Tuesday, December 4, 2018

भिक्षाटनाचे फायदे | Benefits of Alms



प्रत्येक मुमुक्षूने ब्रह्मचारी व्रताचे पालन करणे आवश्यक आहे.  या व्रतामध्ये भिक्षाटन येते.  भिक्षाटन करून त्यामधूनच स्वतःचा उदरनिर्वाह करावा.  भिक्षा मागूनच अन्न का खावे ?  याला अनेक कारणे आहेत.  

अ. भिक्षाटनामध्ये दुसऱ्याकडे भिक्षा मागावयाची असते.  त्यामुळे प्रथम अहंकार खाली येतो.  दुसऱ्याच्या दारापुढे उभा राहून भिक्षा मागणे ही इतकी सोपी गोष्ट नाही.  

ब. भिक्षेमध्ये जे काही आपल्या पात्रात मिळेल ते स्वीकारावे लागते.  त्यामुळे आवड-नावड कमी होते.  पात्रामध्ये पडणारे अन्न काहीही असो, ते आनंदाने खावेच लागते, कारण त्यावरच उदरनिर्वाह अवलंबून असतो.  पात्रामध्ये येणाऱ्या अन्नाचा साधकाने प्रसाद म्हणून आनंदाने स्वीकार करावा.   

क. भिक्षा मागत असताना अन्नाबरोबरच जननिंदा, अपमान, अवहेलना होते.  आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध आपल्याला ऐकावयाला लागते.  आपण सर्वसंगपरित्याग करून खूप मोठी साधना करीत आहोत या अहंकाराला तडा जातो.  अशाच प्रसंगांमध्ये तितिक्षा, सहनशीलता हे गुण आत्मसात करता येतात. 

ड. आपल्या मनामध्ये सतत आपण स्वीकारलेल्या मार्गाविषयी भीति असते.  लोक आपल्याला काय म्हणतील ?  लोक माझी चेष्टा करतील का ?  भिक्षा मागितल्यामुळे ही भीति कमी होवून मन निर्भय होते.  

इ. आपल्यामध्ये “आपल्या मालकीचे काहीतरी असावे” ही इच्छा असल्यामुळे सतत संग्रह, संचय करण्याची वृत्ति असते.  परंतु भिक्षाटनामुळे ही संग्रहवृत्ति नाहीशी होते.  यामुळे संग्रह केलेल्या विषयांच्या रक्षणाचीही भीति संपते.  चिंता संपते.  मन निर्भय होते.  

ई. अशाप्रकारे भिक्षा मागून आणल्यानंतर मी एकट्याने न खाता त्याचे समान भाग करून ती प्राणीमात्रांना, गुरूंना अर्पण करायची असते.  यामुळे मनामध्ये समर्पणवृत्ति निर्माण होते. 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ


No comments:

Post a Comment