Tuesday, August 2, 2022

ब्रह्मविद्या – तत्काळ फळप्राप्ति | Self-Realization – Instant Effect

 



ज्याचा अनुभव येतो ते फल असते.  कोणत्याही फलाचा अनुभव प्रत्यक्ष असतो.  जेवण केल्यानंतर पोट भरले आहे की नाही हे आपण दुसऱ्याला विचारीत नाही.  तर पोट भरल्याचा प्रत्यक्ष अनुभव असतो.  तसेच जेवल्यानंतर ताबडतोब पोट भरते.  आज जेवले आणि उद्या पोट भरले असे होत नाही.  धर्माचे फल पाहिले तर ते कधीही प्रत्यक्ष मिळत नाही.  आज पुण्यकर्म केले तर कालांतराने त्याचे फळ मिळते.  कदाचित या जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्येही फळ मिळेल.  म्हणजेच धर्माचे फळ हे नेहमी परोक्ष आहे.

 

परंतु ज्ञानाचे फळ मात्र भविष्यकाळात मिळणारे नसून ज्याक्षणी ज्ञानोदय होईल त्याच क्षणी अज्ञानरूपी अंधाराचा नाश होऊन आत्मानुभूति येते.  आत्मन्येवात्मना तुष्टः |  अत्यंत दुखःनिवृत्ति आणि निरतिशय आनंदाची अनुभूति हेच ज्ञानाचे फल आहे.  आनंद भविष्यकाळामध्ये अनुभवता येत नाही.  उद्या आनंद मिळेल ही भ्रामक कल्पना आहे.  आनंद आजच-वर्तमानकाळामध्ये-आत्ताच अनुभवला येतो.  याच अनुभवाने साधक तृप्त होतो.

 

नारदमहर्षि म्हणतात –

यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति |      (नारदभक्तिसूत्र)

म्हणून ज्ञानाचे फळ प्रत्यक्ष, साक्षात अनुभवजन्य आहे, असे म्हटले आहे.

 

भगवान पुढे म्हणतात की, असे प्रत्यक्ष अनुभवाला येणारे ज्ञान धर्म अविरुद्ध आहे.  हे ब्रह्मज्ञान सर्व मुमुक्षूंना धर्माप्रमाणे अनुसरण करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे.  ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमांच्यासाठी त्याप्रमाणे अनुकूल धर्म आहे.  त्या धर्माच्या अनुष्ठानाने मनुष्याचे रक्षण होते.  म्हणजेच धर्म हा मनुष्याला ऊर्ध्वगतीला नेणारा आहे.  त्याचप्रमाणे हे ब्रह्मज्ञान धर्मविरुद्ध नाही, तर धर्मानुकूल आहे.  त्यामुळे संसारापासून मुमुक्षूंचे रक्षण होईल.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ