Tuesday, May 31, 2022

प्रतिकूल दैवातच उत्कर्ष होतो | Progress Through Ill-Fate

 



भगवान म्हणतात - कर्मणा जायते जन्तु कर्मणैव विलीयते |  सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते ||  स्वतःच्या कर्मानेच जीव जन्माला येतो. कर्मानेच मृत्यु पावतो.  कर्मानेच जीवाला सुख, दुःख, भय, क्षेम इत्यादि प्राप्त होतात.  म्हणून कर्म किंवा पुरुषार्थ हाच श्रेष्ठ आहे.  दैव आहे म्हणून पुरुषार्थ सुद्धा आहे.  उलट जितके दैव प्रतिकूल तितका अधिक पुरुषार्थ करता येतो.  छोटेसे दैव असेल तर पुरुषार्थही छोटाच आहे.  खरे तर आपल्यासमोर खूप छोटे-छोटे दैव येत असते.

 

याउलट आजपर्यंत जगामध्ये जी जी महान कार्ये झाली ती सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्येच झाली.  सर्व संतांच्या जीवनामध्ये सुद्धा भयंकर प्रसंग येऊनही, सर्व समाजाचा विरोध होऊनही त्या दैवावर मात करून त्यांनी लोकोद्धाराचे अलौकिक कार्य केले.  प्रत्यक्ष प्रभु श्रीरामांच्या जीवनामध्ये सुद्धा भयंकर घटना घडल्या.  श्रीरामांना पुढच्या क्षणी राज्याभिषेक होणार होता परंतु त्याचवेळी सर्व राजवैभव त्याग करून त्यांना वनवासामध्ये जावे लागले.  या सर्व घटना श्रीरामांनी अत्यंत शांत व धीर गंभीर मनाने स्वीकार केल्या.  वनवास मिळूनही तेथे रावणसंहाराचे आपले अवतारकार्य केले.  श्रीरामांचे समग्र लीलाचरित्र पाहिले की, श्रीराम ही साक्षात पुरुषार्थाची मूर्ति आहेत, असेच वाटते.

 

म्हणून मनुष्याने प्रतिकूल दैव आल्यावर निराश न होता त्याच प्रारब्धाचा उपयोग पुरुषार्थ करण्यासाठी करावा.  आपल्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिति आली की, उलट आता आपला खूप उत्कर्ष होणार आहे, असे समजावे.  कारण प्रतिकूल दैवामध्येच शास्त्रविहित पुरुषार्थ तेजस्वी सूर्याप्रमाणे देदीप्यमान होतो.  सगळे जग विरुद्ध गेले तरी मनुष्य धर्माची कास धरून मोठ्या धैर्याने आपली कर्तव्य पार पाडतो.  ज्याला जीवनात खरोखरच काहीतरी करावयाचे आहे, तो दैवाला दोष न देता उठेल आणि कामाला लागेल.  दैव चांगले असो अथवा वाईट असो, ते पुरुषार्थ करण्यासाठी साधन आहे.  उलट वाईट दैव पुरुषार्थाला अधिक गति व सामर्थ्य देणारे आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ