Tuesday, August 25, 2020

उपासना केव्हा करावी? | Ideal Time for Mind Practice




उपासना ही कधीही, केव्हाही करू नये.  काही साधक दुपारी बारा वाजता किंवा रात्री उपासना करतात.  परंतु ब्राह्ममुहुर्त ही उपासनेसाठी सर्वांत उत्कृष्ट वेळ आहे.  याचे कारण आपल्यामध्ये सत्व-रज-तम या गुणांचा प्रभाव आहे.  त्याचप्रमाणे विश्वामध्येही प्रकृतीचे हे तिन्हीही गुण अंतर्भूत आहेत.  

पहाटे ब्राह्ममुहुर्ताला संपूर्ण सृष्टि ही सत्वगुणप्रधान असते.  सूर्योदयापासून पुढे हळुहळू सृष्टीवर रजोगुणाचा प्रभाव असतो आणि सूर्यास्तानंतर रात्री पहाटेपर्यंत सृष्टि तमोगुणप्रधान असते.  रात्रीच्या वेळी नीरव शांतता असेल तरी रात्रीची शांतता, दुपारची शांतता आणि ब्राह्ममुहुर्ताची शांतता यात खूप फरक आहे.  सृष्टीच्या या गुणांचा परिणाम आपल्या मनावरही होत असतो.  

पहाटेच्या वेळी आपले मनही सत्वगुणप्रधान असते.  मनामधील रागद्वेष, कामक्रोधादि विकारांचा प्रभाव अत्यल्प असतो.  त्यामुळे मन प्रसन्न, शांत, आल्हाददायक असते व बाहेरील सृष्टि सुद्धा अत्यंत प्रसन्न असते.  त्याचवेळी उपासना करावी.  

याउलट सूर्योदयानंतर आपले मनही रजोगुणप्रधान होऊन शरीर, इंद्रिये अनेक प्रकारच्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतात.  मनामध्ये कामक्रोधादि विकार क्षणाक्षणाला उफाळून बाहेर येत असतात.  असे मन उपासनेमध्ये एकाग्र होत नाही.  

तसेच सूर्यास्तानंतर जसजशी रात्र होते, तसतसा तमोगुणाचा प्रभाव वाढतो.  जसे अंधारामध्ये हिंस्त्र श्वापदांची शक्ति वाढते, त्याचप्रमाणे तमोगुण वर्धन पावला असताना मनामधील राक्षसी प्रवृत्ति प्रबल होतात.  कामवासना उद्दीपित होते.  तसेच शरीर, इंद्रिये व्यापारशून्य होऊन सुंद होतात.  त्यावेळेस मनुष्य निद्रावश होतो.  त्यामुळे रात्रीच्या वेळी शरीर, इंद्रिये दिवसभराच्या श्रमामुळे थकलेली असताना, अशा जड, सुंद झालेल्या शरीराने मनही सुंद होते.  असे शरीर व मन उपासना करू शकत नाही.  यामुळे पहाटेच्या वेळी ब्राह्ममुहुर्तालाच उपासना करावी.   


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011



- हरी ॐ