Tuesday, November 8, 2022

गुरुकुलामधील शेवटचा उपदेश | The Take-Away From ‘Gurukul’

 



प्राचीन काळी गुरुकुल परंपरा होती.  लहान मुलांचे उपनयन झाल्यानंतर मुले गुरुगृही जात असत.  गुरुकुलामध्ये काही वर्ष व्रतस्थ राहून अनेक शास्त्रांचे अध्ययन करीत.  अध्ययन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी गुरुकुलामधून पुन्हा घरी येऊन गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करीत.  गुरुकुलामधून घरी जाताना गुरु विद्यार्थ्यांना शेवटचा उपदेश करीत –

 

सत्यं वद |  धर्मं चर |  स्वाध्यायान्मा प्रमदः |

सत्यान्न प्रमदितव्यम् |  धर्मान्न प्रमदितव्यम् |

कुशलान्न प्रमदितव्यम् |  भूत्यै न प्रमदितव्यम् |

स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् |

देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् |

मातृदेवो भव |  पितृदेवो भव |  आचार्यदेवो भव |

अतिथिदेवो भव |  यान्यवद्यानि कर्माणि |

तानि सेवितव्यानि |  नो इतराणि |  यान्यस्माकगं सुचरितानि |

तानि त्वयोपास्यानि ||                                           (तैत्तिरीय उपनिषत्)

 

सत्य बोलावे.  धर्माचे आचरण करावे.  स्वाध्यायामध्ये प्रमाद करू नये.  सत्यामध्ये प्रमाद करू नये.  धर्मामध्ये प्रमाद करू नये.  कुशल सत्कर्मामध्ये प्रमाद करू नये.  ऐश्वर्यप्रद मंगल, पवित्र कर्मांच्यामध्ये प्रमाद करू नये.  स्वाध्याय व प्रवचन यामध्ये प्रमाद करू नये.  देवकार्य व पितृकार्य यामध्ये प्रमाद करू नये.

 

तू मातेला देवाप्रमाणे मानावेस.  पिता, गुरु व अतिथी यांना देखील देवाप्रमाणे मानावे.  निंद्य नसणाऱ्या कर्मामध्येच प्रवृत्त व्हावे.  त्याव्यतिरिक्त कर्मे करू नयेत.  आपल्या गुरुजनांच्या सुचरिताचे अनुसरण करावे.  त्याचीच उपासना करावी.  थोडक्यात, जीवनभर श्रेष्ठ नीतिमूल्यांचेच आचरण करावे.  त्यासाठी शास्त्राला, वेदांनाच प्रमाणभूत मानावे.

 

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ