही गंध नसतो.  असते ती फक्त अनन्य भक्ति, अत्यंत निष्ठा आणि निःसीम निःस्वार्थी प्रेम !  परमप्रिय प्रियोत्तमाला अत्यंत सुखी, संतुष्ट करावे हीच एक तळमळ, अंतरिक तीव्र इच्छा असते.

त्या परमेश्वराच्या आनंदासाठी भक्त काया-वाचा-मनासा नितांत श्रद्धेने, प्रेमाने निरंतर सेवा करतो.  सेवेमध्ये तो स्वतःला अर्पण करतो.  तो स्वतःला विसरून जातो.  तो आणि परमेश्वर यातील भेद नाहीसा होऊन अद्वैताचे दिव्य संगीत सुरु होते.  तो तृप्त होतो.  अंतःकरण शुद्ध, निर्मळ होते.  राग-द्वेष, कामक्रोधादि विकारांचा पगडा कमी होऊन नीरव शांति अनुभवास येते.  जितक्या प्रमाणात अधिक प्रेम केले जाते त्यापेक्षा अनंत पटीने आनंद मिळतो.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ