Monday, May 22, 2023

ईश्वर-विमुख आणि ईश्वराभिमुख | Away From And Towards Eeshwar

 



साधन विचार करताना आपल्याला जाणून घेतले पाहिजे की जीवनामध्ये ४ गोष्टी आम्हाला ईश्वर-विमुख करतात.

१) छळ-कपट, चोरी, व्यभिचारामध्ये रस निर्माण झाला तर मनुष्य ईश्वरविमुख होऊन संसाराभिमुख होतो.

२) मनाची चंचलता - प्रयत्न करूनही भगवंतामध्ये मन स्थिर, एकाग्र होत नाही.

३) अभिमान - संसारातील अनेक विषयांच्या आश्रयाने अनेक प्रकारचा अभिमान निर्माण होतो.  धन, परिवार, विद्या, बुद्धि, अधिकार, बल, यश, कीर्ति, वर्ण, आश्रम, धर्म, सौंदर्य, कुल, त्याग, दान, राष्ट्र, समाज, सुंदर स्त्रीचा अभिमान.

४) ईश्वराच्या स्वरूपाचे अज्ञान.

 

ईश्वरविमुख करणाऱ्या चार कारणांचे निराकरण करून ईश्वराभिमुख होण्यासाठी साधनांचा विचार केला पाहिजे.

१)  अधर्माचरणामध्ये असलेला रस निवृत्त करण्यासाठी धर्माचरण केले पाहिजे. धर्माचरणाने जितका पापाचा क्षय होईल त्याप्रमाणात हळूहळू परमेश्वरामध्ये रस वाढेल.

२) राग द्वेष नाहीसे करण्यासाठी भगवंतावर, गुरुंच्यावर प्रेम करावे आणि निःस्वार्थ, निष्काम सेवा करावी.  मनाच्या कल्पनेचा विलास थांबविण्यासाठी योगाची साधना किंवा उपासना करावी.

३) संसारातील अनेक गोष्टींचा अभिमान नाहीसा करण्यासाठी आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीकडे पाहू नये.  त्यामुळे अभिमान वाढतो. आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ व्यक्ति पाहिल्यामुळे अभिमान खाली येतो.  या विश्वात निरतिशय, सर्वश्रेष्ठ असा अनंतकोटीब्रह्माण्डनायक परमेश्वर आहे.  त्याचे गुण, धन, यश, कीर्ति, सत्ता, सामर्थ्य, ईशनशीलत्व वगैरे पाहावे.

४) ईश्वराच्या स्वरूपाचे अज्ञान नाहीसे करून ज्ञान प्राप्त करण्यासाठी सत्संग करावा.  सत्संगामध्ये परमेश्वराचे गुणमाहात्म्य, विभूति, लीला, क्रीडा, सौंदर्य, माधुर्य, उदारता, दया वगैरे स्वरूपाचे ज्ञान होईल.  यामुळे परमेश्वरामध्ये आपली रुचि वाढेल.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ