Tuesday, May 2, 2023

अधिकारी श्रोता | Authorized Listener

 



मागील श्लोकात वसिष्ठ मुनींनी कोणत्या वक्त्याला प्रश्न विचारू नयेत, हे सांगितले.  आता या श्लोकामध्ये उत्कृष्ट, योग्य वक्त्याने म्हणजे गुरूंनी हे ज्ञान कोणाला द्यावे व कोणाला देऊ नये ?  हे सांगितले आहे.  ज्या साधकामध्ये पूर्वी सांगितलेली वाक्ये आणि त्यांच्यानंतर सांगितलेली वाक्ये, या भिन्न-भिन्न वाक्यांची योग्य संगति लावण्याचे सामर्थ्य आहे, अशाच बुद्धिमान आणि योग्य साधकाला गुरूंनी हे ज्ञान द्यावे.  मात्र पशुधर्माने वागणाऱ्या अधम पुरुषाला हे ज्ञान देऊ नये.

 

शास्त्राचे श्रवण करीत असताना साधकाला वाक्यांचे संदर्भ लावता आले पाहिजेत.  काही वेळेस साधक शास्त्राची विधाने कोठेही, कशीही, कोणत्याही संदर्भात वापरतात.  हे अत्यंत अयोग्य आहे.  शास्त्रविधानांचे अर्थ स्वतःला सोईस्कर न लावता शास्त्राचे तात्पर्य समजले पाहिजे.  त्यासाठीच कोणते वाक्य कोणत्या संदर्भात योजिले आहे, याचे आकलन झाले पाहिजे.  म्हणून तो परिपक्व, शुद्ध मनाने शास्त्रार्थ समजावून घेतो, त्यामध्ये उगाचच तर्क-कुतर्क करीत बसत नाही तर शास्त्राचा अभिप्राय लक्षात घेऊन त्याप्रमाणे जो अनुसरण करतो, त्यालाच गुरूंनी शास्त्राचा उपदेश करावा.

 

मात्र जे पशुधर्माने वागतात, म्हणजेच ज्यांच्या अंतःकरणामध्ये कामक्रोधादि विकार असून जे अधार्मिक आणि पापाचारी आहेत अशा अनाधिकारी, अधम लोकांना मात्र ही गुह्य ब्रह्मविद्या मात्र कदापि देऊ नये.  अशा निकृष्ट मनुष्याशी संभाषण देखील करू नये.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019

- हरी ॐ