Tuesday, August 1, 2023

सृष्टिचक्र | The Cosmic Cycle

 



अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत |

अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ||           (गीता अ. २-२८)

हे अर्जुना !  सर्व भूतमात्रे अव्यक्तामधून व्यक्त होतात आणि पुन्हा अव्यक्तामध्येच लय पावतात.  म्हणून तू कोणासाठी आणि कशासाठी रडतोस ?  याठिकाणी महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.

 

१) परमेश्वराच्या त्रिगुणात्मक मायाशक्तीमुळेच विश्वाची आणि भूतमात्रांची उत्पत्ति-स्थिति-लय होते.  म्हणून सर्वच मायाकार्य आहे.  म्हणजेच जीव, जगत, परमेश्वर, जीवाचा सुखदुःखरूपी संसार सुद्धा मायाकल्पित आहे.  सत्य नाही.

 

२) प्रलयानंतर विश्व आणि सर्व जीव त्रिगुणात्मक प्रकृतीला किंवा अव्यक्तावस्थेत प्राप्त होतात.  येथे भगवान माझ्या स्वरूपाला येतात असे कधीही म्हणत नाहीत.  म्हणजेच मृत्युनंतर कोणताही अज्ञानी जीव परमेश्वरस्वरूपाला प्राप्त होत नाही.  तर अव्यक्तावस्थेला प्राप्त होतो की, ज्या अवस्थेमधून तो पुन्हा व्यक्त होतो, म्हणजे जन्माला येतो, हे स्पष्ट होते.

 

३) हे सर्व विश्व मायेचे कार्य असल्यामुळेच ते मायाधीन आहे.  मायांतर्गत आहे.  मायेने नियमित केलेले आहे.  तसेच जीव सुद्धा त्रिगुणात्मक मायेच्या आश्रित आहेत.  म्हणून त्यांचे जाणे-येणे, जन्म-मृत्यू, तसेच ऊर्ध्वगति किंवा अधोगति हे सर्व अज्ञानांतर्गतच आहे.  त्यामुळे प्रकृतिवश झाल्यामुळे अविद्याकामकर्मरूपी ग्रंथींचा छेद होईपर्यंत – पुनरपि जननं पुनरपि मरणं |  पुन्हा पुन्हा जन्ममृत्युरूपी संसारामध्येच अडकलेले असतात.  संसार हेच त्यांच्या कर्माचे फळ आहे.

 

४) हे सर्व विश्व जरी त्रिगुणात्मक मायेमधून निर्माण झालेले असेल तरी भगवान येथे मायेने विश्व निर्माण केले असे म्हणत नाहीत.  उलट मी विश्व निर्माण केले असे म्हणतात.  याचे कारण केवळ त्रिगुणात्मक प्रकृति स्वतः जड आणि अचेतन असल्यामुळे स्वतंत्रपणे स्वतः विश्वाची रचना करू शकत नाही.  मायेच्या कार्याच्या मागे चैतन्यस्वरूप पुरुषाची आवश्यकता आहे.  त्याच्या सत्तेशिवाय मायेला सत्ता आणि चेतना मिळू शकत नाही.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ