Tuesday, August 16, 2022

साक्षीभाव आणि मन | The Witness And The Mind

 



अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास होतो आणि दुसरा अध्यास म्हणजेच आत्म्यावर अनात्म्याचा अध्यास होय.  शरीरापासून अज्ञानापर्यंत सर्व अनात्म उपाधीचे गुणधर्म मी आत्म्यावर म्हणजेच ‘मी’वर आरोपित करतो.  म्हणून त्यांच्या गुणधर्मांनी ‘मी’च लिप्त, स्पर्शित, विकारी होतो.  या सर्व सुख-दुःखांच्यामधून, जंजाळामधून मुक्त व्हावयाचे असेल तर एकच साधन आहे आणि ते म्हणजे आपल्या मनाकडेच साक्षीभावाने पहिले पाहिजे.  साक्षीभावाचा अभ्यास केला पाहिजे.

 

भगवान रमणमहर्षींनी जीवनभर केवळ साक्षीभावाचा अभ्यास करून परमोच्चअवस्था प्राप्त केली.  आज मी मनाशी तादात्म्य पावल्यामुळेच मन म्हणेल तसे मला नाचावे लागते.  मनाचे सर्व विकार माझ्यावर आरोपित होतात.  माझेच मन मला या घोर संसारामध्ये अधिकाधिक बद्ध करीत असते.  म्हणून विश्व, विषय, माणसे समस्या नाहीत, तर माझेच मन मला problem आहे.  म्हणूनच ज्याक्षणी आपण मनाकडे साक्षी भावाने पाहू, त्याचक्षणी मन एका क्षणात शांत होते.  भगवान रमणमहर्षि म्हणतात –

            मानसं तू किं मार्गणे कृते |

            नैव मानसं मार्ग आर्जवत् ||              (उपदेशसारम्)

 

जे मन आपल्याला या संसाराचा अनुभव देते, ते मनच काय आहे ?  याचा विचार केला तर ते मनच लय पावते.  मनामधील विकार संपतात.  खरोखरच ज्याला मी ‘मन-मन’ असे म्हणतो, जे मला खूप भरकटायला लावते, त्याच मनावर प्रथम संयमन केले पाहिजे.  अन्य अनेक साधना वर्षानुवर्षे केल्या तरीही जोपर्यंत मनोनिग्रह होत नाही, तोपर्यंत संसाराचा, दुःखांचा निरास होणे अत्यंत कठीण आहे.  त्यासाठी मनामध्येच enquiry केली पाहिजे.  जितके आपण आपल्या मनाला महत्व देऊ, मनाबरोबर वाहत जाऊ, तितके ते मन मनुष्याचा नाश करते.

 

परंतु एखादाच धीर पुरुष विवेकाच्या मार्गाने मनावर निग्रह प्राप्त करतो, मनाकडे साक्षीभावाने पाहतो.  तो मनाचा गुलाम होत नाही.  त्यामुळे आपोआपच माझे मनाशी झालेले तादात्म्य कमी कमी होते.

 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ