Tuesday, September 19, 2023

कर्तृत्वाचा निरास | Elimination of Ownership of Action

 



ज्ञानी पुरुष या विश्वामध्ये एखाद्या अज्ञ पुरुषाप्रमाणेच सर्व क्रिया किंवा व्यवहार करीत असतो.  अज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने पाहिले तर सर्वच क्रिया व व्यवहार सत्य वाटतो.  अज्ञानी मनुष्य ज्ञानी पुरुषाला सुद्धा उपाधीच्या दृष्टीने पाहत असल्यामुळे ज्ञानी मनुष्याच्या येणे-जाणे, कर्म करणे, बोलणे, वगैरेदि सर्वच क्रिया अज्ञानी मनुष्याला सत्य वाटतात.

 

परंतु ज्ञानी पुरुषामधून कर्तृत्वाचा निरास झाल्यामुळे स्वस्वरूपाच्या दृष्टीने पाहिले तर ज्ञानी पुरुष कोठे जातही नाही आणि कोठून येतही नाही.  कोणते कर्म करीतही नाही अथवा बोलतही नाही.  तर या क्रिया केवळ त्याच्या शरीरइंद्रियादि उपाधीमधून घडत असतात.  ज्ञानी पुरुष मात्र यापासून अलिप्तच राहतो.

 

याचे कारण ज्ञानी पुरुषाला परमपदाचे ज्ञान झाल्यामुळे त्याच्यामधील कर्तृत्वबुद्धि निरास पावते.  प्रमाता-प्रमेय-प्रमाण हा व्यवहार निरास पावतो.  मागे सांगितल्याप्रमाणे हेय आणि उपादेयरहित झाल्यामुळे तो द्वंद्वरहीत होतो.  त्याला कशाचीच अपेक्षा नसल्यामुळे कामनांचा अभाव होऊन त्याची कर्मे सुद्धा क्षय पावतात.

 

येथे समारंभ म्हणजेच कर्म होय.  कर्माच्याच साहाय्याने मनुष्याच्या संसारगतीला प्रारंभ होतो.  किंवा ज्याचा आरंभ केला जातो त्याला 'आरंभ' म्हणजे 'कर्म' असे म्हणतात.  ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी पुरुष काही त्याग करीत नाही किंवा काही ग्रहणही करीत नाही.  याचे कारण - प्रयोजनअभावात् |  काही मिळविण्याच्या इच्छाच गळून पडल्यामुळे प्रिय-अप्रिय, रागद्वेषादि वृत्ति गळून जातात.  म्हणून ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामधील कामना, कर्म, कर्तृत्व, भोक्तृत्व या सर्वच संसारप्रत्ययांचा निरास होतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ