Tuesday, November 29, 2022

भारतभूमीमध्ये ज्ञानाचा उपदेश | Knowledge For Bharat

 



ब्रह्मदेवांनी वसिष्ठमुनींना आज्ञा केली.  हे मुने !  हे साधो !  आता तू येथून पुढे पृथ्वीवर जावेस.  पृथ्वीच्या पृष्ठभागावर जम्बुद्वीपामध्ये भारतवर्ष आहे.  त्या अत्यंत पवित्र असणाऱ्या भारतभूमीमध्ये जाऊन तेथील सर्व लोकांच्यावर अनुग्रह करण्याच्या इच्छेने तू त्यांना या गुह्य ज्ञानाचा उपदेश कारावास.

 

ब्रह्मदेवांनी वसिष्ठांना पृथ्वीवरील विशेष स्थान निर्देश करून भारतवर्षामध्ये जाण्याचा आदेश दिला.  याचे कारण भारतभूमि ही अतिशय पवित्र आहे.  'भारत' याचा अर्थ होतो - भायां आत्मविद्यायां रमते इति भारतः I  जो आत्मविद्येमध्ये रमतो तो भारत देश होय.

 

मुळातच या भूमीवर ज्ञानाचे व धर्माचे संस्कार आहेत.  येथे अनेक ऋषि-मुनींनी अवतार घेऊन ज्ञानाचा विस्तार केला आहे.  याच भूमीमध्ये प्रत्यक्ष भगवंतांनी अनेक अवतार घेतले आहेत.  ही वेदांची जन्मभूमी आहे.  या भूमीने कित्येक वेळेला आत्मज्ञानाचे श्रवण केले आहे.  गुरुशिष्यपरंपरा हे तर या भूमीचे वैशिष्ठ्य आणि भूषण आहे.  त्रैलोक्यामध्ये अतिशय दुर्लभ असणाऱ्या आणि राजगुह्य-राजविद्या असणाऱ्या आध्यात्मिक विद्येची ही भूमी आहे.  म्हणून स्वर्गामधील देवदेवता सुद्धा येथे जन्म घेण्याची इच्छा करतात.

 

या पवित्र भूमीमधील लोक आत्मज्ञानाचे अधिकारी आहेत.  म्हणून ब्रह्मदेव वसिष्ठांना भारतवर्षांमध्ये जाण्याचा आदेश देतात.  ब्रह्मदेव वसिष्ठ मुनींना सांगतात की, "हे मुने !  या भारतवर्षामध्ये जाऊन तेथे जे कोणी लोक कर्ममार्गाचे अधिकारी आहेत, त्यांना प्रथम तू कर्मकांडाचा व नंतर क्रमाने ज्ञानाचा उपदेश कर.  तसेच जे विवेक आणि वैराग्यसंपन्न आहेत त्यांना निरतिशय आनंद देणारे ज्ञान तू द्यावेस.

 


- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ